दीक्षाभूमी’ महामानवाने समतेची मशाल पेटवलेली पावनभूमी; स्वाती मराडे
गुरूवारीय 'चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘दीक्षाभूमी’ महामानवाने समतेची मशाल पेटवलेली पावनभूमी; स्वाती मराडे
गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“विजयादशमी दिनी, गोड अनुभूती आली
नागपूर नगरीची माती, पावनभूमी झाली.’
हृदय उचंबळले, नेत्री भावना पाझरली
अनोख्या भावविश्वात, लाखो मने मोहरली..!”
सुमारे १२० फूट उंचीचा भव्य स्तूप, सांचीच्या स्तूपाप्रमाणे चारही दिशांना असलेले तोरणद्वार, त्यासमोर बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा कोरलेला खांब.. पाहताच मन उचंबळून येते. अनामिक भावनेने हृदय ओथंबून जाते, नयनात आनंदाश्रू तरळतात, देहाचा अणुरेणू प्रफुल्लित होतो.. ते केवळ त्याच्या भव्यतेमुळे नव्हे; तर त्या भूमीशी जोडलेल्या भावनिक नात्यामुळे. विजयादशमी आली की तो दिवस.. केवळ वर्णन वाचून किंवा ऐकूनही नजरेसमोर उभा राहतो. बाबासाहेबांच्या अनुयायांनी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व ही भूमी दिक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली. महामानवाने येथेच समतेची मशाल पेटवली. करूणेचा संदेश दिला. एकात्मतेची भावना जागृत केली.
मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला. रोमांचकारी तो अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवायला येथे दरवर्षी लाखो लोक भेट देतात. महामानवाचे चरण ज्या भूमीस लागले, त्या भूमीवर नतमस्तक व्हायला.. या भूमीने जपलेले ते पावित्र्य हृदयात भरून घ्यायला, जगण्यात नवा आशावाद निर्माण करायला, बाबासाहेबांच्या विचारांचे मनात स्फुल्लिंग पेटवायला, सुख, समाधान व तृप्ततेची अनुभूती मनात भरून घ्यायला.. आपोआपच पाऊल उचलले जाते नि मन धाव घेते. तनमनाने अगदी पावन होऊन जाते.. या पावनभूमीत!!
या भूमीबद्दल प्रचंड श्रद्धाभाव असणाऱ्या अनेकांसाठी हे श्रद्धामयी तिर्थक्षेत्रच आहे. त्यामुळेच या भूमीचं वेड आणि ओढ अनेकांच्या मनात चिरंतन आहे. देश परदेशातून लाखो लोक इथे धाव घेतात. यामुळेच जागतिक पर्यटन स्थळांमध्ये या भूमीस ‘अ’ दर्जा प्राप्त आहे. हे लिहिता लिहिता मला आठवले ते प्रसिद्ध गायक विठ्ठल उमप. त्यांची या भूमीवर एवढी श्रद्धा होती की, दरवर्षी ते इथं येतच होते पण अखेरचा श्वासही त्यांनी तिच्याच कुशीत घेतला. किती हा उच्च श्रद्धाभाव.. धन्य ती भूमी व धन्य तिची लेकरे..!
आज ही ‘पावनभूमी’ आठवण्याचे निमित्त म्हणजे विजयादशमी तर आहेच. पण समयसूचकता साधत ‘चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी आलेले चित्रदेखील होय. दिक्षाभूमीचे चित्र पाहिले नि इतिहासात मन फिरून आले. दिक्षाभूमीची भव्यता, तिच्याशी जोडलेली जनमानसाची नाळ.. यांचाही धांडोळा मनाने घेतला. बाबासाहेबांच्या प्रेमाखातर या वास्तूच्या प्रेमात पडलेला नागपूर नगरीत गेलेला प्रत्येकजण इथे नतमस्तक होऊन येतोच.
या पावनभूमीवर मग विजयादशमी हा सण जनसोहळा होतो. अनेक आठवणींना उजाळा देतो. हृदय अभिमानाने भारतो. शांततेने क्रांती घडवत सन्मानाचे माप भरभरून पदरात देतो. ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य मनामनात कोरतो. त्यामुळे या विषयावर अनेकांनी भरभरून लिहिले. केवळ लिहिलेच नाही तर या भूमीकडे वेगवेगळ्या नजरेतून पहात शब्दांना प्रवाही केले. दिक्षाभूमीवरील लोकांचा उत्साह लेखणीतूनही ओसंडला. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. ‘दिपोत्सव’ या दिवाळी अंकात आपणा सर्व सारस्वतांचा सहभाग असेलच यासाठीही शुभेच्छा. आदरणीय राहुलदादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
स्वाती मराडे,इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक,कवयित्री, लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



