संघर्षातून इतिहास मांडणारी ‘संघर्षगाथा’ एक नवसंजीवनी; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
संघर्षातून इतिहास मांडणारी ‘संघर्षगाथा’ एक नवसंजीवनी; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
भारताच्या हरियाणा मधील एका छोट्या गावात जन्मलेले ‘प्रदीप सिंह’ यांचे वडील सुखबीर सिंह हे एक पेट्रोल पंपावर कामाला होते. नोकरी जरी लहान होती, तरी त्यांचे मुलाबाबत स्वप्न फार मोठे होते. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. “माझा मुलगा मोठा अधिकारी व्हावा” यासाठी वडिलांनी एक धाडसी निर्णय घेतला. मुलाच्या शिक्षणासाठी आपलं हक्काचं राहतं घर विकलं आणि प्रदीपला दिल्लीला पाठवलं. प्रदीपनेही वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत, स्वतःला एका ध्येयासाठी झोकून घेतलं व पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये संपूर्ण देशात २६ वा क्रमांक पटकावला. प्रदीपची ही “यशोगाथा” खरी “संघर्षगाथा” आहे. आपल्या देशात असे अनेक नरवीर आहेत ज्यांनी संघर्षातून इतिहास घडवला.
‘संघर्षगाथा’ हा एक प्रेरणादायी प्रवास आहे. संघर्षगाथा म्हणजे, “संघर्षाच्या मार्गावर अविरत चालणं आणि यश मिळवणं”. तसं तर संघर्ष हे जीवनाचं दुसरं नाव आहे. कुणाला आर्थिक, शारीरिक, मानसिक तर कुणाला सामाजिक, कौटुंबिक संघर्ष करावा लागतो. भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील अन्यायाविरुद्ध जोरदार लढा देऊन कित्येक लोकांच्या जीवनात प्रकाश आणला, ती संघर्षगाथा आजही लोकांच्या स्मरणात आहे. स्वामी विवेकानंदांच्या संघर्षगाथेतून विचार व आत्मशक्तीच्या आधारावर भारतीय तत्त्वज्ञानाला जगात ओळख मिळवून दिली.
आजन्म संघर्षगाथा कपाळी लिहिलेला माझा बळीराजा… कुठे दुष्काळात होरपळतोय तर कुठे अतिवृष्टीने रडतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच संघर्षगाथेच्या जोरावर गनिमांना अक्षरशः रडवले. उणे तापमानात भारत मातेचे रक्षण करणारे वीर जवान रोजच कपाळी संघर्षगाथा लिहून बाहेर पडतात. घरी असणाऱ्या त्या वीर पत्नीच्या कपाळाचे कुंकू रोजचीच संघर्षगाथा नव्याने लिहते. महात्मा गांधींनी सुद्धा आयुष्याची संघर्षगाथा लिहिली आणि इंग्रजांना आपल्या देशातून हुसकावून लावलं.जगात संघर्ष कोणाला चुकत नाही, शून्यातून विश्व निर्माण करण्याचे सामर्थ्य बाळगणाऱ्यांच्या नशिबी तर तो अधिक असतो आणि अशीच ध्येयवेडी माणसं जीवनात पुढे जातात.
आज अशी संघर्षगाथा आठवायचं कारण म्हणजे, ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘संघर्षगाथा’ हा विषय दिला आणि सर्वच काव्यरसिकांना आपल्या जीवनातले अनेक संघर्ष निश्चितच आठवले. या सर्व संघर्षांना कवितेत बांधण्याची सुवर्णसंधी आम्हा सर्वांना आज उपलब्ध करून दिली. अर्थात यात आपल्यातील बहुतांशी यशस्वीही झालेत अनेक सुंदर रचना आज सर्वच समूहात पहावयास मिळाल्या. तेव्हा तुम्हा सर्व कवी, कवयित्रींचे मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.
पण थोडं काही… पुन्हा एकदा मी म्हणेन..कविता अंतःकरणातून यावी, मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना ती स्पर्श करणारी असावी, त्यांच्या दुःखांना वाचा फोडणारी क्रांतीचे गीत गाणारी असावी, कधी हळहळणारी तर कधी जगण्यास उभारी देणारी असावी. कुणी काहीही म्हणो पण कविता ही नेहमी प्रेरणा देणारी असावी.धन्यवाद…!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



