वेदना असल्या तरी उद्याच्या सुखासाठीची धडपड ‘कसेही पण असेही’; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
वेदना असल्या तरी उद्याच्या सुखासाठीची धडपड ‘कसेही पण असेही’; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
प्रत्येकाचाच जन्मापासून आयुष्याचा प्रवास सुरू होतो. बालपणापासून अविरत सुरू झालेला हा प्रवास पुढेपुढे घेऊन जात असतो. कधी स्वतःहून स्वीकारलेला, तर कधी परिस्थितीला शरण जाऊन वाट्याला आलेला मार्ग. कुणाच्या वाट्याला सुखकर मार्ग येतो, तर कुणाच्या वाट्याला संकटाच्या काट्यांनी भरलेला. पण मार्ग कसाही असला तरी काळ कधी कुणासाठी थांबतो का ? कालक्रमणासोबत चालावेच लागते. वाट दु:खाची असली तरी समोर आशेचे किरणदेखील असतात. ते आशेचे किरणच वाटचाल सुखकर करतात. “आज वेदना असल्या तरी उद्याच्या सुखासाठीची आज चाललेली धडपड म्हणजे जगणे होय”. त्यामुळेच गरिबी असली, किंवा आज कठीण असला तरी समोर असलेल्या संकटाचा भार कधी वाटतच नाही आणि सहजपणे काहीच मिळत नाही याची जाणीव ठेवली तर कष्टाचाही कधी भार वाटत नाही.
उलट आहे त्यातून मार्ग काढत जगण्याचा सोहळा कसा होईल हेच पाहिले जाते. शून्यातून सुरुवात करून विश्व निर्माण केले तर होणारा आनंद हा वर्णनातीतच असतो. पण हे विश्व निर्माण करण्यासाठी मनात हवी असते जिद्द, कष्ट करण्याची तयारी, संकटातून मार्ग काढण्याची तयारी.. अन् कधी कधी संकटाला चकवा देण्यासाठी जुगाड करण्याची हुशारी. खरेतर सर्वसामान्यांच्या जीवनात दररोजच कोणत्या ना कोणत्या समस्या उभ्या ठाकलेल्या असतात. पण संकटाच्या छाताडावर उभे राहून यशाचा झेंडा तो रोवत राहतो.. कसेही पण असेही..!
“संकटाला चकवा देण्याचा, मनास जडलाय छंद,
कसेही पण असेही.. घेतो जगण्याचा आनंद..!”
आज गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र ट्रॅक्टर ट्राॅलीवर एकावर एक रचलेली पोत्यांची भली मोठी थप्पी असूनही त्यावर आरामात पहुडलेले प्रवासी.. संकटास न घाबरणारे, परिस्थिती कशीही असली तरी जगण्याचा आनंद घेणारे, सोबत करणारे असतील तर प्रवास किती सुखकर असतो याचा अनुभव देणारे, जगणं एक रिस्क आहे पण आनंदाचा टास्क आहे हे सांगणारे.. ना कोणती तक्रार ना कोणता आकांत.. एक ना अनेक भाव मनात आले. रोजच्या जीवनात सामान्य लोकांना कसे जुगाड करून वावरावे लागते याचेदेखील चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
आजच्या आपणा सर्वांच्या वैविध्यपूर्ण रचनादेखील हाच आशय घेऊन व्यक्त होणाऱ्या. खरेतर असा प्रवास म्हणजे जीव धोक्यात घालणे. ज्याचं जगणंच संघर्षाने भरलेलं आहे व आव्हानांनी भारलेले आहे.. त्याला कसला धोका नि कसले काय.. होईल ते पाहू अन् आत्ताचा क्षण जगून घेऊ. हेच काय ते ध्यानीमनी. जीवनप्रवासाचा अंतिम टप्पा गाठतानाचा येणारी संकटे सूचित करणारेच आजचे चित्र जणू शब्दरूपात चारोळीतून अवतरले. मनस्पर्शी शब्दांनी लक्ष वेधून घेतले. चित्रात दिसणारा भाव व लाक्षणिक अर्थानेही रचना शब्दबद्ध झाल्या. अशा बहारदार लेखणीसाठी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ स्वाती मराडे,पुणे
मुख्य परीक्षक,लेखिका,सहप्रशासक
मराठीचे शिलेदार समूह



