सुंदर मी होणार
संगिता रामटेके-भोवते
सुंदर मी होणार
“नव्या तनुचे, नव्या मनुचे, पंख मला फुटणार
सुंदर मी होणार, सुंदर मी होणार…” सुंदर मी होणार या नाटकातील ही पु.ल.देशपांडे ह्यांची कविता. अतिशय सुंदर आणि भावपूर्ण रचना आहे. “मृत्यू म्हणजे वसंत माझा, मजवरती फुलणार, सुंदर मी होणार…सुंदर मी होणार” मृत्यूला वसंत का बरं म्हटले असेल ?कारण नाटकातील नायिका ही दोन्ही पायांनी अधू होती, नुकतेच तिने तारूण्यात पदार्पण केले होते . परंतु अजुनपर्यंत ती खोलीच्या बाहेर पडली नव्हती आणि तिला आता घरच्या लोकांवर सततचं दुखणं बनून राहणं नको होतं, म्हणून मृत्यूला कवटाळणे म्हणजे आयुष्याची अंतिम सुंदरता गाठणे होय असे तिला वाटले. शारीरिक व्यंग असेल आणि मनाला उभारी देणारा कुणी नसून हिणवणारे, तू कशी आमच्यावर भार आहे हे सांगणारे आसपास लोक असले की माणूस मनाने कमकुवत होत जातो. अर्ध मरण त्याला तिथेच येते. त्याची जीवनकांक्षा जर्जर होते. प्रेरणा ही सगळ्यांना पुढे जाण्याची इच्छा निर्माण करते. नवी उर्मी, शक्ती प्रदान करते.
शरीर सुंदर असणे आणि नसणे दोन्ही गोष्टी माणसाच्या आत्मविश्वासावर परिणाम करतात. खरंच एखादी व्यक्ती सुंदर असली, गोरीपान, उंच, नाकी डोळी नीटस असली की तिच्यात तिच्या सौंदर्यामुळे आधीच असलेला आत्मविश्वास दुणावतो आणि तीच व्यक्ती जर देखणी नसेल तर माझा, माझ्या रूपाचा काहीच प्रभाव पडणार नाही म्हणून त्या व्यक्तीचा आत्मविश्वास ढासळतो. परंतु नुसतं दिसायला उजवं असलं आणि बुद्धीने शून्य असलं तर ते सौंदर्य शून्य ठरतं म्हणून नुसतं सौंदर्याची लालसा करण्यापेक्षा बुद्धीचं सौंदर्य वाढवणं अधिक योग्य आणि नुसतं ज्ञानाने माणूस परिपूर्ण कुठे होतो? ज्ञान तुम्हाला पद प्रतिष्ठा मान सन्मान मिळवून देणार.पण चांगलं सुंदर, सुसंस्कारित मन तुमचं पद प्रतिष्ठा टिकवून समाजात तुम्हाला सुयोग्य नागरिक म्हणून भुषवणार. त्यामुळे…
असेल जरी सुंदर तन
मनाची सुंदरता त्याहुनी मोठी
समाजात माणूस म्हणून जगण्यासाठी..
एकदा बसमध्ये प्रवास करताना शाळेतील मुली चढल्या. माध्यमिकच्या असतील. प्रत्येकीने एक पोनी, समोर केसांची बट गालावर रूळत राहील अशी ठेवलेली, डोळ्यांत काजळ, ओठांवर लिपस्टिक युनिफॉर्म घातलेल्या, पाठीवर बॅग अशा शाळेत निघाल्या होत्या. आधीच सगळ्या सुंदर दिसत होत्या. मग त्यांना शाळेत जाताना लिपस्टिक, काजळ, केसांची बट हे सगळं करून जाणं आवश्यक होतं का? आता मात्र मी तुम्हाला १८५७चा विचार करणारी वाटत असेल पण मुली शाळेत जात होत्या आणि शाळेत जाताना साधं आणि सोज्वळ रूप आणि मन घेऊन जाणं योग्य नाही का?
असो, या वयात मुली अजून सुंदर कशी दिसेल याच गोष्टीवर अधिक भर देतात. म्हणजे मनात सारखं ‘सुंदर मी होणार’ हेच घोळत असणार. आजकाल कपडे आणि दिसणे यावरून व्यक्तीला महत्त्व दिले जाते, जे मला अयोग्य वाटते सुंदर असो, जेमतेम असो, किंवा कुरूप असो..ज्याचे मन सुंदर आणि संस्कारीत असेल, तोच खरा सुंदर आणि श्रीमंत असतो. तेव्हाच ‘सुंदर मी होणार’ ही संकल्पना साकार होईल.
संगिता रामटेके-भोवते
ता.साकोली,भंडारा.
=========



