“गुदमरून मरण्यापेक्षा श्वासाचा उत्सव साजरा करणे कधीही हिताचे”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“गुदमरून मरण्यापेक्षा श्वासाचा उत्सव साजरा करणे कधीही हिताचे”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
अतिप्रिय आईस…
तू मायेचा डोंगर…..
दयेचा सागर….
आणि प्रेमाची घागर…
गेल्या नऊ महिन्यापासून मी तुझ्या उदरात होती. किती काळजी घेतलीस तू माझी, तुझ्यात आणि माझ्यातली नाळ सुद्धा धन्य झाली असेल. असंख्य वेदना, यातना सारं काही सहन करून माझा जन्म होतोय. आई आता मी माझा पहिला श्वास घेणार आहे. माझ्यासाठी हा खऱ्या अर्थाने “श्वासोत्सव” असेल. अगं आई.!!! मला कल्पना आली आहे, या बाह्य जगात फुकटचं मला काहीही मिळणार नाही. संघर्ष तर माझ्या पाचवीलाच पुजलेला असेल,परंतु तुला माहित आहे. मी तुझ्या उदरातून बाहेर येताच क्षणी मला आजन्म एक देणगी मिळणार आहे, तिही फुकट..आणि ती म्हणजे श्वास…हाच श्वास मला जिवंत ठेवणार आहे. ज्याक्षणी तो थांबला, सारं संपलं. ‘खरं तर अख्या आयुष्याचं गणित या श्वासावर अवलंबून आहे’. तुझ्या गर्भ संस्कारांमध्ये मी एक गोष्ट ऐकली आहे. “गुदमरून मरण्यापेक्षा श्वासाचा उत्सव साजरा करणे कधीही हिताचे” तेव्हा जोवर श्वास आहे मी जगेल…केवळ जगेलच असे नाही, तर जगण्याचा आनंद घेईल.
मी खूप मोठी होईल प्रत्येक श्वासासोबत येणारा आनंद माझ्या जीवनातील सकारात्मकता वाढवेल, अन् नव बळही देईल. मी कणखर बनेल आई…कारण माझ्या श्वासोत्सवाची पायाभरणी करणारी रणरागिनी तू आहेस.
“घेऊनी मोकळा श्वास, करू साजरा श्वासोत्सव..
न जाणे कधी संपेल गं, श्वासांचा हा आनंदोत्सव..”
मला कल्पना आहे आई… या युगात लचके तोडणारे, टवाळी करणारे, छेड काढणारे कमी नाहीत….तुला काळजी वाटणे साहजिकच आहे. पण तू निर्धास्त रहा… मी गर्भात असताना तू वाचलेले जिजाऊंचे चरित्र, राणी लक्ष्मीबाईंचा करारीपणा… सारं मला श्वासोत्सवासाठी अखंड प्रेरणा देईल… एकच चिंता वाटते ग आई ! मोकळा श्वास मला मिळणार का या बाह्य जगात? आधुनिकरणाच्या नावावर मानवाने निसर्गाचा किती ऱ्हास केलाय. प्रदूषण वाढले आहे, रोज झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे…कशी मिळणार मला शुद्ध हवा.?
सर्व सारस्वत दादा ताई…. ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने “श्वासोत्सव” हा विषय ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी दिला. रात्रीपासून विचारांचे चक्र डोक्यात फिरू लागले. त्याला वरुण राजाने पुरेपूर साथ दिली आणि माझा शब्दरुपी पाऊस तयार झाला,तुम्हाला भिजवण्यासाठी. बघा… “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे” हे माझे ब्रीद आहे. आजचा विषय कठीण होताच तरी तुम्ही सर्वांनी प्रयत्नपूर्वक विषयाला न्याय दिला. तुमच्यापैकी बहुतांशी यात यशस्वी देखील झालेत.
पण थोडे काही…… नवा शब्द हा संधी म्हणून जर तुम्ही घेतला, सातत्यपूर्ण लिहीत राहिलात, तर प्रगल्भतेच्या दिशेने वेगाने जात आहोत याची ही शाश्वती आहे. आपण एक दर्जेदार कवी, लेखक होणारच याबाबत मी जरा देखील सांशक नाही. आजचा हा विषय सर्वांनीच छान हाताळला, तेव्हा तुमचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा. सर्व विजेत्यांनी निकाल व सूचना वाचून सन्मानपत्रासाठी छायाचित्र पाठवावी. कारण तुमच्या काव्यरचनेचा ‘श्वास’ म्हणजे सन्मानपत्र होय.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



