अनुभूतीचे क्षण
सौ. स्वाती मराडे-आटोळे
अनुभूतीचे क्षण
“काव्यसंग्रह प्रकाशित करावा असे वाटत होते”, पण चालढकलच सुरू होती. करूयात, करूयात.. पण मुहूर्त नसल्यासारखे झाले होते. कधीकधी कुणीतरी याची जाणीव करून द्यावी लागते. हक्काने ही जाणीव करून देणारी ‘मायेची सावली’, म्हणजे आदरणीय विष्णूदादा. समूहातील प्रत्येकाला अविरत प्रेरणा देण्याचे काम करावे ते दादांनीच. मलाही नेहमी प्रेरणा दिलीच पण यावेळी एक हट्ट केला.. तो म्हणजे संभाजीनगरला ‘गौरव अभिजात’ मराठीचा कार्यक्रम होत आहे तर यात माझे, सवूताईचे व वैशालीताईचे पुस्तक व्हावे. याच दरम्यान मी संगिता पांढरे ताई, सिंधू बनसोडे यांच्याशीही त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलत होते. त्या दोघींचेही म्हणणे आले तुमचे पुस्तक आमच्या सोबत करत असाल तर आम्ही एका पायावर तयार आहोत.. अट एकच तुमचे पुस्तक झाले पाहिजे.
सवूताईला फोन केला, ‘मी पुस्तकाचा विचार करतेय तुझे पण पुस्तक झाले पाहिजे’. ताई अभिनंदन करतच म्हणाली.. होय गं तू तयारीला लाग माझ्यामागे सध्या कामाचा व्याप. काय करावं सवूताईचे व्हावे त्याशिवाय माझे नको असे मनापासून वाटतेय. पण नाही केले तर संगिता ताई व सिंधूचाही विचार डळमळीत होईल. वैशालीताई आजारी असल्याने हट्ट करताच येत नव्हता. शेवटी विष्णूदादा, संगिताताई व सिंधू यांच्या मनातील विचार पती श्री. कैलास मराडे सरांना सांगितला तर सर म्हणाले तू यापूर्वीच काव्यसंग्रह प्रकाशित करायला हवा होता. झाले.. मग काय हिरवा कंदील मिळताच सुरू झाला काव्यसंग्रहाचा प्रवास.
खरेतर आजचा हा लेखनप्रपंच या सर्वांचे विशेष आभार मानण्यासाठीच. माझ्या या काव्यसंग्रहास प्रस्तावना लिहून उपकृत केले ते शब्दप्रभू विष्णू संकपाळ यांनी. देवघर कितीही प्रसन्न असलं तरी निरांजन लावल्याशिवाय तेथे मांगल्याची अनुभूती येत नाही. प्रस्तावनारूपी निरांजन लावून दादांनी काव्यसंग्रहाचा दिप पेटविला. आदरणीय सौ. सविता पाटील- ठाकरे यांचा शुभेच्छा संदेश म्हणजे त्याच देवघरात निर्मल फुले वाहून जागवलेले चैतन्य होय. तर ज्येष्ठ लेखिका आदरणीय वृंदाताई करमरकर यांचाही शुभेच्छा संदेश म्हणजे पारिजाताचा दरवळ. इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार व आदरणीय व्यक्तिमत्व श्री दत्तात्रयमामा भरणे यांचा शुभेच्छा संदेश व्यस्तेतून मिळेल असे अजिबात वाटत नव्हते, पण आमचे मामा म्हणजे अगदी कार्यतत्पर. त्यांनीही शुभेच्छा संदेश तत्परतेने पाठवून मन प्रफुल्लित केले.
मुखपृष्ठ करायचे आहे हे ऐकताच लगेचच साहित्य आणून चित्र तयार करून देणारी माझी मैत्रीण पल्लवी घुगे-वणवे.. खरोखरच चित्रातून तिने ‘मंगलता’ आणली. हे सगळे दुवे जोडून शेवटी ज्यांच्या हातून हा काव्यसंग्रह आकारास आला ते म्हणजे आदरणीय राहुलदादा पाटील. या सर्वांचीच मी ऋणाईत. या सर्वांमुळे एक तरल अनुभूती अनुभवता आली. प्रकाशनासाठी लाभलेला दिमाखदार सोहळादेखील अविस्मरणीयच. आयोजक संभाजीनगर टीममधील सर्वांचे पुनश्च धन्यवाद. मराठीचे शिलेदार समूहातील सर्व ताई दादांचे मनापासून धन्यवाद. आपणा सर्वांच्या शुभेच्छा सदैव सोबत राहो.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध” .



