“मैदानी खेळांचा ध्यास… शारीरिक बौद्धिक विकास”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय 'हायकू काव्य' स्पर्धेचे परीक्षण
“मैदानी खेळांचा ध्यास… शारीरिक बौद्धिक विकास”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेचे परीक्षण
गरज ही वैयक्तिक, सामुदायिक, सामाजिक, भौतिक सुखसुविधांची किंवा सांस्कृतिक, करमणूक, क्रिडा प्रकाराची पण असू शकते. असे म्हंटले जाते की, शोध मग तो कोणताही असो, त्याचा उगम गरजेपोटी होत असतो. आज खेळल्या जाणाऱ्या विविध क्रिडा प्रकारांचे उगम सुद्धा खूपच गमतीशीर आहेत. त्यापैकीच एक “खो खो” हा खेळ. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत उगम झालेल्या या खेळाची पाळेमुळे चक्क महाभारतातील चक्रव्यूहापर्यंत असल्याचे तर्क आहेत. एक बुजुर्ग सांख्यिकीतज्ञ श्री रमेश सरळीकर यांच्या मते, भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीतील पीक रक्षणार्थ केल्या जाणाऱ्या उपाय योजनेतून या खेळाचा जन्म झाला असावा. उभ्या पिकांचा प्राणी, पाखरापासून बचाव करण्यासाठी लहान मुलांना एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसवून विशिष्ट आवाज काढले जातात ज्यामुळे येणारे प्राणी पक्षी दूर पळून जातात. हाच ध्वनी पुढे “खो” “खो” म्हणून प्रचलित झाला.
थोडक्यात रक्षण वृत्तीतून उगम झालेला हा खेळ आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला आहे. लांब उडी, उंच उडी, लंगडी, गल्लोरी, विटीदांडू, कुस्ती, कबड्डी हे ग्रामीण भागातील खेळ. काळौघात विकास होत वैश्विक पातळीवर स्पर्धात्मक रूपात अवतरले. खो खो हा खेळ तसा कमी खर्चाचा कमी जागेचा आणि सर्वांगीण शारिरीक, बौद्धिक, मानसिक, विकासाबरोबरच बालमनात सांघिक भावना, जिद्द, चिकाटी, वेग, चापल्य, डावपेच, धाडस, थरार वगैरे गुणांचा संगम घडवून आणतो.
१९१४ सालात पुणे जिमखाना येथे आधुनिक नियमावली बनल्यानंतर १९४४ मध्ये खोखो फेडरेशन आॅफ इंडियाची स्थापना झाली. आणि शालेय स्तरावरचा खोखो १९६० सालात पहिल्या राष्ट्रीय महिला स्पर्धेत पोहचला. जी स्पर्धा कोल्हापूर येथे संपन्न झाली होती. यानंतर मात्र या खेळाने जागतिक पटलावर ठसा उमटविला. भारत आणि दक्षिण आशियाई देशात विशेष लोकप्रिय असलेला खो खो आॅलिंपिक पर्यंत पोहचला.
आजकाल शालेय पातळीवर खेळातही एवढी स्पर्धा वाढली आहे की, मुले आनंदासाठी खेळतात की फक्त नि फक्त जिंकण्यासाठी हा देखील प्रश्न पडतो. खेळ जिंकण्यासाठी असावा; पण त्यातून खिलाडूवृत्ती विकसित व्हावी हे मनापासून वाटते. दुसरी बाजू अशी आहे की, ग्रामीण भागातच खो खो बद्दल किंचित उदासीनता जाणवते. त्याचे कारण आॅनलाइन जमाना, क्रिकेट सारख्या महागड्या खेळाचे वेड, मोबाईलचा अती वापर, अभ्यासातील अनावश्यक अपेक्षांच्या जीवघेण्या स्पर्धा, दफ्तराचे ओझे, वगैरे गोष्टींमुळे निखळ आनंद आणि शारीरिक बौद्धिक व्यायाम देणार्या अनेक मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होतय.
आज ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी हे चित्र देवून आजच्या काळात मुलांच्या सर्वांगीण विकासाची गरज अधोरेखित केली. तसेही प्रत्येक शाळेचे क्रिडाधोरण असतेच. ज्यातून तालुका जिल्हा ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडवले जातात. मात्र शाळाबाह्य कामालाच शिक्षक जुंपल्यामुळे सुद्धा इकडे दुर्लक्ष होत असावे. विषय परिचित असल्याने सर्वांनीच खूप सुंदर रचनांची पेशकश केली आहे. भावी लिखाणासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक/ कवी/ लेखक
©सहप्रशासक,मराठीचे शिलेदार समूह



