सौंदर्यवान रुपाली (भाग-2)
कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, जि.नागपूर
सौंदर्यवान रुपाली (भाग-2)
रुपालीचे अण्णा सांगत, ‘मास्तरांनी लहानपणी गरीबीमुळे शिक्षणासाठी अतिशय कष्ट केलेत, अत्यंत सच्चा व प्रामाणिक म्हणून गावात ख्याती होती’. आणि म्हणूनच की काय आपला मुलगा मयूरला सुध्दा सर्वागीण शिक्षण देण्यासाठी एकवटून मास्तरांनी मुलावर खर्च केले. बुध्दीमान व सुशीलपणाच्या बाबतीत मयूरचेच नाव लोक काढीत. पण आज कुणाला तोंड दाखवायची लाज वाटत असल्यामुळेच आईबापांचे मन दुखवून तो नाहीसा झाला होता.
नको मेली लहानपणीची आठवण, नुसती जीवाला हुरहुर लागून असते.चटका एकदाच लागतो, पण अंतःकरणाची चुरचुर दिवसभर सपंत नाही. रुपाली म्हणते,लहानपणी एखादा सुटीत मयुर आमच्या घरी येई आणि चारपाच दिवस राही.तो काळ आनंदात जात असे तो जाताना आणखी एकदोन दिवस राहा मी आवर्जून म्हणायचे तेव्हा आई मला रागा भरे. पुन्हा केव्हा येशील हे विचारायला मी विसरत नसे. तो जाताना गॅलरीत त्याला दिसेनासा होईपर्यंत बघायचं वेड कि खुळ कळेना, लहानपणी वेगळीच प्रतिक्षा मयूर आला की,मी, माझा भाऊ, शेजारील वेणू व मयूर आम्ही विटीदांडू, लप्पाछपी, लंगोरी, असे कितीतरी खेळ खेळायचो,आम्ही दोघेही आता हळूहळू मोठे होत होतो.
आता तो पूर्वी सारखा चारपाच दिवस राहत नव्हता. पण आम्हा दोघांना एकमेकाला पाहण्याची कुठेतरी आस असायची. हळूहळू शिक्षणामुळे मयूरचे येणे कमी झाले. मी यौवनात आले आणि अचानक एके दिवशी मयूर घरी आला. मी काॅलेजला निघणार होते त्याच्या ते लक्षात आले आईनी चहा ठेवला. माझी लगबग बघून मयूर आईला म्हणाला “निघते मी ” आई म्हणाली “इतक्या लवकर” होय सहजचं आलोय, मी निघून थोड्या अंतरावर चालून जाताच मागून लगबगीने मयूर आला व म्हणाला “कशी आहेस तू?” इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. मनात कळी उमलत होती वाटत होतं काॅलेज येऊच नये, मी म्हटले “आजकाल तू पूर्वीप्रमाणे येत नाहीस” मयूर म्हणाला “आठवण तर खुप येतय, पण अभ्यास व घराच्या कामातील जबाबदारीमुळे वेळ मिळत नाही,आणि मास्तरांना पण बर नसतयं ” काॅलेज आलयं मी त्याला जाताना बघत राहिले त्यांनी मागे वळून हात हलविला. उधळलेल्या तरुण मनात काय काय येईल याची आकडेमोड कशी करता येईल.
प्रेम करणे फार सोपे आहे. नंतर मैत्रीणी कुजबूज करायच्या कोण गं तो? मी सांगत असे चुलत मामेभाऊ आहे. पण सांगतानाही कुठल्या तरी स्वप्नात असायची. दिवसामागून दिवस चालले होते.अण्णा ना कुठूनतरी निरोप आला व तिसऱ्याच दिवशी पाहुणे घरी पोहचलेत मनात नसताना चहापोहे झालेत पाहण्याचा कार्यक्रम आटोपला.तिकडून आईबाबा ना घरापर्यंतचे बोलवणे आले मुलगा कुठल्या कार्यालयात लिपीक होता.घरचे बरे होते अण्णानी होकार दिला लग्नांची तारीख निघाली. मी मयुर इतक्यात कधीतरी येईल असे वाटले पण नेहमी मणासारखे होत नसतं अश्रू नयनातच ओरगळू लागले.
परत लहानपणीच्या गोष्टी आठवू लागल्यात आम्ही राहत होतो त्या घराला मागील दारी अंगण होते आणि त्या अंगणात एक मोठे बकुळीचे झाड होते त्याची गळलेली फुले आम्ही वेचीत होतो. देवबाप्पा ला हार करावा म्हणून पण आमच्या आधीच आई पहाटे उठून आई हार बनवून घेई, या फुलाचे काय करावे म्हणून मयूर ला मी म्हणत असायची ” तुला देऊ का छानसा गुच्छ करून” तो उत्तर देई ” काही नको, जवळ बाळगायचे श्रम कशाला तुझ्या वेणीतल्या फुलांचा नाही का मला वाटेल तेव्हा वास घेता येत ?” बकुळीच्या फुलांचा जवळून सुगंध गोड येतो. मयूर म्हणायचा ” रूपाली खरोखर हा या फुलांचा वास येतो आहे,का तुझ्या केसांचाच वास आहे इतका सुंदर? ” माझे लग्न झाले दोन-तीन वर्षापूर्वी त्याला कितीतरी मुली सांगून आल्या सर्वानी जंग पछाडले पण ” मी आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली आहे” असे त्यांना सर्वाना सांगून सोडले.
एकदा आईकडे मी माहेरी गेले असता मयूरचा शाळेतील मित्र वसंत, त्यांचे वडील दामोधर काकांना अण्णानी घरी पूजेला बोलविलेत. ते भटजीचे काम करायचे तेव्हा त्याच्यासोबत वसंतची लहान बहिण घरी आली होती. आम्ही दोघे जवळ बसलोत मयूरच्या गोष्टी निघाल्यात.ती बोलता बोलता बोलली “वसंतभाऊनी मला मयूर दादाचं एक गुपीत सांगितलयं “मी तिची किती विनंवणी केली पण ती बोलली ” वसंतभाऊनं ती मला सांगितली व सांगताना कुणाला न सांगण्याची शपथ घेतलेली आहे.”
मी तिचे खूप मन वळविले. एकदाची खूप वेळानंतर ती तयार झाली ते हे की, तु हे गुपित कुणाला सांगू नकोस. बहिण सांगत होती, शाळेत मयूरचे एक लहानसे मित्रमंडळ होतं मित्राच्या गप्पात मयूर बोलून गेला की,” रूपाली मला खूप आवडते आम्ही बालपणी खेळायचो, तिच्याशिवाय मी दुसरीशी लग्न करणार नाही.” थांब मी स्वयंपाक घरात जाऊन येते म्हणून रुपाली उठली व मागील वऱ्हाडांयात बकुळीच्या फुलाकडे बघत रडू लागली. एकटीच काय करते इकडे ये म्हणून आईची हाक ऐकू आली डोळे नीट पुसून आत गेले मन म्हणतं होतयं “मयूरशी पुन्हा भेट कधी होणार की नाही ? (क्रमशः)
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, जि.नागपूर
=======



