अंधार फार झाला… पणती जपून ठेवा…!
अनिता व्यवहारे ता.श्रीरामपूर जि. अहमदनगर
अंधार फार झाला… पणती जपून ठेवा…!
थोडा उजेड ठेवा…
अंधार फार झाला…
पणती जपून ठेवा…
अंधार फार झाला…!
सध्या जिकडे-तिकडे गतवर्षाला निरोप देत नववर्षाच्या प्रकाशपर्वाच्या किरणांनी वातावरण उजळविण्याचे दिवस सुरू आहेत. याच काळात विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा स्नेहसंमेलनाचा उत्सव साजरा होतो. अशीच अनेक वर्षांपूर्वी माझ्या शाळेतील स्नेहसंमेलनाची एक आठवण मनात डोकावली. माझ्या एका विद्यार्थ्याने गायनासाठी हीच प्रार्थना निवडली होती. त्या वयात त्याला त्यातील अर्थ कितपत उमगला असेल, हे सांगता येणार नाही; पण हे गीत त्याला मनापासून भावले होते.
आज या प्रार्थनेचा सखोल विचार केला, तर जाणवते की ही केवळ गीतरचना नाही; तर गहन तत्त्वज्ञानाचा संदेश देणारी सकारात्मक प्रार्थना आहे. अंधारातही आशा, प्रेम, मानवी मूल्ये जपण्याचा मार्ग ती आपल्याला दाखवते. आजच्या सामाजिक व वैयक्तिक आव्हानांवर भाष्य करणारी ही प्रार्थना आहे.
“आले चहुदिशांनी तुफान विस्मृतीचे
नाते जपून ठेवा, अंधार फार झाला”
या ओळींचा अर्थ अधिक खोल आहे. आपल्या धरतीवरील अंधाराचे युग आपोआप संपले नाही. उजेडाचा शोध घेण्यासाठी माणसाने सातत्याने प्रयत्न केले. एका क्षणी गारगोट्यांच्या घर्षणातून ठिणगी चमकली. त्या एका झगमगत्या बिंदूने अंधाराचा पडदा भेदला आणि मानवाच्या संस्कृतीचे प्रारब्ध बदलून गेले. अंधाऱ्या गुहांत राहणाऱ्या माणसांना त्या ठिणगीने एकत्र आणले. अग्नी प्रज्वलनाच्या तंत्रामुळे उष्णता व प्रकाश ही महत्त्वाची आयुधे त्याच्या हाती आली. त्याच बळावर माणसाने पृथ्वीवर आपली विजयमुद्रा उमटवली. तरीही संकटे संपली नाहीत. पण संकटांपुढे न झुकणारा माणूस, नियतीच्या सावलीत दबून जाणारा कसा असेल? म्हणूनच अंधाराला घाबरण्याचे कारण नाही. ‘कारण त्याच्या आशावादाला साथ देणारी एक छोटीशी पणती कायम त्याच्यासोबत असते’.
“वणव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची, स्वप्ने जपून ठेवा, अंधार फार झाला” अंधार माणसासाठी नवीन नाही. तो फक्त स्वरूप बदलत गेला आहे. कधी पारतंत्र्याच्या बुरख्यात, कधी अनिष्ट चालीरीती, अज्ञान, अंधश्रद्धा यांच्या रूपात. पुढे तो हिंसाचारात बदलला, भ्रष्टाचाराच्या रूपाने फोफावला. वैज्ञानिक प्रगतीवर त्याची सावली पडली आणि त्यातून जन्माला आलेली शस्त्रास्त्रेच त्याला विनाशाकडे घेऊन गेली.
भूकंप, महापूर असोत किंवा महानगरांत होणारे बॉम्बस्फोट-निरपराधांचे बळी जाऊ लागले.
आणि मग परिस्थिती अशी झाली की,
“हृदयात ठेवणाऱ्या जखमांतून
आता कंदील एक लावा…
अंधार फार झाला.”
या अंधारात माणूस हळूहळू दुष्प्रवृत्तींकडे झुकू लागला. जी गोष्ट मिळत नाही ती हिसकावण्याची वृत्ती वाढली. दुर्गुण, दुराचार यांचे साम्राज्य पसरले. जीवन पाप–पुण्याची बेरीज असली, तरी पुण्यापेक्षा पाप प्रभावी ठरू लागले. पुण्याला वेशीवर टांगून पापाला सिंहासन मिळाले. तेव्हाच पुण्याची पणती पेटवण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. “शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी..’ हे सत्य उशिरा का होईना, माणसाला उमगले. भौतिक सुखांच्या मागे धावताना त्याने स्वार्थ आणि पैशाला देव मानले. पण त्या स्वार्थाच्या विषात त्याच्या संवेदना, भावना, माणुसकी हरवून गेली. पैशासाठी माणूसच विकला जाऊ लागला. शील, चारित्र्य, निष्ठा, प्रामाणिकपणा यांची बाजारपेठ मांडली गेली. मनःशांती हरवली आणि जीवन भयावह वळणावर आले. अशा विस्कळीत समाजजीवनात
“काळ्या ढगात वीज आहे लपून…
घरटी जपून ठेवा, अंधार फार झाला”
असे म्हणण्याची वेळ आली आहे. हा अंधार आपण नष्ट केला नाही, तर तो आपल्यालाच नष्ट करेल. अंधार संपवण्यासाठी मोठ्या प्रकाश किरणांची गरज नसते.आशेची एक छोटीशी ज्योत पुरेशी असते. हाच आशावाद माणसाला पृथ्वीवरून चंद्रावर, चंद्रावरून मंगळावर घेऊन गेला. महासंगणक शास्त्र ना, नि:शस्त्रीकरण, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती हे सारे त्याच आशेचे फलित आहे. आज जगात वाईट घडते आहे; पण त्यातून चांगल्याकडे जाण्याचा मार्ग शोधायचा आहे. अमावास्येनंतर पौर्णिमा लगेच येत नाही.चंद्र कले-कलेने हळूहळू वाढते. त्यासाठी आशेची वात, संस्कारांचे तेल आणि हृदयाच्या गाभाऱ्यात तेवत ठेवलेली पणती आवश्यक आहे. तेव्हाच या ओळी खऱ्या अर्थाने सार्थ ठरतील
अंधार फार झाला…
पणती जपून ठेवा…!
नव वर्षाच्या प्रकाशमय आणि मंगलमय शुभेच्छा…!!!
अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि. अहमदनगर
============



