हा तर ‘स्पंदने व हुकांरा’चा खरा विजयोत्सव: सविता पाटील ठाकरे
मराठीचे शिलेदार समूहासाठी मनोगतीय शब्दफुले
हा तर ‘स्पंदने व हुकांरा’चा खरा विजयोत्सव: सविता पाटील ठाकरे
मराठीचे शिलेदार समूहासाठी मनोगतीय शब्दफुले
“उधळीत हर्षाची कारंजी
थुईथुई नाचत आली..,
दीर्घ विसावा घेऊन माझी
लेखणी आज पुन्हा हसली…”
खरं तर..! मी खूप दिवसांनी काल समूहात कविता लिहिली आणि आश्चर्यम्..सकाळी सात वाजता आ.राहुल सरांचा संदेश आला ‘तुमचा फोटो पाठवा’. तसं मी काव्यलेखन करीत नसल्यामुळे ते भाग्य माझ्या नशिबी कमीच येते. सरांचा मेसेज वाचून लगेचच फोटो पाठवला.
तसं पाहता कविता काही अचेतन थिजलेली वस्तू नाही, तिच्यात रसद्रव्याचे ओढेनाले असतात. तसाच एक सुप्त विद्युतप्रवाहही..मी त्या प्रवाहातील अस्ति (पॉझिटिव्ह)व नास्ति (निगेटिव्ह) असे दोन्ही ध्रुव एकमेकांशी जुळवले, अंधारलेल्या जागेत असणारा स्वीच शोधला आणि दाबला.आणि त्या दाबामुळेच कवितेच्या भावाशयाचा विद्युतभार जागृत, गतिमान झाला आणि माझी कविता प्रज्वलित, प्रकाशमान झाली. हा स्फोट हा प्रकाश माझाच..पण कोणीतरी आपल्या स्पर्शाने दखल घ्यावी लागते, कोणीतरी ती स्पंदने ऐकावी लागतात, कोणीतरी तिच्या हुंकारांना प्रतिसाद द्यावा लागतो. आणि माझ्या कवितेची स्पंदने, हुंकार आदरणीय राहुल सरांनी ऐकलेत व सर्वोत्कृष्टचा ताज माझ्या कवितेवर चढवला.
आपण सर्वजण सभोवतालचे वातावरण बघतो, अनुभवतोच.एक अदृश्य सृष्टी सोडून दृश्य सृष्टीकडे बघितलं तर जगाच्या धबडग्यात व्यक्तीचं जीणं किती क्षुद्र, तिचं महत्त्व किती कस्पटासमान, तिचं अस्तित्व किती क्षणभंगूर, नि तिचं ऐश्वर्य किती असहाय्य आहे असं दिसत नाही??
पण त्याहीपेक्षा जास्त मंत्रमुग्ध होते मी ते म्हणजे, व्यक्तिगट किंवा समुदायांच्या जीवनातील स्थित्यंतरे पाहतांना. कारण त्या स्थित्यंतरांचा व्याप अफाट नि व्यवहार आंधळा, अजब, अप्रतिहत..त्यांच्या कळी शोधायला गेलं तर काहींचा मागमूसही लागत नाही. पाय कसे ओढले जातात नि कसे सुटतात. स्वार्थासाठी माणूस कुठल्या थराला पोहोचतो व कपटनीतीने विजयोत्सव कसा मनवतो. यासाठी माझे स्वतःचे अनुभव,आजूबाजूचं मोडकं तोडकं निरीक्षण आणि थोडसं भलंबुरं वाचन या सगळ्यांचा मिळून मनात आशय जमा झाला..पापणीची कड किंचित ओलसर झाली अन् मी आशय शब्दात मांडला.
माझ्या ‘विजयोत्सव’ रचनेची दखल घेतल्याबद्दल ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांच्या सदैव ऋणात मी…तसं तर माझ्या बोथट झालेल्या शब्दांच्या करवतीत धार दिली असेल ती राहुल सरांनीच. आत्मविश्वास, कणखरपणा मी त्यांच्याच कडून शिकलीय. संस्थेच्या सचिव आदरणीय पल्लवीताई, विश्वस्त अशोक लांडगे सर, अरविंद उरकुडे सर यांनीही वेळोवेळी माझ्या सृजनशीलतेस बळ दिले. त-हेत-हेचे गंध अनुभवून भक्कमपणे पाय रोवण्यासाठी सहाय्य केले; तेव्हा त्यांचेही मी मनापासून आभार मानते. मला सदोदित हसरा सूर लावणारे सर्व सहप्रशासक यांचेही मी मनापासून आभार मानते
माझ्यावर निस्सिम प्रेम करणारे समूहातील सर्व दादा ताई. आपल्या सर्वांची स्नेहाची,आपुलकीची साथ मला तर नेहमीच मिळत असते म्हणून मी आपणा सर्व दादा ताईंचेही मनापासून आभार मानते..
सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा
दादरा नगर हवेली दीव दमण
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह



