वर्ष सरताना, विजयांपेक्षा अपयशांकडे प्रामाणिकपणे पाहण्याची गरज; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
वर्ष सरताना, विजयांपेक्षा अपयशांकडे प्रामाणिकपणे पाहण्याची गरज; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“जुने जाऊद्या मरणालागुनी,
जाळूनी किंवा पुरुनी टाका..,
सडत न एका ठायी ठाका,
सावध ऐका पुढल्या हाका..!”
आधुनिक मराठी कवितेचे जनक, कविवर्य कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांच्या या ओळी २०२५ हे वर्ष संपत असताना वर्षभराचं सिंहावलोकन करताना प्रकर्षानं मला आठवल्या. तसे पाहता काळ चक्राचा महिमा अगाध आहे. ते ना आजवर कुणासाठी थांबले ना भविष्यातही थांबेल.काळ पुढे जात असतो, पण काही प्रश्न मात्र मागे ठेवतो. जुने वर्ष सरताना, समाजाने आणि व्यक्तीनेही आत्मपरीक्षण करणे आवश्यक ठरते. कारण वर्ष बदलणे ही केवळ कालगणना नाही, तर मूल्यांची, निर्णयांची आणि दिशांची चाचणी असते.
“वर्ष सरतं म्हणून प्रश्न सुटत नाहीत, ते अधिक ठळक होतात,
वेळ निघून जातो पुढे, जबाबदाऱ्या मात्र उभ्या राहतात.”
हे सरलेले वर्ष आपल्याला अस्वस्थ करून गेलं आहे. व्यक्तीपातळीवर संघर्ष वाढले, समाजपातळीवर संवेदनशीलता कमी झाली आणि व्यवस्थात्मक पातळीवर प्रश्नांची गर्दी झाली. विकासाच्या गजरात माणूस हरवू लागला आहे. प्रगती झाली, पण समतोल बिघडला. हा विरोधाभास स्वीकारण्याऐवजी आपण त्याकडे दुर्लक्ष केलं..हे जुने वर्ष आपल्याला ठळकपणे दाखवून जातं.
हातात साधनं वाढली,
मन मात्र कोरडं झालं,
गती वाढली आयुष्याची,
माणूसच मागे पडला.
जुने वर्ष सरताना, विजयांपेक्षा अपयशांकडे अधिक प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. कारण अपयश हा व्यवस्थेचा खरा आरसा आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, नोकरदार प्रत्येक घटकाने आपापल्या पातळीवर ताण सहन केला. प्रश्न हे नवीन नव्हते, मात्र उत्तरं देण्याची इच्छाशक्ती कमी पडली. सकरात्मकता हा तर मानवाचा मूलमंत्र आहे, तेव्हा गेल्या वर्षात होणाऱ्या चुका पुन्हा होणार नाहीत हा आशावाद मनी बाळगतांना, नवीन वर्षाकडे पाहताना सकारात्मकता आवश्यक आहे. पण, ती अंध नसावी. बदल हा घोषणांतून नाही, तर कृतीतून घडतो. वर्ष बदलतं तेव्हा अपेक्षा बदलतात, पण वृत्ती बदलली नाही, तर इतिहास पुन्हा तसाच उभा राहतो.
नवं वर्ष नवी आशा देतं,
पण वाट जुनीच चालावी लागते,
शब्द बदलले म्हणून काय झालं,
कृती नसेल तर वेळ वाया जाते.
जुने वर्ष निरोप घेताना समाजाला एकच धडा देऊन जातं….. संवेदनशीलता ही कमजोरी नाही; तीच खरी शक्ती आहे. आत्मपरीक्षण ही माघार नाही,तीच पुढे जाण्याची पहिली पायरी आहे.
जुने वर्ष जात नाही अचानक,
ते आठवणींनी थांबतं,
शहाणपण ज्याला लाभतं,
तोच नव्या वर्षाला घडवतो.
म्हणूनच….जुने वर्ष सरताना केवळ शुभेच्छा देणं पुरेसं नाही. आपण कोण होतो? काय केलं ??आणि पुढे काय करणार??? या तीन प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं शोधणं, हेच नव्या वर्षाचं खरं स्वागत आहे. वर्षांती आजच्या बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी “वर्ष सरताना” या प्रबोधनात्मक विषयावर चिंतन मनन करण्याचं कारण म्हणजे आदरणीय राहुल सरांनी दिलेला हा विषय. खऱ्या अर्थाने हे सिंहावलोकन प्रत्येकाचं वेगवेगळे असेल, परंतु एक मात्र नक्की की, वर्षभरात ज्या चुका झाल्यात त्या पुन्हा होऊ नयेत यावर विचार करणे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि याच अनुषंगाने आज दिवसभर सर्व समूहांमध्ये प्रत्येकाने विषयाला योग्य न्याय देताना आपापल्या परीने सुंदर मांडणी केली. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील लेखनास अनंत कोटी शुभेच्छा धन्यवाद..!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



