Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखविदर्भ

“वरूण चक्रवातात किवींची वाताहत”; डॅा अनिल पावशेकर

'अगं बाई....अरेच्चा.....!

0 4 0 9 0 3

“वरूण चक्रवातात किवींची वाताहत”; डॅा अनिल पावशेकर

‘अगं बाई….अरेच्चा…..!

१९५६ ला प्रदर्शित छू मंतर या चित्रपटात एक गीत आहे, “तुम्ही ने दर्द दिया तुम्ही दवां देना गरीब जान के!”अगदी अशीच काही परिस्थिती भारतीय गोलंदाज वरूण चक्रवर्तीची दुबईच्या मैदानाबाबत होती. २० ऑक्टोबर २०२१ ला याच मैदानावर टी ट्वेंटीत पाक विरुद्ध पदार्पण केलेल्या वरूणची गोलंदाजीत झोळी रिती होती. तब्बल चार वर्षांचा वनवास भोगून त्याने चॅम्पियन्स ट्रॅाफीत झोकात पुनरागमन करत याच मैदानावर किवींचा अर्धा संघ गारद करत भारतीय संघाला शानदार विजय मिळवून दिला. कधीकाळी फिरकीवर रुसलेल्या दुबईच्या खेळपट्टीने अंतिम साखळी सामन्यात भारतीय गोलंदाजांवर भरभरून प्रेम करत न्युझीलंडच्या फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही.

झाले काय तर आयसीसी स्पर्धां म्हटली की किवी संघाला चेव येतो आणि भारतीय संघाविरूद्ध त्यांचा दबदबा असतो. इतरत्र निरुपद्रवी असणाऱ्या किवी संघाने टीम इंडियाला आयसीसी स्पर्धांमध्ये अनेकदा छळले आहे. तर नुकतेच त्यांनी आपल्याला कसोटीत व्हाईटवॅाश दिलेला होता. यामुळेच किवींचा वचपा काढणे गरजेचे होते. सुदैवाने या सामन्यात संघनिवड हा मास्टरस्ट्रोक ठरला. ध्यानीमनी नसताना हर्षित राणा ऐवजी वरूणची लॅाटरी लागली आणि त्याने पाच बळी घेत किवींची मैफिल लुटत आपली निवड सार्थ ठरवली.

या सामन्यात आपली सुरुवात निराशाजनक होती. अवघ्या तीस धावांत तीन बळी म्हणजे नमनाला घडाभर तेल होते. शुभमन पायचितात पकडल्या गेला तर रोहित त्याच्या आवडत्या पुल शॉटला मिसटाईम झाला. ३०० वा सामना खेळनार्या विराटची खेळी ग्लेन फिलिप्सने एक अफलातून झेल घेत संपुष्टात आणली. आपल्या संघाची बत्ती गुल होते की काय असे वाटतांनाच जनरेटर रूपी श्रेयस अय्यरने बाजू सांभाळली. सध्या श्रेयसची फलंदाजी टॅाप गियरला असून त्याची फटकेबाजी गोलंदाजांवर दादागिरी दाखवत आहे. क्रिझ चा सुरेख वापर करत त्याने वेगवान असो की फिरकी गोलंदाज, दोघांनाही चोपून काढले.

श्रेयसच्या दिमतीला मध्यफळीत अक्षर पटेल असल्याने लेफ्ट राईट कॅाम्बिनेशन प्रतिस्पर्धी संघाला डोकेदुखी ठरले आहे. ही ढाल तलवारची जोडी टीम इंडिया साठी संकटमोचक ठरली आहे. या जोडीने ९८ धावांची उत्कृष्ट भागीदारी करत आपल्या संघाचा टेम्पो कायम राखला. या व्यतिरिक्त श्रेयसने राहुलसोबत ४४ धावांची तर जडेजा सोबत ४१ धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले. अक्षर, श्रेयस बाद झाल्यावर राहुल, जडेजाने फारशी चमक दाखविली नाही परंतु हार्दिक पांड्याने फिनिशरची भूमिका निभावत ४५ धावांची खेळी करत भारताला जवळपास अडीचशे धावांचा पल्ला गाठून दिला.

किवींसाठी अडीचशेचे लक्ष्य थोडे चकवणारे होते. कारण खेळपट्टी फिरकीला अनुकूल होती, सोबतच आपल्या कडे चार कसलेले फिरकी गोलंदाज होते. त्यातही किवी फलंदाजांनी वरूणचा यापूर्वी सामना केला नसल्याने त्यांच्यासाठी तो भुलभुलैय्या होता. लढत अटीतटीची होणार यात वाद नव्हता परंतु सरस कामगिरी कोणता संघ बजावणार याची उत्सुकता होती. प्रारंभीच पांड्याने बोहणी केल्याने आपले काम सोपे झाले. कारण रविंद्र रचिनच्या अप्परकटचा कठीण झेल पकडत अक्षरने मैदानात विजयाचा वन्ही चेतवला. यानंतर आपल्या फिरकीपटूंनी अक्षरशः धुमाकूळ घालत किवी फलंदाजांची नाकेबंदी केली.

वरूण, कुलदीप, जडेजा आणि अक्षरच्या फिरकीपुढे विल यंग, डॅरेल मिशेल, टॅाम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिशेल ब्रेसवेल आणि कर्णधार सॅंटनर गोंधळले. त्यातच आपल्या फिरकीपटुंनी विकेट टू विकेट मारा केल्याने किवी फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करता आली नाही. केवळ केन विलियम्सने हा कठीण पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु तो एकटा कुठवर पुरणार. तो असेपर्यंत किवी संघ सामन्यात टिकून होता. मात्र डॅाट बॅालने धावा आटल्या, अपेक्षित सरासरी वाढत गेली आणि मोठ्या फटक्याच्या नादात त्यांचे गडी बाद होत गेले. शिस्तबद्ध फिरकीने चार फलंदाज पायचीत झाले तर तिघांचा त्रिफळा उडाला.

न्युझीलंडने सामना गमावल्याने ते उपांत्य फेरीत द.आफ्रिकेशी भिडणार तर आपला संघ कांगारूंशी. या सामन्यात किवी क्षेत्ररक्षकांनी झेल घेतांना अक्षरशः जीव ओतला. विशेषतः विराटचा फिलीप्सने आणि जडेजाचा विलियम्सने घेतलेले झेल अप्रतिम होते. जबरदस्त हॅंड आय कॅार्डीनेशन, कमालीचा फिटनेस आणि झेल पुर्ण करतांना दाखवलेला फॅालो थ्रू डोळ्याचे पारणे फेडणारा होता. विराटला त्याचा झेल घेतला गेला यावर विश्वास बसत नव्हता, त्यावेळी तो स्तिमित झाला होता. किवींच्या पराभवाला त्यांची फलंदाजी कारणीभूत ठरली. त्यांनी पाठलाग करतांना ३०/४० धावांच्या तीन भागीदार्या जरूर केल्या परंतु त्या पुरेशा नव्हत्या. विलियम्सचे शेवटपर्यंत टिकणे गरजेचे होते पण तो अक्षरच्या गोलंदाजीवर संयम ठेवू शकला नाही आणि आपल्या बरोबर संघाचाही घात करून बसला.

थोडक्यात काय तर स्पिन टू विन हा मंत्र वापरल्याने टीम इंडियाची सरशी झाली. मी पुन्हा येईन चा नारा लावत वरूणने किवींविरूद्ध बळींचा पंजा मारला. वरूणच्या चक्रवातात किवी संघाची वाताहत झाली. दहा पैकी नऊ बळी टिपत आपल्या फिरकीपटुंनी सामन्यात वर्चस्व गाजवले. भलेही शुभमन रोहित विराट या सामन्यात अपयशी ठरले परंतु श्रेयस अक्षर आणि पांड्याने त्यांची भरपाई केली. या विजयात राहुलचे यष्टीरक्षक ही कमजोर कडी वाटते. विशेषतः फिरकीसमोर त्याच्या यष्टीरक्षणातील भगदाड सहज दिसून येते. चेंडू आणि त्याच्या ग्लोव्हजचा जणुकाही ३६ चा आकडा आहे असे वाटते. त्यामुळे तिथे तज्ञ यष्टिरक्षक असणे संघासाठी महत्त्वाचे आहे. कारण पुढील लढत बलाढ्य कांगारूंसोबत आहे आणि तिथे क्षुल्लक चुक संघाचे चॅम्पियन्स ट्रॅाफी जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवू शकते. टीम इंडियाचे किवी विजयासाठी हार्दिक अभिनंदन!

दिनांक ०३ मार्च २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे