विचार साधना
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा- पुणे
विचार साधना
माणसाचे जीवन जगणे हे काळानुसार चालू असते. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. माणूस भूतकाळात घडलेल्या घटनांचा पुन्हा पुन्हा विचार करून त्या आठवणीत रमणारा आहे. गत स्मृतीच्या हिंदोळ्यावर बसावे. आनंदाने हिंदोळे घ्यावेत आणि त्या स्मृती पटलावर आनंदाने पूर्वी घडलेल्या घटनांचा क्रम लावून सुखाचे क्षण पुन्हा वेचावेत, अथवा दुःख काय होते याचा विचार करावा. असा हा भूतकाळ प्रत्येक जणालाच आठवत असतो. वर्तमान काळात आपण सद्यस्थितीचे जीवन जगत असतो. जीवन जगणं आणि जीवन आनंदाचं जगणं, मनाप्रमाणे जगणं या तिन्ही वाक्यांमध्ये खूप फरक आहे.
जीवन जगताना अपार हाल कष्ट सोसावे लागतात. या छोट्याशा टिचभर पोटाला अन्न मिळण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात. आपल्या ज्या भौतिक गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा या मिळवण्यासाठी सुद्धा खूप धडपड करावी लागते. त्याला आपण जीवन जगणं असं म्हणूयात. जीवन आनंदात जगणं याचा अर्थ काय ? तर आपण आज ज्या अन्न, वस्त्र, निवारातर आहेतच पण त्या सोडून ज्या भौतिक सुविधा आनंदाने उपभोगत आहोत याला आपण आनंदाने जीवन जगणं असं म्हणूया. यामध्ये बंगला,गाडी आपल्याला हवं ते आपल्याला करता येतं आणि काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत पण जीवन आनंदात चाललेल असतं.
समाजात एक स्थान निर्माण झालेला असतं. आपल्या कुटुंबामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण झालेली असते.कर्ता पुरुष, स्त्री असा आदर मिळतो. याचा अर्थ काय तर काही स्वप्न अपुरी जरी राहिली तरी पण जीवन आनंदात चालू असतं. मजेत चालू असत. जीवन मनाप्रमाणे जगता येतं. यासाठी आपल्याला काय खूप पैशांची गरज नसते. यामध्ये अशी लोक येतात की खूप श्रीमंत लोक असतात आणि ह्या श्रीमंत लोकांनी ज्या वस्तूवर हात ठेवला ती वस्तू त्यांना ती मिळवता येते म्हणजे ते मनाप्रमाणे स्वतःचे आयुष्य जगू शकतात.
यामध्ये अशी माणसे येतात की त्यांच्या संकल्पना म्हणा किंवा स्वप्न म्हणा खूप उंची नसतात त्यांची धाव जेवढी आहे तेवढं त्यांना ते मिळवायचं असतं त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचायचं असतं उद्दिष्ट जीवनातली पूर्ण करायची असतात ती ते पूर्ण करतात आणि स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून मनाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतात. वर्तमानात जगून घेतात भूतकाळाचा विचार करतात आणि भविष्यकाळाची तरतूद करतात. भविष्य काळामध्ये आपण आजारी पडलो तर आपल्याला पैशांची गरज आहे. आज वन आर के आहे परंतु नंतर आपल्याला मुलं बाळ झाल्यानंतर टू बीएचके लागणार आहे याची तरतूद करून ठेवतात. आजारपणात लागणाऱ्या पैशांची तरतूद करून ठेवतात.
एकंदरीत काय तर भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी आर्थिक अडचण आता सहन करतील परंतु भविष्यकाळाची तरतूद करून ठेवतील. हा मानवी स्वभावच आहे. आणि तशी तरतूद केली नाही, तर आपली मुलं बाळ आपल्याला सांभाळतील किंवा कोणी आपल्याकडे बघेल ही आशा तर दूरच राहिली. म्हणून मानव हा आपल्या भविष्यकाळाची सुद्धा तरतूद करून ठेवतो काही लोक अशी आहेत की आपण मेल्यानंतर आपल्या क्रियाकर्मासाठी सुद्धा पैशांची तरतूद करून ठेवतात मुलांवर त्याचा भार टाकत नाहीत. उत्तम जीवन जगायचे असेल तर, भूतकाळात रममान होऊ नये, वर्तमान काळाचा आनंद घ्यावा आणि जीवन आनंदाने जगावे. भविष्यकाळाचे तरतूद थोडीफार तरी करून ठेवावी. जीवनी आलो तर आनंदाची बाग फुलवावी, त्या आनंदाच्या बागेत सुखाची रोपे लावावीत. त्या रोपाला आलेल्या फुलांना मस्त कविता घ्यावे व हर्षात जीवन जगावे….!!
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा- पुणे
========



