‘उषःकालचा रवी जेव्हा, स्वतःची आभा पसरवितो’; सविता पाटील ठाकरे
सविता पाटील ठाकरे सिलवासा दादरा नगर हवेली
‘उषःकालचा रवी जेव्हा, स्वतःची आभा पसरवितो’; सविता पाटील ठाकरे
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ।।
अर्थात..सर्व दुःखांचे हरण करणार्या, भक्तांच्या पीडा, क्लेष दूर करणार्या, शरणागतांना अभय देणार्या अन् निस्सीम भक्तांना आनंद प्रदान करणार्या, वासुदेव कृष्णाला सर्वप्रथम माझा नमस्कार असो ! श्रावण महिन्यात ‘कृष्णाष्टमी’ या तिथीला मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण म्हणजे, विष्णूचा आठवा अवतार होय. व्याप्त अंधारात जेव्हा प्रकाश किरण दिसतात, उषःकालचा रवी जेव्हा स्वतःची आभा पसरवितो, त्यावेळी कोणाचे हृदय आनंदाने पुलकित होणार नाही? साम्राज्यवादाच्या चेंगराचेंगरीत चिरडला जाणाऱ्या समाजाला जेव्हा तारणहार भेटतो, सत्ता व संपत्ती यांच्या शोषणापासून सोडवणारा मुक्तिदाता मिळतो, गरीब व उपेक्षितांना सहानुभूती देणारे उबदार हृदय मिळते, अध्यात्मात गटांगळ्या खाणाऱ्याला एखादा उद्धारक मिळतो, अशा उद्धारक कृष्णाचा जन्म झाला आणि सर्व दुःख, संताप विसरून, आनंद उत्सवात सारेच नाचले आणि तो दिवस म्हणजे ‘जन्माष्टमी’ होय.
यशस्वी मुत्सद्दी, विजय योद्धा ,धर्म साम्राज्याचा उत्पादक, धर्माचा महान प्रचारक ,भक्तवत्सल तसाच ज्ञानियांची व जिज्ञासुंची, जिज्ञासा पूर्ण करणारा जगद्गुरु म्हणजे, ‘कृष्ण’. त्या कृष्णाला अनंत प्रणाम. भगवान श्रीकृष्ण म्हणजे दैवी संस्कृतीचा निस्पृह, निरहंकारी व नम्र उपासक. संस्कृतीसाठी त्यांचे आतडे तुटत होते. म्हणूनच तर दुर्योधन, कंस, कालयवन, नरकासुर, शिशुपाल व जरासंघ यांच्यासारखे जडवादी, असुरी संस्कृतीचे प्रचारक तांडव नृत्य करीत होते. तेव्हा धर्म व निती यांचे सुदर्शन चक्र हातात घेऊन त्यांनी या षडरीपूचा नाश केला.
सविता पाटील ठाकरे
सिलवासा दादरा नगर हवेली



