‘ति’चा रोखलेला श्वास…..!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
‘ति’चा रोखलेला श्वास…..!!
किती वर्षापासून बघतेय मी तिला..तेच कष्ट, तिच फरफट, तिच कसोटी, सारं तेच. मुलांच्या, कुटुंबाच्या आनंदापलीकडे या जगातील कोणत्याच गोष्टीचा तिला हव्यास नाही. आयुष्यभर चालत आलेली धडपड निव्वळ कुटुंबाच्या सुखासाठीच. मुलांना वाढवतांना स्वतःची झोप, वेळ,आरोग्य सारंच बाजूला ठेवते. एखाद्या माळ्याने बागेतील एखाद्या झाडावरील सुंदर फुलांची निरागसपणे निगा राखावी अगदी तशीच ती मुलांची काळजी घेत असे. ‘जीवनाच्या रंगमंचावर अभिनय करत ती आपली जबाबदारी निभवतेय,पंखात बळ भरतेय’.
सर्वांचे हट्ट, जिभेचे चोचले पुरवणे तरीही तिच चुकीची असेच सर्वांचे मत. किती झिजते, राबते कुणी नाही जाणत तिच्या वेदना. तिच्या हृदयातील भावना आणि संघर्षाचं अनोखं विश्व कुणालाच दिसत नाही. सहनशीलतेच्या मुखवट्यामागे वेदना लपवून जगतेय ती. तिने नेहमी डोक्यावर बर्फ व तोंडात साखर घेऊनच राहायचं, पण तिच्याही आत्म्याला जखमा होत असतात. त्या वरवर दिसत नसल्या तरी, त्यावर उपचार नसतोच. ती दाखवत नाही तिच्या जखमा, एकटेपणा, तिला झालेला त्रास, तिने केलेला त्याग. कुणी कितीही अवहेलना केली मनाची तरी सुगंध देत राहते ती बकुळीच्या फुलांसाराखी, सारे भावच तिच्या आयुष्यातून परागंदा झाल्यागत.
दगडाच्या भिंतींनांही बोलकं करणारं प्रेम,वात्सल्य तिच्यात भरभरून पहावयास मिळते. कितीही सुखदुःखाच्या लाटा येवोत त्यात तरून ती पैलतीर गाठतेच. मनातली वादळं चेहऱ्यावर कधी दाखवत नाही. कशीही परिस्थिती असो, कधीच कुरबुर नाही, कसला हट्टही नाही.कधी वीट आला तरी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत जगते.आणि म्हणतेही..”घर चालतं ते प्रेमानं, समजूतदारपणानं आणि थोडं वाकून घेण्यानं.. अहंकाराने का घर टिकतं आदर, प्रेम, विश्वास आणि सहनशीलता जपत पुढे जात राहते ती. शांत राहून गंमत पाहणं व प्रार्थना करणं मुलांसाठी. कुटुंबात मिसळता मिसळता स्वतःला विसरत संसार चालवणं,वरून ‘ते तर तुझं कर्तव्यच आहे’,अशीच सा-यांची अपेक्षा.पण हे वाक्य तिच्या वेदनांना गोंजारून जातं.
सुखाचे क्षण तर अधिक महिन्यासारखे क्वचितच तिच्या आयुष्यात. व्यथेचा जणू वारसा लाभल्यागत काट्यातूनही मार्गक्रमण करते. स्वतःच्या इच्छा, स्वप्न, थकवा आणि तक्रारी ती लिहीतच नाही, कुठे मोकळा श्वासही घ्यायला तिला मिळत नाही. तिचा आक्रोश, व्यथा, उरातील वेदना, काळजाच्या जखमांना दोन शब्द गोड बोलण्याचं ‘पेनकिलर’ देऊन तिच्या मनाला थांबवलं जातं. तिच्या डोळ्यातून झरणा-या आसवांना कुणी बघत नाही. रोखलेला श्वास सोडत जगतेय ती.
तिला कुणीतरी ऐकून घ्यावं, एवढच तिला हवयं. तिचं मौन, ‘ठीक आहे’ हे शब्द म्हणजे अंतःकरणातला आरडाओरडा असतो, पण नेमकं याकडेच दुर्लक्ष केलं जातयं. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं देवाकडं एकच आराधना व मागणंही..”हे गणराया, तू दुःखहर्ता, चिंतामणी आहेस ना?, मग या अस्तित्व खुडलेल्या स्रीला आनंदाचं दान दे ना..!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
कार्यकारी संपादक,साप्ताहिक साहित्यगंध



