युवा महोत्सव विद्यापीठस्तरीय अंतिम फेरीत जे. एस. एम. महाविद्यालयाचे घवघवीत यश
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
युवा महोत्सव विद्यापीठस्तरीय अंतिम फेरीत जे. एस. एम. महाविद्यालयाचे घवघवीत यश
रायगड (दक्षिण) विभागात पटकावली सर्वाधिक पारितोषिके
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
अलिबाग: मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षातर्फे आयोजित केल्या गेलेल्या ५७ व्या युवा महोत्सवाच्या विद्यापीठस्तरीय अंतिम फेरीची सांगता झाली आहे. अलिबाग येथील जे. एस. एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकूण चार पारितोषिके प्राप्त करत यश संपादन केले आहे.
पारितोषकात१ सुर्वणपदक, १ रौप्यपदक, १ कांस्यपदक व १ उत्तेजनार्थ अशी एकूण चार पारितोषिके प्राप्त करत मुंबई विद्यापीठ स्तरावर मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. युवा महोत्सवाच्या रायगड (दक्षिण) जिल्हास्तरीय फेरीत एकूण १९ स्पर्धांमध्ये यश संपादन करून जे. एस. एम. महाविद्यालयाने रायगड (दक्षिण) विभागात सर्वाधिक पारितोषिके पटकावण्याचा सन्मान प्राप्त केला होता.
युवा महोत्सवाच्या विद्यापीठस्तरीय अंतिम फेरीत कु. वेदांत रोटकर याने फोटोग्राफी स्पर्धेत सुर्वणपदक प्राप्त करत फोटोग्राफी स्पर्धेतील पहिले पदक महाविद्यालयास प्राप्त करून देत ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय लोकनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करत महाविद्यालयाने रजतपदक पटकाविले. अथर्व भगत, श्रेया अधिकारी, निधी भायदे, हिमानी रिसबूड, सोहेल सहिबोले, सार्थक शेळके, प्रणव टावरी, सर्वेश ठाकूर, अदिती मगर, बिमला छेत्री यांनी नागालँड येथील झेलियांग बटरफ्लाय नृत्य सादर करीत परीक्षकांची व रसिकांची मने जिंकली.
श्रावणी बापट हिने गायिका म्हणून तर आराध्य झाल्टे, हर्षल वाडकर, तुषार जाधव, राज म्हात्रे या विद्यार्थ्यांनी वाद्यवादक म्हणून लोकनृत्यात सहभाग घेतला. कोलाज या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी यश संपादन करीत कुंदन रावजी या विद्यार्थ्याने कांस्यपदक पटकाविले. तर श्रेया अधिकारी हिने हिंदी कथाकथन स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, रायगड जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा. श्वेता पाटील ह्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक प्राध्यापक, दिग्दर्शक ह्यांचे अभिनंदन केले आहे.
पदक प्राप्त केलेले विद्यार्थी राज्यस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या संघात निवडले जातील असा विश्वास ॲड. गौतमभाई पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाविद्यालयाने दिलेला पाठिंबा व उपलब्ध करून दिलेली संधी, तसेच प्राध्यापकांनी केलेले सहकार्य व मार्गदर्शन यामुळे यशाची ही पायरी गाठता आल्याचे मत यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. महाविद्यालयाकडून मिळत असलेले सहकार्य व पाठिंबा याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आनंदाची भावना व्यक्त केली आहे.



