“चक्रीवादळाचा रूद्रावतार. वातावरणीय बदलांचा प्रहार…”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय 'हायकू काव्य'स्पर्धेचे परीक्षण

“चक्रीवादळाचा रूद्रावतार. वातावरणीय बदलांचा प्रहार…”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय ‘हायकू काव्य’स्पर्धेचे परीक्षण
किती किती रूपे तुझी, थिटी पडे वाणी माझी, अल्लड अवखळ लेकरावाणी, तुझी संगत लोभसवाणी, कधी खट्याळ पाखरावाणी, गातोस गाणी गोजिरवाणी, कधी गोंडस वासरावाणी, हुंदडतोस रानी वनी, सांज सकाळी मंद मंद, घेऊन येतोस पुष्पगंध, प्रसन्नचित्त तुझा संग, तनमन संगतीत होते दंग, असे किती तुझे रागरंग, उमटती नाना भाव तरंग, कुठून येतोस कुठे जातोस, कोण तुला देई गती, कुंठीत होई मानवी मती, तू किती बेलगाम हस्ती, बिंधास्त करतोस मस्ती, दाही दिशांचा फिरस्ती, जेथे पोकळी तेथे वस्ती, हर जीव हर वस्तू, तुझी सर्वाशी अतूट दोस्ती, स्पर्श तुझा हवा हवा, चैतन्याचा अक्षय्य ठेवा, रोज तोच तू तरी, अनुभव नवा नवा, असे नाव तुझे “हवा” कोण म्हणे “वारा” कोण वदते “पवन” कुणासाठी “प्राणवायू” तू हर जीवाची “आयू”….!!
इतका साधा सरळ, आहेस हळवा तरल, मात्र कधी कधी, सुटतो तुझा कसा संयम, तुटतो कसा तुझा नियम, बदलतो तूझा नूर, तू गावू लागतोस भेसूर, धावू लागतोस वेगाने दूर, वाटेत येईल ते करतोस चूर, उगम सागरी पोटात, धडकी मानवी गोटात, तुझा चक्रिवात भोवरा, गोलाकार घुमतो सैरावैरा, गगनभेदी उसळतात लाटा, किनार्याच्या शोधत वाटा, मर्यादेला देऊन फाटा, त्वेशाने उफाळतात,भरभक्कम वृक्षही, मुळातून उन्मळतात, तुझ्या गतीची चाल, कशी करावी ढाल, तू बेभान बेफाम, धारण करतो रूद्रावतार, मार तुझा अनिवार, होवू लागतो आरपार, जिवित वित्त हानी बेसुमार, जिकडे तिकडे हाहाकार, मार्गी येईल ते स्वाहाकार, सोबत धारा धुवाधार, उध्वस्त उभे शेत शिवार, तुझी गती तेज तर्रार, जणू शस्त्र धारदार, सपासप करशी वार, कित्येक होती निराधार, मैलो न् मैल आसपास, धूमाकूळ तास न् तास, गळा घालून चक्री फास, कित्येकांचे कोंडून श्वास, दमून भागून यथावकाश, होतोस शांत.. क्लांत.. सावकाश….!!
काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरिता, आ. राहुल दादांनी दिलेला विषय म्हणजे, अशाच एका विध्वंसकारी वादळाचे दृश्य अदृश्य परिणाम दर्शवणारे बोलके चित्र. हा निसर्ग एक अद्भुत अगम्य मायाजाल आहे. उत्पती, पोषण, र्हास सारे काही त्याच्या मर्जीने चालते. वादळापुरते बोलायचे झाल्यास अनेकवेळा विध्वंसक अतीजलद हवेच्या अभीसरणाने ओळखल्या जाणाऱ्या कमी दाबाच्या परिसराभोवती विशेषतः समुद्रात अशी चक्रीवादळे उत्पन्न होतात. तेज हवा घड्याळाच्या उलट सुलट दिशेने एकाच वेळी जोराने वाहते आणि त्या भिषण भोवर्यात भलेमोठे वृक्ष सुद्धा उन्मळून पडतात. घरेदारे उध्वस्त होतात.
जनजीवन विस्कळीत होते. आधुनिक तंत्रज्ञानाने हवामानाचा अचूक अंदाज लावला आला तरीही, वादळाचे परिणाम भयावहच असतात. पाऊसाच्या आरंभी आणि परतीच्या वेळी अशा घटना घडतात ज्याचे परिणाम मात्र खूप दूरगामी होतात. अशा चित्रावर आज खूपच छान हायकू रचनांची रेलचेल झाली. अजूनही नियमांचे योग्य अवलोकन करून हायकू लिहिणे आवश्यक आहे. असो सर्वांच्या लेखणीला शुभेच्छा आणि मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनःपूर्वक धन्यवाद.
- विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक, कवीवर्य, लेखक, संकलक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह





