गूढ अनाकलनीय विश्वाचे; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
गूढ अनाकलनीय विश्वाचे; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
*असे कसे ? असे कसे ?*
*रात्रीचेच चांदणे दिसे..!*
*असे कसे ? असे कसे ?*
*मोरालाच सुंदर पिसे…!*
*असे कसे ? असे कसे ?*
*पाण्यातच झोपती मासे !*
*असे कसे ? असे कसे ?*
*आईसारखे कुणी नसे..!*
बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर यांच्या असे कसे ? असे कसे ? या बालसुलभ प्रश्नांपासूनच मानवी मनाला अनाकलनीय असे कोडे पडत जाते. ही बालसुलभ कोडींची गंमत अनुभवता अनुभवता न्यूटन, आर्किमिडीज, थॉमस एडिसन, आर्यभट्ट, श्रीनिवास रामानुजन यांसारखे संशोधक, गणिती नकळतपणे घडत जातात. सागर, धरती, आकाश आणि चराचरातील अनेकविध घडणाऱ्या घडामोडी माणसाला वेड लावतात. त्याची उकल करण्यासाठी माणूस आपले आयुष्य पणाला लावतो. कधी चांद्रयान तर कधी सूर्यया.मंगळावर वस्ती करण्याचे स्वप्न अशा अनेक अनाकलनीय उलाढाली पिढी दर पिढी घडतच असतात.
अशा भौतिक जगातील अनाकलनीय गूढ गोष्टींच्या बरोबरच बालसुलभ मानवी स्वभावसुद्धा कधी कधी अनाकलनीय होऊन जातो ते कळत नाही. असं म्हणतात..
*एकदा सागराचा तळ गाठता येईल*
*पण मानवी मनाचा तळ गाठणे कठीण…!*
अशा या अनाकलनीय मनाला ओळखणे हे मात्र एखादी मनकवडी व्यक्तीच करु शकते. त्यासाठी हवी अंतरंगातील आत्मियता,प्रेम, जिव्हाळा तरीसुद्धा आजकाल दुर्दैव असे की, एका घरात राहून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी एकमेकांना ठाऊक नसतात. प्रायव्हसीच्या नादात सुखदुःखाची देवाणघेवाण दिवसेंदिवस कमी होत चाललीय. उलट स्वार्थाच्या बाजारी धनदौलत, अहंभाव, हेकेखोरपणा यांना महत्त्व येऊन अगदी अनाकलनीय जीवघेणा व्यवहार नात्यांत सुरू झाला.
आज ‘मराठीचे शिलेदार’ समूहात काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने माननीय राहुल दादा पाटील यांनी ‘अनाकलनीय’, विषय देऊन शिलेदारांच्या मनातील अनाकलनीय गोष्टी लेखणीतून उलगडण्याची संधी दिली. विश्वातील अनाकलनीय गोष्टींपासून तर प्रेयसी-सख्याच्या मनातील अनाकलनीय गोष्टींचे गूज शिलेदारांनी छान शब्दांकित केले. अनाकलनीयला आपल्या आकलनाच्या पातळीवर आणून रचनाकारांनी सुरेख रचना साकारल्या. सर्वांचे खूप खूप अभिनंदन व भावी लेखणीस भरभरून शुभेच्छा….!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह





