‘जनसंवाद’ सामाजिक बदलाचे प्रभावी माध्यम; सविता पाटील ठाकरे
'बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण'

‘जनसंवाद’ सामाजिक बदलाचे प्रभावी माध्यम; सविता पाटील ठाकरे
‘बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण’
गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून इंदोरचा राजा रघुवंशी यांच्या हत्येची बातमी लावून धरली आहे. पत्नी सोनमचा असलेला तथाकथित संबंध यासोबतच अधून मधून नरबळी असल्याचीही शक्यता जोडली जात आहे. हे सर्व पाहून मन विछिन्न होते. अरे आज आपण एकविसाव्या शतकात असून नरबळी देऊ शकतो??
पालकमंत्री पद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी एका मंत्र्याने चक्क मांत्रिकास बोलवून अघोरी पूजा केल्याचे समाज माध्यमात चर्चा आहे. नरबळी, अघोरी प्रथा, मंत्र तंत्रसिद्धीचा मांडलेला तमाशा, नकली नोटांचा पाऊस, गुप्तधनाची लालसा यासारख्या घटना अधून मधून देशभरात घडतच असतात.अंधश्रद्धा, लोकांमध्ये असलेला भाबडा समज या सर्वांसाठी गरज आहे प्रखर जनसंवादाची.
भारतासारख्या महाकाय देशात जनसंवाद अतिशय महत्त्वाचा भाग आहे. एकाच वेळी अनेकांपर्यंत संदेश वहनासाठी वापरलेली प्रक्रिया म्हणजे जनसंवाद होय. यासाठी वृत्तपत्रे, मासिके, रेडिओ, दूरदर्शन,
चित्रपट, हल्ली मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप यांचा वापर केला जातो. ‘जनसंवादाचा लोकांच्या विचारांवर, भावनांवर व वर्तनांवर मोठा प्रभाव पडतो, त्यामुळे लोकांमध्ये सामाजिक राजकीय व सांस्कृतिक जागरूकता निर्माण होते’. सोबतच लोकांचे मनोरंजन सुद्धा होते. ‘जनसंवाद हे सामाजिक बदलाचे प्रभावी माध्यम आहे.’ असे मला वाटते.
गेल्या अनेक वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सुद्धा प्रभावीपणे जनसंवादाने काम केलेले आहे. लोकांमध्ये जागृती केलेली आहे. जनसंवाद साधल्याने अथवा संपर्काने समस्येचे आकलन होऊन ते सोडविण्यासाठी उपाय योजना करता येतात. ‘जनसंवाद हे लोकशाहीची भक्कम बाजू मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे’. देशहितासाठी अथवा सत्तेसाठी जनसंवाद भक्कम पाया ठरू शकतो. याच जनसंवादाच्या नावाने अनेक राजकीय पक्षही मोठमोठ्या पदयात्रा काढून आपल्या पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतात.
तसे… जनसंवाद जरी प्रभावी माध्यम असले तरी, साहित्याच्या क्षेत्रात मात्र हा पूर्णतः दुर्लक्षित शब्द आहे. पण आज ‘बुधवारीय काव्यरत्न स्पर्धे’च्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी हा विषय दिला. अन् तमाम काव्य रसिकांना आगळावेगळा विचार करण्याची नामी संधी उपलब्ध झाली. अर्थात तावून – सुलाखून निघालेले शिलेदार या विषयाला न्याय देण्यात निश्चितपणे यशस्वी झालेत. तेव्हा तुम्हा सर्व काव्य रसिकांचे मनापासून खूप खूप अभिनंदन व पुढील साहित्यप्रवासास भरभरून शुभेच्छा…!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह





