आरसीएफ शाळा, कुरुळ येथे आगरी समाज संस्थेचा करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

आरसीएफ शाळा, कुरुळ येथे आगरी समाज संस्थेचा करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज मिडीया
अलिबाग/कुरुळ, (दि. १ ऑगस्ट) : आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या वतीने आरसीएफ शाळा, कुरुळ येथे इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन” कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूण ८३ विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आगरी समाज संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. रक्तदान शिबिरे, विद्यार्थी विकास उपक्रम, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती आणि शैक्षणिक अभियान यांसारख्या कार्यांचा परिचय करून देत संस्थेच्या समाजाभिमुख वाटचालीची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील यांनी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविषयी गौरवोद्गार काढले. अनेक महिन्यांपासून नियमित वेतन मिळत नसतानाही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निष्ठेने अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याला त्यांनी सलाम केला. त्यांच्या आवाहनानंतर उपस्थित विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात शिक्षकांना मानवंदना दिली. तसेच शिक्षकांवर विश्वास ठेवणाऱ्या पालकांचे आणि विद्यार्थ्यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. हा क्षण संपूर्ण कार्यक्रमातील अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.
यानंतर सौ. शुभांगी म्हात्रे यांनी “परीक्षेला आत्मविश्वासाने कसे सामोरे जावे”, व्यक्तिमत्त्व विकास आणि वेळेचे नियोजन या विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले. यशस्वी होण्यासाठी शिस्त, प्रामाणिकपणा, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
श्री. मिलिंद धोदरे यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती दिली. लष्कर, वैद्यकीय, अभियांत्रिकी, विज्ञान-तंत्रज्ञान, वाणिज्य, कला तसेच इतर उदयोन्मुख क्षेत्रांमधील संधींची माहिती देत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार करिअरची दिशा निवडावी, असे आवाहन केले. तसेच उच्च शिक्षणासाठी उपलब्ध शैक्षणिक कर्ज योजना, आवश्यक कागदपत्रे आणि त्यासाठीची प्रक्रिया याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान इयत्ता ९ वी व ११ वीमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच आरसीएफ शाळेचा आगरी समाज संस्थेच्या गौरवचिन्हाने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या सोनचाफ्याच्या रोपारोपणाने करण्यात आली. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. “सोनचाफ्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी ज्ञान, संस्कार आणि यशाच्या सुगंधाने समाजात बहरू दे,” अशा शुभेच्छा आगरी समाज संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आल्या.
या प्रसंगी आगरी समाज संस्थेचे शैक्षणिक उपक्रम प्रमुख श्री. मिलिंद धोदरे, सौ. शुभांगी म्हात्रे, श्री. जयवंत पाटील, श्री. अंकुश पाटील, कु. श्रेयस ठाकूर, सहसचिव श्री. उदय म्हात्रे, सचिव श्री. प्रभाकर ठाकूर आणि अध्यक्ष श्री. निलेश पाटील उपस्थित होते.
आगरी समाज संस्थेच्या करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन अभियानांतर्गत आतापर्यंत १० शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हे मार्गदर्शन सत्र यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले असून ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. अलिबाग, मुरूड, पेण आणि उरण तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे अभियान सातत्याने पोहोचत असून विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशा देण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे.



