ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त ‘विधिमंथन २०२५’ उत्साहात संपन्न!
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त ‘विधिमंथन २०२५’ उत्साहात संपन्न!
“मूलभूत तत्व हीच कायद्यांचा पाया आहेत” – न्यायाधीश साो.राजेंद्र सावंत यांचे प्रतिपादन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग, रायगड: (२७ सप्टेंबर) जनता शिक्षण मंडळाचे ॲड.दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ, अलिबाग, या महाविद्यालयाच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीसंदर्भात ‘विधिमंथन २०२५’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. २७ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून रायगडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साो.राजेंद्र सावंत , प्रमुख पाहुण्या म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या सौ. चित्रलेखा नृपाल पाटील आणि प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र अभ्यासक तथा ललित लेखक डॉ. अविनाश कोल्हे उपस्थित होते.
याप्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.गौतम पाटील ,उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, कार्यवाह श्री. गौरव पाटील जनता शिक्षण मंडळाचे इतर पदाधिकारी रायगड व अलिबाग बार असोसिएशनचे पदाधिकारी ॲड.प्रविण ठाकूर, महाविद्यालयातील प्राध्यापक जे.एस. एम. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, माजी प्राचार्य डॉ.अनिल पाटील,प्रा. सुरेंद्र दातार असे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय.क्यू.ए.सी समन्वयक प्राध्यापक नीलम म्हात्रे यांनी केले.
जयवंत केळुसकर सभागृहात सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या आगमनानंतर माहितीपट सादरीकरण आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या युट्यूब चॅनलचेही उद्घाटन झाले, ज्यामुळे शैक्षणिक उपक्रम अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली.यावेळी प्रास्ताविक सादर करताना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी आपल्या शैक्षणिक आणि वकिली अनुभवांचा दाखला देत, विद्यार्थ्यांना कायद्याचे शिक्षण आणि समाजकारणातील महत्त्व समजावून सांगितले.प्रमुख पाहुण्या सौ. चित्रलेखा पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना भविष्यातील वाटचालीस प्रोत्साहन दिले. त्यांनी कायदेशीर शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व विषद केले.
प्रमुख उद्घाटक साो.राजेंद्र सावंत यांनी आपल्या भाषणात लॉ कॉलेजशी आणि अलिबागशी असलेली त्यांची जुनी नाळ सांगितली. त्यांनी या भूमीशी असलेले आपले भावनिक नाते व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. कायद्याचा आणि संविधानाचा पाया हे महाविद्यालयात शिकवले जाणारी ची मूलभूत तत्व आहेत यांच्यावरच आधारित असतो असे प्रतिपादन त्यांनी केले कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ” न्याय मंथन”- अभिरूप न्यायालय स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.महाविद्यालयाच्या २५ व्या वर्षापूर्तीनिमित्त जनता शिक्षण मंडळाचे संचालक मा. संजय पाटील यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या विकासासाठी आणि पुस्तक खरेदीसाठी एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात सुपूर्द केला . कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. संदीप घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात “भारतीय संविधानाची निर्मिती : ऐतिहासिक पार्श्वभूमी” या विषयावर प्रा.अविनाश कोल्हे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपल्या व्याख्यानात त्यांनी भारतीय संविधान हा केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन केले.प्रा. कोल्हे यांनी ब्रिटिशकालीन विविध कायदे आणि घटनांची सविस्तर मांडणी केली. त्यामध्ये 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1813 व 1833 चे चार्टर ॲक्ट, 1858 चा भारत शासन कायदा, 1909 चा मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा, 1919 चा माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आणि 1935 चा भारत शासन अधिनियम यांचा विशेष उल्लेख त्यांनी केला.संसदीय वादविवाद हे कायदेनिर्मितीचा अभ्यास करताना कसे महत्वाचा ठरतात याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
या सर्व कायद्यांनी भारतीय प्रशासकीय व्यवस्था घडवली आणि अखेरीस भारतीय संविधानाच्या निर्मितीस पाया घातला, हे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरेद्वारे सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळाली. व्याख्यानाला प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य नीलम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.





