आषाढातील ‘वारी’
डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर बेडगा ता उमरगा जिल्हा धाराशिव
आषाढातील ‘वारी’
पायानी चालतो तो प्रवासी हृदयातून चालतो तो तो वारकरी. ‘वारी’ ही अज्ञानाकडून ज्ञानाकडे, तिमीराकडून तेजाकडे, अनुरेणूकडून आकाश तत्वाकडे, आणि द्वैताकडून अद्वैताकडे होणारा अंतर बाह्य परिवर्तन करणारा अनुपम्य सुख सोहळा आहे. ग्रंथ समजल्या शिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्या शिवाय भगवंत समजणार नाही…! सर्व ईश्वर भाविक भक्तांची एकच ओढ असते. दर्शनासाठी लाखो भाविक भक्त खूप दुरून येतात तास तास, दिवस दिवस ते रांगेत उभे राहून दर्शन घेतात आणि आपल्या घरी परत येतात. “ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभव घेण्याची संधी म्हणजे वारी”. विशिष्ट तिथीला आपल्या इष्ट देवताकडे जाणे म्हणजे वारी. घरून निघून संतांच्या गावी जायाचे आणि आळंदी किंवा देहून आपल्या गुरूंच्या दिंडी सोबत कशाचीही पर्वा न करता घालूनिया भार झालो. निश्चिती म्हणत घराकडील सर्व चिंता ईश्वरावर घालून आषाढी एकादशीला पंढरपूरला येतात. आठरा ते वीस दिवस सर्व संसारीक गोष्टीचा त्याग करून फक्त ईश्वराच्या ध्यानात राहणारे वारकरी एकादशीला पंढरपूरला राहतात.
हा मी होईन भिकारी ।
पंढरीचा वारकरी ॥१॥
हाचि माझा नेम धर्म ।
मुखी विठोबाचें नाम ॥२॥
हेचि माझी उपासना ।
लागेन संतांच्या चरणा ॥३॥
तुका म्हणे देवा ।
हेचि माझी भोळी सेवा ॥४॥
श्रीमंत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
हे देवा, मी भिकारी होईन..! पण पंढरीचा वारकरी होईल. मुखाने विठोबाचे नाम घेणे हा माझा मुख्य धर्म आहे व हाच माझा नित्य नेम आहे. संतांच्या चरणांवर माझे मस्तक ठेवणे हिच माझी उपासना आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘हे देवा हीच माझी भोळी सेवा आहे’, असे म्हणत वारकरी पूर्ण करतात.
डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर
बेडगा ता उमरगा जिल्हा धाराशिव
=========÷



