संकटाशी सामना करायला शिका
वसुधा वैभव नाईक
संकटाशी सामना करायला शिका
सं – संपत नाही अशी शृंखला
क – कधी येतात चोरपावली, कधी अकस्मात
ट – टपलेली असतात जणुकाही
जीवन म्हणलं की सुखदुःखाची सावली आपल्या जीवनावर कायम पडत असते. आनंद दुःखाचे वातावरण कायम आपल्या आजूबाजूला असते. साधी गोष्ट घ्यायची म्हटलं तर जन्म झाला कोणाचा तर आनंदाने नाचतो पण मृत्यू झाला कोणाचा तर दुःख असते . हे जीवन चक्र चालूच असते. जो जन्माला आला तो जाणार आहे हे निश्चितच असते. किंबहुना जन्माला आला त्या दिवशी त्याची नोंद केलेली असते की हा या तारखेला जाईल म्हणून. हे आपल्या सामान्य माणसाला समजू शकत नाही. संकट जीवनात येतात पार होतात. करी संकटांचा डोंगरही कोसळतो. पण आपण डगमगून जायचे नाही. जसा एक डोंगर वारा,ऊन, पाऊस याला न डगमगता उभाच असतो त्याप्रमाणे जीवनात मनुष्याने खंबीर राहायला शिकायला हवे.
जर मनुष्य खंबीर असेल तर पुढचे निर्णय घ्यायला तो पात्र ठरतो. त्याचे पुढचे जीवन सुखकर जाते. मनुष्य मनानं खंबीर असलाच पाहिजे. आलेल्या संकटांना धुडकावून लावता आले पाहिजे. एक वेळ असे आपल्याला म्हणावे लागते की देवा तू संकट दे पण सहन करण्याची ताकद दे. म्हणजे मग आपल्याला आपली ती ताकद जीवनात खंबीरता आणण्यासाठी उपयोगी पडते. अनेक शेतकरी पावसाच्या नाराजीमुळे, भौगोलिक वातावरणामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. याचे प्रमुख कारण म्हणजे संकटांना तोंड देण्याची ताकदच त्यांच्यामध्ये नसते.
मान्य आहे त्यांनी खूप खर्च केला आहे तो त्यांना मिळत नाही, पिकांचे नुकसान झाले, डोक्यावरील कर्ज फेडता येणार नाही,परंतु हा उपाय याच्यावर नाही. विचारपूर्वक सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. आपल्या घरादाराला आपली गरज आहे हे कायम लक्षात ठेवावे. आलेल्या संकटांना धीराने तोंड देण्यासाठी आपण प्राणायाम करावेत. मनःशांतीसाठी जुनी गाणी ऐकावीत. किंवा आपल्याला जे आवडतील ती गाणी ऐकावीत. आपला स्ट्रेस ज्याने जाईल असे वाटते अशा सर्व कृती आपण कराव्यात. रांगोळी घालावी, चित्रे काढावीत, आवडत्या सिरीयल बघाव्यात, आवडत्या व्यक्तीशी आपल्या मनातले बोलून मन रिकामे करावे. सहलीला जावे. निसर्गात रमावे. वाटले एकटेच बसावे तर एकटेच निवांत बसावे.अशा अनेक गोष्टी करता येतील की ज्याने आपण फ्रेश होऊन संकटांशी सामना करायला लागू.
तर मित्रांनो संकटं आली की त्याला धीराने तोंड द्यावे, डगमागून जाऊ नये इतकच मला सांगायचं आहे. मी स्वतः अनेक संकटांवर मात करून जीवन जगत आहे. तेही माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठेही संकट रेषा पाहायला मिळणार नाही. पण त्या संकटातून मी अशीच बाजूला होते. घरातील सर्वांचा विचार करते. मन शांत करण्यासाठी निवांत गाणी जुनी ऐकते. चित्र काढते. यामुळे मी हा तुम्हाला सल्ला देत आहे. प्रत्येकाचे मत भिन्नता असू शकते. मी जे करते ते तुम्ही पण करावं असे काहीही मी सुचवत नाही. पण या लेखामुळे जर का आपल्या संकटांच्या वेळी काही कृती करून फरक पडला तर निश्चितच आपण तो करावा एकच सांगणे आहे.
शुभंभवतु!
वसुधा वैभव नाईक
धनकवडी जिल्हा पुणे
========



