“पसायदान निरूपण ओवी : १”
सौ. अनिता व्यवहारे
“पसायदान निरूपण ओवी : १”
आता विश्वात्मके देवे |येणे वाग्यज्ञे तोषावे ||
तोषूनि मज द्यावे पसायदान हे ||
“जे जे जगी जगते, तया माझे म्हणा करुणा करा”. वैदिक संस्कृतीत ज्यावेळी एखादा यज्ञ सिद्धी जातो, त्यावेळी अखिल सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी संतांकडून अशा प्रार्थना केल्या जातात. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक,योगी व तत्वज्ञ म्हणून असलेले संत ज्ञानेश्वर वयाच्या सोळा वर्षाच्या अल्प आयुष्यात त्यांनी भगवद्गीतेवरील भाष्य करणारा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या विचारात अद्वैतवादी वेदांत तत्वज्ञान आणि भक्ती योगावर विशेष भर दिलेला दिसून येतो.
सर्व जीवांचा हो उद्धार दया क्षमा प्रेम हेच आधार
सर्वत्र नांदो सत्य धर्माचा मान
ज्ञानोबा माऊलीने मागितले हे पसायदान….
‘पसायदान’ म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी केलेली विश्वाच्या कल्याणासाठीची प्रार्थना. पसायदान हे केवळ प्रार्थना नसून ते सर्व धर्माचे प्रतीक मानले जाते, त्यामुळेच संत वाङ्मयमयातील ते जोमय कौस्तुभमणी शोभता तसंत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी म्हणजे जणू अमृताचा सागर अशा या अथांग सागऱ्याच्या किनारी पोहोचताच विश्वाशी एकरूप होऊन मागितलेले मागणे म्हणजे पसायदान. हे मोठे वेधक बोधक,आनंददायक आहे. तसेच ते इतरांपेक्षा वेगळेही आहे. आपण देवाकडे मागणे मागतो हे देवा मला हे दे..!. ते दे…! सुखी ठेव…! अर्थात हे सगळं आपल्या स्वार्थासाठी.. आणि स्वार्थासाठी मागायला शिकवावे लागत नाही.
पण ‘सर्वे.. ss… पि सुखी न: संतु’ , असे मागायला मन मोठे असावे लागते. देवाजवळ मोठ्या भक्तांनी देखील स्वतःसाठीच काहीतरी मागितल्याची अनेक उदाहरणं आहेत. ध्रुवाने तप केले आणि त्याला विष्णू प्रसन्न झाले. तेव्हा ध्रुवाने मागितले, देवा मला अढळ स्थान दे.. अर्थात ध्रुव हा बालक होता, अजाण होता पण अमरीष तर ज्ञानी होता. त्याने देवाजवळ मागितले, “देवा तुझ्यासारखा पुत्र मला दे.” कुंतीने स्वतःला देवाचा विसर पडू नये म्हणून देवाकडे मागितले, देवा आमच्यावर नेहमी संकटे येवोत म्हणजे तुझे स्मरण राहील. सावित्रीने मोठ्या युक्त्या प्रयुक्त्या करून ‘पती पुन्हा जिवंत व्हावा’ असेच मागितले. त्यानंतर मोठे मोठे तपस्व्यांनी मी नंतर…आपले…आपण.. फार तर आपल्या परिवाराचे सुख मागितले. पण ज्ञानेश्वरांनी..
“आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे”
हे पसायदान प्राणिमात्रांच्या, भूमात्रांच्या कल्याणासाठी मागितले. देवा लोकांना सर्व सुख प्राप्त होऊन त्यांची परमात्म्यावरील भक्ती अखंड राहो अशी खरी प्रार्थना जगासाठी असायला हवी. आधी साऱ्यांचा कळवळा हवा मग परमेश्वर प्रसन्न होईल व त्या कळवळ्यातून जी प्रार्थना ओठावर उमटेल ती साऱ्या जगासाठी असेल. निस्वार्थी मनाची ही भावनाच ‘देवा सर्वांचे कल्याण कर’ अशी होईल यासाठी यज्ञ करावा लागतो. यज्ञांनी देव संतुष्ट होतो व प्रसाद देतो असे शास्त्र सांगते म्हणूनच ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्ञानयज्ञ,देवाचे ध्यान करण्यासाठी ध्यानयज्ञ आणि ज्ञानेश्वरांनी केला तो वाग्यज्ञ म्हणजे वाणीरूपी यज्ञ.आपल्या वाणीतून देवांची गुण संकीर्तन करायचे, त्यांच्या लीला वर्णन करायच्या.. उपदेश समजून सांगायचे.
नामजपचा यज्ञ हा ही वाग्यज्ञचं. तो नामजपातून लोकांना समजावून द्यायचा. हाच वाणी रुपीयज्ञ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने कथन केला आहे. ज्ञानेश्वराच्या अंतिम पसायदानी आलेली प्रार्थना त्यांनी आपल्या देवाकडे केली, तो देव कोणता? तर ‘आता विश्वात्मकु हा माझा स्वामी निवृत्ती राजा’, जो आत्मज्ञा नाने परिपूर्ण अतिशय विद्वान महापुरुष म्हणजे निवृत्तीनाथ… ज्ञानेश्वरांचे सद्गुरु.त्यांनीच या यज्ञाने न संतुष्ट होऊन आपणास पसायदान द्यावे ही ज्ञानेश्वरांची पहिली प्रार्थना,आजही तितकं तितकीच मंगलदायी आणि पवित्रमय म्हणून मानली जाते. तेव्हा त्यातली विश्वात्मकता विश्वरूप पुढील ओवीतून पाहू या…..!! (क्रमशः….)
सौ. अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
======



