सर्व सजीवांचा अधिकार- “निवारा”; शर्मिला देशमुख
आम्ही बालकवी स्पर्धेचे परीक्षण
सर्व सजीवांचा अधिकार- “निवारा”; शर्मिला देशमुख
वणवण या जीवाची
दिसे ना किनारा…
सुखावतो क्षणभर
मनास प्रेमाचा निवारा…
“निवारा” शब्द म्हटले की आठवते अन्न ,वस्त्र ,निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा. खरं म्हणजे निवारा ही माणसाची मानसिक गरज सुद्धा आहे. दिवसभर कितीही, कुठेही फिरायला जा अखेर मानवी मनाला ओढ असते ती प्रेमळ निवाऱ्याची. मानवालाच का? तर प्रत्येक चल सजीवाला ओढ आपल्या अधिवासाची. अधिवासावरून आठवले प्राण्यांचा अधिवास हा जंगल, झाडे, वृक्ष, वेली आहे. नुकतीच घडलेली तेलंगणा राज्यातील चारशे एकर जंगल कटाई. प्राण्यांचे मृत्यू, हाल हे “देखवे न डोळा,” हे दृश्य पाहण्यात आले. झाडे लावा झाडे जगवा, वसुंधरा वाचवा अशा पोकळ घोषणा करणारा मानव आणि त्याचे प्रत्यक्षातील वर्तन याचा ताळमेळ कुठेच सापडत नाही. तर हा प्राण्यांचा निवारा नष्ट करण्याचे कार्य मानवाने हाती घेतले आहे. स्व स्वार्थासाठी माणूस किती नीच पातळी ओलांडू शकतो हे न सांगितलेले बरे!
बरा होता हो अश्मयुगातील मानवच, तो पण एक प्राणी होता. किमान निसर्ग ,अधिवास याचे ज्ञान तरी होते त्याला. आज करोडो पक्षी प्राण्यांचा निवारा तोडून काढणारा माणूस पाहिला की वाटते कशाला केली मानवाने प्रगती? ही तर मानवाची वैचारिक अधोगतीच की..” माणसा माणसा कधी होशील माणूस?” हा प्रश्न मनाला भेडसावतो. कारण याच मानवाला स्वतःसाठी टोलेजंग इमारतीत सर्व सोयी- सुविधांनी युक्त असा निवारा हवा असतो. या वसुंधरेवर जणू एकट्या मानवाचाच अधिकार आहे आणि दुसऱ्याचा निवारा हिसकावून घेण्याचा जन्मसिद्ध अधिकार मानवाला मिळाला आहे. प्रचंड होणारी वृक्षतोड सजीवांचा निवास तोडून मोडून टाकते. कल्पना करा तुम्ही घराबाहेर पडले आणि परत आला तर घरच उध्वस्त झालेले असेल.. करवते का कल्पना? नाही ना करवत ? मग त्या जीवांचे काय ?त्यांच्या निवाऱ्याचे काय? असेल कुठे माणुसकी शिल्लक तर या गोष्टी चा मानवाने नक्कीच विचार करावा. नाहीतर विनाश अटळ.
आज “मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेत” राहुल दादांनी ‘निवारा’ हा अतिशय संवेदनशील विषय दिला आणि मानवाची क्रुरता झरझर नजरेसमोरून गेली. समूहात आज जवळपास सर्व सदस्यांनी प्राण्यांचा- पक्षांचा निवारा रंगवण्याचा प्रयत्न केला, हे त्यांच्या संवेदनशील मनाचेच प्रतीक म्हणावयास हरकत नाही. सर्व बाल मनाच्या संवेदनशील शिलेदारांना लेखणीसाठी भरभरून शुभेच्छा!!!
तुला हवा ना सहारा
तुला हवा ना फुलोरा
मग कसा मोडतो तू
मुक्या प्राण्यांचा निवारा..??
विनाशाचे कारण न बनता “जगा आणि जगू द्या” बस्स इतकेच….!
शर्मिला देशमुख -घुमरे बीड
सहप्रशासक /परीक्षक मराठीचे शिलेदार समूह



