शिक्षकांवर ‘टी ई टी’ सक्ती म्हणजे, ‘सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण; प्रशांत ठाकरे
शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
शिक्षकांवर ‘टी ई टी’ सक्ती म्हणजे, ‘सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण; प्रशांत ठाकरे
शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुःसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।
अशा अन्वर्थक शब्दांत भारतीय संस्कृतीने, गुरुवंदना करत गुरुविवषयी आदर व्यक्त केला आहे. व्यक्तीच्या जडणघडणीत आईवडिलांच्या बरोबरीचे गुरुलाही अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन काळात, आश्रमीय शिक्षण पद्धतीत गुरुगृही राहूनच विद्यासाधना करावी लागे. याज्ञवल्क्य, सांदिपनी अशा महान ऋषींचे आश्रम होते. या सर्वांचा समृद्ध वारसा चालवताना माझ्यासह आपल्यापैकी अनेक जण ज्ञानदानाचे पवित्र कार्य गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. पण सध्या आम्हाला जखडले आहे ते पात्र अपात्र या शब्दात.
सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी निर्णय दिला आहे की, इयत्ता १ ते ८ मधील शिक्षकांसाठी टी.ई.टी.परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. यात जे नव्याने दाखल होतील तेही व जे अनेक वर्षापासून सेवा देत आहेत ते या दोघांचाही समावेश करण्यात आला आहे.शिक्षकाने सातत्यपूर्ण ज्ञानार्जन करावे व नवनवीन तंत्रज्ञानाविषयी स्वतःला अवगत ठेवावं याविषयी मी पूर्णतः सकारात्मक आहे. परंतु अनेक वर्ष सेवा केल्यानंतर पुन्हा या परीक्षेला सामोरं जाणं म्हणजे सरकारला उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे. खरंतर हल्ली शिक्षक भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने व गुणवत्तेच्या आधारेच पार पडत आहे, असे असताना केवळ नवी शिक्षानिती डोळ्यासमोर ठेवून सरकारने घेतलेला हा निर्णय काही शिक्षकांवरती निश्चितच अन्यायकारक आहे.
पात्र – अपात्रतेच्या खोलात जेव्हा मी शिरलो; तेव्हा खोटी,बनावट अपंगत्वाची प्रमाणपत्र सादर करून अपंग सवलतीचा लाभ घेणारे कधीही खऱ्या अर्थाने शिक्षक होऊ शकत नाही. पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात जर असे प्रकार होत असतील तर, खऱ्या अर्थाने शिक्षणाची दुर्दशा आहे असे मला वाटते. हे सर्व जरी खरे असले तरी टी.इ.टी.संदर्भातले सरकारी आदेश समजून घेणे गरजेचे आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या आदेशानुसार २९ जुलै २०११ पूर्वी जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत त्यांची नोकरी आणि पदोन्नती सुरक्षित राहील, मात्र पुढील कोणत्याही नवीन पदोन्नतीसाठी त्यांना टी.इ.टी.परीक्षा अनिवार्य असेल.
दुसऱ्या मुद्द्यात २९ जुलै २०११ नंतर नियुक्त शिक्षकांना टी.ई.टी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. तर तिसऱ्या मुद्द्यात २०११ पूर्वी नियुक्त आणि नंतर पदोन्नत झालेल्या शिक्षकांची पदोन्नती आणि पद सुरक्षित राहील, परंतु भविष्यात कोणत्याही नवीन पदोन्नतीसाठी सुद्धा त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. असो कोणत्याही अडचणींना सामोरे जाणं हा मुळातच प्रत्येक शिक्षकाचा पिंड आहे, त्यामुळे इथूनही शिक्षक सही सलामत बाहेर पडतील हा माझा दुर्दम्य आत्मविश्वास आहे.
आज ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेसाठी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच कार्यरत असलेले ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘पात्र अपात्र’ हा विषय दिला व सर्वांना आपल्या भावना मोकळ्या करण्यासाठी व्यासपीठच उपलब्ध करून दिले. सर्वच समूहात आपापली मत मतांतरे प्रत्येकाने मांडली.निश्चितच हे एक योग्य व्यासपीठ यासाठी उपलब्ध झाले आणि प्रत्येकाने विषयाला योग्य न्याय दिला तेव्हा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. येणाऱ्या काळात तुमच्या हातून मराठी साहित्याची अशीच सेवा घडत राहो यासाठी शुभेच्छा.
धन्यवाद.
प्रशांत ठाकरे, सिलवासा (केंद्रशासित प्रदेश)
मुख्य परीक्षक, लेखक, समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



