‘आसुसले हे कान.. गोड बोलू या ना..!; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘आसुसले हे कान.. गोड बोलू या ना..!; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
संवाद.. हो संवादच ! जो लोप पावत चालला आहे .माणसं माणसाला बोलतच नाहीत हो .काय झालेय काय माहित आणि बोललीच तर दुसऱ्या ते तिसऱ्या वाक्याला भांडणाची सुरुवात आणि पाचव्या वाक्यापर्यंत तर अबोला..! खरंच आपले पूर्वज किती हुशार आणि दूरदृष्टी ठेवून होते. सर्व भारतीय सणांची निर्मिती निसर्ग, वातावरण , आरोग्य,आहार , विहार , मानवी आवश्यकता ,नातेसंबंध व आवड निवड अरे किती गोष्टींचा मेळ साधून रीती-परंपरांची , सणांची निर्मिती केली त्यांनी. खरे तर, आपण त्यांचे आभारच मानायला हवे.
आज त्यातीलच मकर संक्रांतीचा सण. या सणाला मोठ्यांनी लहानांना तिळगुळ देऊन आशीर्वाद रुपी मोलाचा संदेश द्यायचा असतो .आजच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दिवस तिळा तीळाने मोठा होऊन रात्र लहान होत जाते. सूर्याचे उत्तरायण याच दिवशी सुरू होते. आज संवादाचीच नाही; तर सुसंवादाची गरज आहे. सोशल मीडियाच्या या दुनियेत माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. आजच मी एक वाक्य वाचले…
‘तुम्ही तिळगुळ वाटा , नाही तर हत्तीवरून साखर वाटा,
माणूस तेव्हाच गोड बोलणार, जेव्हा त्याला असते “गरज”
अंतर्मुख करणारे हे वाक्य. खरंच माणूस इतका स्वार्थी का बनत चालला आहे. सध्या बोलण्याचा ही विपरीत अर्थ घेतले जात आहेत. आज मोठ्यांचेच नाही तर लहान लहान मुलांचे संवाद ऐका. ते एकमेकांशी प्रेमाने बोलतच नाहीत. त्यांच्यामध्येही अरेरावीची भाषा आढळते. सहनशीलता तर लोपच पावली आहे. आदर ,प्रेम ,माया , निस्वार्थी वृत्ती, सेवा भाव, कामसू वृत्ती, आनंद ,नात्यातील आपलेपण ,गोडवा या गोष्टी जणू चिमुकल्यांपासून कोसो दूर गेल्या आहेत. उठता बसता ही चिमुकली सोशल मीडियावरील डायलॉग मारत असतात . ऐकून मन सुन्न होते.
‘चला आपणच गोड बोलायला सुरुवात करूया’. समोरची व्यक्ती चिडली तर “गोड बोलू या ना” या वाक्याचा वापर करून पाहूया. नक्कीच तिळगुळापेक्षाही मिठास या वाक्याने पसरेल असे मला वाटते.कारण गोड शब्द ऐकण्यासाठी सर्वांचेच कान आसुसलेले असतात. आज राहुल दादांनी “गोड बोलू या ना” हा विषय मुद्दामच दिला असावा आणि खरंच जाणीव झाली या विषयाची. या बोलण्यातील संस्काराची किती नितांत आवश्यकता आहे हे लक्षात आले.आज मकर संक्रांतीच्या धामधुमीत ही बऱ्याच शिलेदारांनी ‘गोड बोलूया ना’ या विषयावर लेखन केले. पतंग उडवण्याचा, तिळगुळ वाटण्याचा आनंद घेतला आणि समूहात तिळगुळाचा गोडवा पसरवला. राहुल दादांनी मला परीक्षण लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल मनस्वी आभार. सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला .तूर्तास थांबते. धन्यवाद….!!!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्य परीक्षक/लेखिका/कवयित्री/सहप्रशासक
मराठीचे शिलेदार समूह