कशा मनवणार आता …त्या ‘रूसलेल्या चांदण्या’; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे परीक्षण
कशा मनवणार आता …त्या ‘रूसलेल्या चांदण्या’; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे परीक्षण
सायंकाळच्या मनमोहक विलोभनीय दृश्यानंतर अवतरलेला तो किर्र रात्रीचा पहारा.. कुठून तरी रातकिड्यांचा किर्र किर्र असा येणारा आवाज अन् अशा शांत, एकांत, निरामय समयी केलेले आकाशाचे निरीक्षण, लुकलुकणारे तारे मोजण्याचा तो असफल पण मोह न आवरणारा प्रयत्न. हिशोब चुकला म्हणून पुन्हा नव्याने केलेली सुरूवात.. मगाच इथे एक चांदणी होती आता कुठे गेली? डोळ्यांचा तो भ्रम.. आणि त्यातून मिळणारा निर्भेळ आनंद.. कोणी कोणी अनुभवले आहेत हे प्रसंग? ज्यांनी अनुभवले आहेत ते खरेच नशिबवान आणि ज्यांना हा अनुभव घेताच आला नाही ते खरे कपाळकरंटे!
शुभ्र या चांदण्यात
नक्षत्रांना शोधणे
निसर्गाच्या कुशीत
मायेने निजणे
निर्मळ मन अन्
आठवांचे गोंदणे
किती आल्हाददायक! किती सुंदर तो अनुभव! आजही जशाचा तसा मनपटलावर उमटलेला.आठवांच्या प्रदेशात ताजातवाना राहिलेला.. काळ बदलला.. वेळ बदलली.. जीवनशैली बदलली. आधुनिकता आली आणि कुठे हरवल्या त्या लुकलुकणाऱ्या चांदण्या? कुठे हरवल्या असतील बरं? का त्यांची संख्या कमी दिसतेय? त्यांचे तेजस्वी रूप मलूल का झाले? कुठे लोप पावत चालले निसर्गाचे सौंदर्य?काय आहे या सर्व प्रश्नांचे उत्तर? कोणी सांगेल का? या प्रश्नांची उत्तरे आहेत का? हो… आहेत की.. दूरपर्यंत वाढलेली सिमेंटची जंगले आणि सतत चालू असणारा कृत्रिम प्रकाश. शहरीकरण असो की प्रत्येक गावात असो रात्रभर लाईट चालू असते आणि या कारणांमुळे त्या चांदण्या जणू रूसल्या आहेत.
त्या म्हणताहेत…मानवा, तुला कुठे गरज आहे आता आमच्या शितल प्रकाश अन् लुकलुकणाऱ्या सौंदर्याची? होतो की मग आता आम्ही लुप्त.. घे आनंद कृत्रिम गोष्टींचा. तू कृत्रिम गोष्टींत इतका हरवला आहेस की नैसर्गिक सौंदर्याला तू मुकला आहेस… आम्हाला कुतुहलाने पाहणारे कुठे आहेत ते डोळे? कुठे आहेस ते बालचमू जणू आपण शास्त्रज्ञ आहोत अशा आविर्भावात आमचे निरीक्षण करून चर्चा करणारे? आमच्या नक्षत्रांवर जगणारे ते जीवन कुठे लुप्त झाले? तुमची तक्रार करून उपयोग होणार असे वाटत नाही म्हणून आता आम्हीच हिरमुसलो आहोत.. त्या तुमच्या कृत्रिम भपकेबाज प्रकाशात आम्हाला नको वाटतो प्रवास.. मलूलपणे चालत असतो आम्ही एकाकी…
खरंच निसर्गाच्या निर्भेळ सौंदर्यातून मिळणारा निर्भेळ आनंद आपण हरवला आहे.कित्येकाने कित्येक दिवसांपासून रात्रीचे आकाशच पाहिले नसेल, ही वास्तवता नाकारता येत नाही. जणू निसर्गाचा प्रेमळ, संवेदनशील मानव हरवलाच आहे, कृत्रिम भपकेबाज जीवनात.तशाच मानवाच्या वृत्ती प्रवृत्तीही बदलत गेल्या आहेत. संवेदनशीलतेची जागा क्रुरतेने घेतली आहे.म्हणूनच तर त्या आकाशीच्या रूसलेल्या चांदण्या संवेदनशील मनाला खिजवत आहेत, आता कसे मनवणार आहात आम्हाला म्हणून….
असो.. आज मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचा विषय राहुल दादांनी ” रूसलेल्या चांदण्या” हा दिला आणि बालकाव्य समूहामध्ये वेगवेगळ्या कल्पनांना उधाण आले. सर्व आकाशाच्या तारांगणामध्ये जाऊन वेगवेगळ्या कल्पना जगून आले. बालकाव्य स्पर्धेचे परीक्षण लेखनाची मला संधी दिली त्याबद्दल राहुल दादांचे शतशः आभार! पुनश्च एकदा बालकविता लेखनासाठी बालकल्पनांमध्ये रमण्यासाठी सर्व शिलेदार बंधू-भगिनींना भरभरून शुभेच्छा! धन्यवाद!!
शर्मिला देशमुख -घुमरे
ता.केज जि. बीड
सहप्रशासक/ मुख्यपरीक्षक/लेखिका/ कवयित्री
मराठीचे शिलेदार समूह



