धीर धरणं,जीवन जगण्याची कला”; वृंदा करमरकर
सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“धीर धरणं,जीवन जगण्याची कला”; वृंदा करमरकर
सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
नुकतीच घडलेली एक घटना आठवली.आमच्या शेजारी राहणाऱ्या भोसले यांचा अनिमिष हा दहावीत होता. खूप अभ्यासू होता. परीक्षेत उत्तम गुण घेणारा. त्याचा दहावीचा निकाल लागला.यत्याला सत्तर टक्के गुण मिळाले.याची अपेक्षा किमान 80 टक्क्यांची. घरी पालकांनी समजूत काढली. दुसऱ्या दिवशी बातमी धडकली.घरी आई वडील नसताना अनिमिषनं गळफास घेऊन आत्महत्या केली.काय हा आततयीपणा! आम्ही सगळेच हादरलो या बातमीनं!खरंच हे काही अपयश नव्हतेच.असा धीर खचला आणि हकनाक जीव गेला.यापुढे यश नक्की मिळाले असतेच.काय करायचं आई वडिलांनी आता?
‘धीर धरी रे धीरापोटी, फळे रसाळ गोमटी’ अशी एक प्रचलित उक्ती आहे. भगवद्गीतेत सहाव्या अध्यायात भगवंतांनी आत्मसंयम योग सांगितला आहे. त्यातील एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे. ‘मन हे चंचल आणि अस्थिर असल्यामुळे जिथे जिथे ते भरकटते, तेथून त्याला परत खेचून, आत्म्याच्या अधीन करावे. म्हणजेच मनावर पूर्ण संयम ठेवावा, ते भरकटले तरी पुन्हा शांतपणे केंद्रित करावे
“धीर तरी धर” – हे शब्द जरी सोपे वाटले, तरी त्यामागं जगण्याचं खरं तत्त्वज्ञान दडलेलं आहे. जीवनात प्रत्येकाला संघर्ष, अपयश, दुःख आणि अनपेक्षित संकटांचा सामना करावा लागतो. अशावेळी घाबरून न जाता, अश्रू गाळत न बसता,मनातलं वादळ शमवून शांत राहणं म्हणजेच “धीर धरणं”. धीर म्हणजे संयम, सहनशीलता आणि स्थैर्य. अशा क्षणी जी व्यक्ती मन शांत ठेवते, विचार करते ती योग्य निर्णय घेऊ शकते.धीर म्हणजे भावना आवरून, विवेक टिकवून, योग्य कृती करणं. कोणतीही स्थिती असो – परीक्षेतील अपयश, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, आर्थिक संकट, किंवा अन्य कठीण प्रसंग. ‘धीर धरल्याशिवाय त्यावर मात करता येत नाही.’
रामायणातील सीतामाईंनी लंकेत असताना धीर धरला, म्हणूनच ती संकटातून तरली. महाभारतात अर्जुन युद्धभूमी वर गांगरला होता, पण श्रीकृष्णानं त्याला धीर देऊन त्याचं मनोबल वाढवलं. या महान ग्रंथांमध्येही धीर धरण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. आजच्या काळातही हे तत्त्व तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेत कमी गुण मिळाले, तरी धीर धरावा. एखाद्या नात्यात दुरावा आला, तरी संयम बाळगून संवाद साधावा. आर्थिक अडचणींचा सामना करताना घाई न करता नीट विचार करून निर्णय घ्यावा.
धीर म्हणजे पळवाट नव्हे, तर प्रतिकूलतेत ठामपणं उभं राहण्याची ताकद आहे. धीर धरल्यामुळं माणूस अधिक परिपक्व होतो. त्याचं मन अधिक सशक्त बनतं. कारण धीर हा फक्त वर्तनात नसतो, तर तो आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात प्रतिबिंबित होतो.
“धीर तरी धर” हे केवळ सल्ला नसून, आयुष्य जगण्याची कला आहे. संकटं येणारच, पण त्यांच्यापुढे हार न मानता त्यांना सामोरं जाताना जर मनोबल ठेवता आलं, तर कुठलेही वादळ ओसरतं. म्हणूनच – धीर तरी धर… कारण प्रत्येक रात्रीनंतर उजाडणारी सकाळही असते.धीर हे संकटात उपयोगी पडणारं मनोबल आहे. भावनिक परिपक्वतेचं धीर धरणं हे प्रतीक आहे. जो माणूस संयमानं वागतो, तोच खऱ्या अर्थानं जीवनात यशस्वी होतो. धैर्य हे जीवनातील खरं बळ आहे, आणि ते अंगी बाणवणं गरजेचं आहे.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह





