“अस्तित्वासाठी फितुरी करण्या-याचा फुगा आपणच फोडला पाहिजे”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“अस्तित्वासाठी फितुरी करण्या-याचा फुगा आपणच फोडला पाहिजे”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
तू घट्यामध्ये गं दळलं खंडिचं दळण
तू भरडून गेली घरा लावलं वळण
तुझी कशी कुणाला कळली नाही महती
तू उमा~ लक्ष्मी ~आदिशक्ती ~सरस्वती!
‘अस्तित्वासाठी तुझ्या किती ग तू सोसतेस’, जिवंतपणे स्वतःला किती वेळा जाळतेस. स्रीजन्म असाच आहे.भोगावं लागतं, झिजावं लागतं, लढावं लागतं, झुकावं लागतं, कधी कधी खोट्याचं खरंही स्वीकारावं लागतं. पण, तू हे सारं करतेस केवळ कुटुंबाच्या अस्तित्वासाठीच ना? कारण तुला माहित आहे तू जराही विचलित झालीस तर कुटुंबाची राखरांगोळी होते.
जरा इतिहास पण बघ ना? स्वराज्य व्हावे या जिद्दीने पेटलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मुलखाच्या अस्तित्वासाठी उभं आयुष्य पेटवून घेतलं. आपल्या ५० वर्षाच्या आयुष्यात ७०० वर्षाची मुघल सत्ता उलथून लावली. निर्माण केलेले मराठी साम्राज्य वाढवण्यासाठी, मोठं करण्यासाठी शिवपुत्र संभाजी महाराजांनी बलिदान दिले. ४० दिवस अनंत यातनांना ते सामोरे गेलेत. पण शरण गेले नाही. शेवटी काय झालं? वीतभर स्वार्थासाठी अर्थात स्व-अस्तित्वासाठी गद्दारी केली गेली. शंभूराजांना पकडून दिलं हा जरी इतिहास असला, तरी आजही काय वेगळं घडताना दिसतेय आपल्याला ?
जे तुम्हाला मोठं करतात, उभं करतात, नाव कमवून देतात, पंख देतात, पंखांमध्ये बळ ही भरतात; मग हवा भरल्यागत होतो आपण, अस्तित्वासाठी फितुरी करतो. कुठेतरी जाऊन मिळतो,पण खरं हे खरंच असतं. बेगड भले आकर्षक असते, पण ती स्थायी नसते. हे आपण विसरतो. स्व अस्तित्व निर्माण करतांना आपण मुळावरच घाव घालतो. काही अंशी, काही वेळा यात आपण यशस्वीही होतो. पण मूळ वृक्ष जर मजबूत असला तर आपण स्वतःच पडतो त्या खड्ड्यात..जे आपण दुसऱ्यासाठी खोदलेलं असते.
आज ‘बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी’ मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘अस्तित्वासाठी’ हा विषय दिला आणि सर्वांच्या लेखणीला जणू उधाणच आले. कुणी शिव शंभूंच्या पराक्रमाची गाथा गायली, तर कुणी नात्यांमधील विसंवाद मांडताना इमानी अस्तित्व अधोरेखित केले. कुणी नारीशक्तीच्या अस्तित्वासाठी अहिल्या, जिजाऊंचा इतिहास घडविण्याचे आवाहन केले. तर कुणी त्याच जिजाऊंच्या विचारांवर विश्वास ठेवत वैधव्यावर मात करून स्वअस्तित्व टिकवले.
कुणी बजेट रुपी आश्वासनांना फुकटच्या रेवड्या म्हटलं, तर कुणी धगधगत्या राखेतून निघून स्वप्नांचे नवे अंकुर घेऊन अस्तित्व जपले. कुणी आत्मसन्मान जपण्याचा प्रयत्न केला तर कुणी देवाऱ्याशी सांजवात लावून चैतन्याला शरण जात अस्तित्व राखले. असो…. एकापेक्षा एक सुंदर रचनांनी आज खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीच्या या पर्वावर विषयाला न्याय मिळाला.. तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा. नागपूर येथे आयोजित होत असलेल्या ‘कवितेवर बोलू काही’ या कवी संमेलनात नागपूरकर शब्दप्रभूंनी सहभागी होऊन साहित्याच्या काव्यपीठावर आपलं अस्तित्व सिद्ध करून मराठी भाषेची उंची वाढवावी…. तूर्तास एवढेच…!!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री,लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह