सूक्ष्म निरीक्षण दृष्टी, कलात्मकता आणि कल्पकतेचा संगम म्हणजे हायकूकाव्य;विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
सूक्ष्म निरीक्षण दृष्टी, कलात्मकता आणि कल्पकतेचा संगम म्हणजे हायकूकाव्य;विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
हे विश्व म्हणजे, विधात्याच्या कुंचल्याने साकारलेली एक सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे. जल, धरती, वने, पर्वत, नाना जीवजंतू, वनस्पती अशा अचंबित करणा-या अनेक गोष्टी यात ठासून भरल्या आहेत. निसर्ग निर्मित आश्चर्य जितकी आहेत तशीच काही आश्चर्य मानवनिर्मित सुद्धा आहेत. जगाच्या पाठीवर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथा सर्वात मोठा, आणि जैवविविधतेने सर्वात जास्त परिपूर्ण असलेला प्रांत म्हणजे इंडोनेशिया हा देश. सागरी बेटांनी बनलेला हा प्रांत म्हणजे नैसर्गिक सौंदर्याची अद्भूत खाणच आहे. आणि भरीस भर म्हणून आश्चर्यचकित करणारी मानवनिर्मित पर्यटनस्थळे ही या भूमीची खासियत आहे. बाली या प्रदेशात असणारे “उलून दानु बर्तन मंदिर” हे एक अशा आश्चर्यापैकीच एक स्थळ आहे. जिथे जगभरातील पर्यटकांचा लोंढा लोटलेला असतो. डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्ग सौंदर्य आणि मानवी कलाकुसरीचे अद्भूत, विलोभनीय दर्शन येथे होते.
शिलेदार बंधूभगिनिंनो आज माझी गाडी पर्यटनाकडे कशी वळली? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण असे आहे की, काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेसाठी समूह प्रमुख आदरणीय राहुल दादांनी दिलेले चित्र.. आले ना लक्षात? आपण सर्वांनी याचा मागोवा घेतलाच असेल. चारी बाजूंनी स्वच्छ पाण्याने वेढलेले, मधोमध वेळूचे बन असलेले आणि त्याला ड्रॅगनचा वेढा असलेले हे नितांतसुंदर नयनरम्य चित्र वरून नैसर्गिक वाटत असले तरी प्रत्यक्षात मानव निर्मित कृत्रिम पर्यटन स्थळ आहे. जेव्हा आपण अशा स्थळांचा खोलात जाऊन शोध घेतो तेव्हा माहितीचा अद्भूत खजाना आपल्या हाती लागतो. मग असे वाटते की अनेक जन्म घेऊनही जग पाहणे होणार नाही… (वेळ आहे तोपर्यंत पाहून घ्या) असो.
मुळात हायकू काव्य प्रकाराचा उगम जपानमध्ये झाला आहे हे सर्वांना ज्ञात आहेच. आणि भारतात डाॅ. रविन्द्रनाथ टागोर व मराठी कवयित्री शिरिष पै यांनी प्रचार व प्रसार केला आहे. शिरिष पै यांना “हायकू सम्राज्ञी” म्हणून ओळखले जाते. अशा हायकू प्रकारात चित्रविषय मोजक्या शब्दात बांधणे एक कलात्मकता आहे. हायकू काव्यप्रकार विशेषतः निसर्गाशी संबंधित असला, तरी मानवी भावभावना सुद्धा यात व्यक्त होतात. एक विशिष्ट क्षण आणि कलाटणी युक्त मांडणी हे याचे वैशिष्ट्य आहे. एक विशिष्ट क्षण.. परिणाम आणि प्रतिबिंब यांचा अनोखा संगम म्हणजे हायकू होय.
समस्त मराठीचे शिलेदार बंधूंनो.. एव्हाना आपण हायकू प्रकारात चांगलेच रूळले आहात. तरीही घाईघाईत आपल्या “हायकू” चा “फायकू” होताना दिसते. कांही जण अक्षरसंख्येचा मेळ घालताना भरीची एकाक्षरे घालतात ती टाळली पाहिजेत. ओघाने येणे वेगळे आणि भरीस घालणे वेगळे. तसेच शब्दांची पुनरावृत्ती हायकू सौंदर्याला बाधित करते. याकरता सहजता आणि कल्पकता जपणे विशेष महत्वाचे आहे… बाकी आपण सुज्ञ आहातच.
येत्या सात मे २०२५ रोजी छ. संभाजीनगर ला सर्वांना यावे लागते. पुस्तक प्रकाशन सोहळा आणि काव्यवाचन स्पर्धा चुकवायची नाही म्हणजे नाही. कारण हा आपला वार्षिक मनोमिलन महोत्सवसुद्धा आहे. चला तर मग ऋणानुबंधाच्या गाठी भेटी अधिक दृढ करूया. आज मला परीक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादां आणि प्रशासनाचे धन्यवाद.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



