जीवनात नवनवे अनुभव आणि मजा घेऊन येते, ती..फजिती: शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' काव्यस्पर्धेचे परीक्षण

जीवनात नवनवे अनुभव आणि मजा घेऊन येते, ती..फजिती: शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ काव्यस्पर्धेचे परीक्षण
राजा असो कि रंक
जीवनात चढ उतार येतोच
लहान मोठ्या फजितीचा
एक तरी अनुभव मिळतोच…
फजिती….होय फजितीच. कधी हसायला लावणारी तर कधी रडायला लावणारी. प्रत्येकाच्या जीवनात असतेच ठरलेली. एक नवा अनुभव घेऊन बहरलेली. हसत खेळत जीवन म्हणजे काय शिकवणारी. लहान असो की मोठा सगळ्यांनाच घेऊन चालणारी. गरीब श्रीमंतीचा भेद मिटवणारी. जणू प्रत्येकाच्या जीवनात नजर ठेवूनच चालणारी. संधी मिळताच जीवनात प्रवेश करणारी. कधी कधी चेहऱ्यावर हसू पसरवणारी. हसता हसता डोळ्यात अश्रू आणणारी. कितीही टाळले तरी सोबत जगणारी…. अशी ती फजिती.
“फजिती” असा एक शब्द आहे की प्रत्येकालाच आपल्या जीवनामधील कोणता ना कोणता प्रसंग आठवण करून देणारा. एखादी महत्त्वपूर्ण वस्तू तुटावी आणि ती जोडताना तिचे आणखीनच नुकसान व्हावे. एक धागा उसवलेला जोडताना दुसरीकडेच वस्त्राने फाटावे, एक संकट समोर आले तर त्या संकटाने दहा संकटे सोबत आणावीत आणि व्यक्तीने त्यातून तावून सुलाखून निघावे अशीच ही फजिती. लहान मोठ्या फजिती मधून मानव खूप काही शिकत असतो. अनुभवाची खाणच जणू ती. अशी ही फजिती आज मंगळवारी बालकाव्य स्पर्धेमध्ये अवतरली आणि हा हा म्हणता समूहामध्ये धुमाकूळ घालून गेली.
या फजितीने मानवच काय जंगलाचा राजा तसेच इतर प्राणी पक्षी यांनाही सोडले नाही. काही बोधकथा बालकाव्याचे रूप घेऊन अवतरल्या. समूहातील बालमनाला हसवण्यासाठीच जणू त्या आल्या होत्या असा भास झाल्यावाचून राहिला नाही. पावसाची रिपरिप आणि त्यामुळे चालताना चप्पल मुळे पाठीमागे अंगावर उमटणारी नक्षी आणि पाय घसरून धपकन पडणे, म्हणजे फजितीचा कहरच.
लहान असो की मोठे सर्वांच्या जीवनामध्ये ही फजिती येतच असते. गरीब श्रीमंतीचा भेद न करता हा चिखल अंगावर उडत असतो तसेच कर्माचे फळ म्हणून म्हणा किंवा जगण्यातील निष्काळजीपणा म्हणून ही फजिती प्रत्येकाच्या वाट्याला येतच असते. खरं म्हणजे या फजितीतून खूप काही मोठे धडे जीवनामध्ये शिकायला भेटतात. छोट्या छोट्या फजितीतून मोठे मोठे अनुभव येतात. माणसाला जीवन जगण्यासाठी तयार करण्यासाठी जणू ही फजिती आयुष्यात येत असते.
आज बालकाव्य लिखाणाची अशीच फजिती सुरू झाली. विविध कल्पनांना शब्दरूप देताना त्यातली त्यात बालकाव्य लिहिताना होणारी कसरत रचनांमधून आढळून आली. लेखनाची शुद्धता आणि बालपणात जाऊन स्वतः सान होऊन लिहिण्याचा शिलेदारांचा प्रयत्न प्रशंसनीय असला तरीही पूर्णपणे बालकाव्यात जगणे काही शिलेदारांना थोडेसे कठीण जात आहे, तरीही त्यांचा प्रयत्न हा वाखाणण्याजोगा. नक्कीच सर्वच शिलेदार काही दिवसांमध्ये बालकवी म्हणून ख्याती पावतील या मनीच्या मनिषा व शुभेच्छासह लेखणीस विराम देते. राहुल दादांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद….!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
सहप्रशासक/संकलक/मुख्य परीक्षक
मराठीचे शिलेदार समूह