“अस्तित्वासाठी मोबाईलच्या एका कप्प्यात मीसुद्धा जागा मिळवली”: स्वाती मराडे
गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“अस्तित्वासाठी मोबाईलच्या एका कप्प्यात मीसुद्धा जागा मिळवली”: स्वाती मराडे
गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
साधंभोळं रूप होतं माझं. जणू एखादे आयताकार खोकेच. त्यावर गोलाकार मागेपुढे फिरणारी बटणे. कुठे खूप मोठा तर कुठे अगदी खिशात मावेल एवढा. पण मनोरंजन करणारा घरोघरी जणू एकुलता एक. त्यामुळे सर्वांचा अगदी लाडका. सकाळीच विशिष्ट संगीताने माझी दिवसाची सुरूवात व्हायची. कित्येकांना ते संगीतही ऐकायला खूप आवडायचं. एकापाठोपाठ एक कार्यक्रम सुरू असायचे. पुढे काय लागणार अशी उत्सुकता तर सगळ्यांना असायची. बोटाच्या क्लिकवर हवे ते मनोरंजन लावणारांना त्यातली मजा कळणारच नाही. ध्यानीमनी नसताना अचानक एखादं आवडतं गाणं लागलं की ऐकणाराच्या चेहऱ्यावरील आनंद पाहणं म्हणजे काय हे केवळ मीच सांगू शकत़ो. कित्येकांच्या कित्येक आठवणी माझ्याशी निगडित आहेत. तुमच्याही नक्कीच असतील ना.. गदिमांचे गीतरामायण प्रत्येकाच्या ओठी पोहचवण्यात माझा वाटा होता याचा किती अभिमान वाटतो मला..!
काळ झपाट्याने पुढे जात राहतो. या कालचक्रात कोणा ना कोणाला आपले शरीर सोडून जावे लागते. आताशा बदलणा-या काळात मलाही याची जाणीव होऊ लागली. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित होतो. पण तरीही तुम्ही मानव म्हणता तसे आत्मा अमर असतो हे मलाही पटलंय. काळाबरोबर जुने पांघरूण टाकून नवीन वस्त्र धारण करावे तसे माझे जुने अस्तित्व संपले तरी नवीन रूपात मी माझे अस्तित्व टिकवून आहे. बदल ही काळाची गरज हा मंत्र मीही अवलंबला व नव्या तंत्रज्ञानाशी हात जुळवला. संगणक, डीव्हीडी, मोबाईल यांच्या एका कप्प्यात मीसुद्धा जागा मिळवली. आधीचे साधेभोळे रूप आता बदलले. कालानुरूप बदल स्विकारला नाहीतर आपण कालबाह्य झाल्याशिवाय राहत नाही हेच खरे.
माझ्या अस्तित्वाला नव्हती,
जरीची कलाबूत
वर्तमान सुटले,भविष्य बुडाले
आता उरले केवळ भूत..!
असे व्हायला नको असेल तर.. अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर.. काळाबरोबर चालायला शिकलेच पाहिजे. मनोरंजनाची अनेक साधने आली. एकुलता एक असणा-या मला अनेक सगेसोबती मिळाले. या सगळ्या भाऊगर्दीत मी माझे अस्तित्व अजूनही टिकवून आहे. आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र जुन्या काळातील रेडिओ.. ‘माझे अस्तित्व’ हे शीर्षक घेऊन. रूप बदलले तरी आजही वेगळ्या स्वरूपात स्व अस्तित्व टिकवून असलेला हा रेडिओ अनेक आठवणी जाग्या करणारा. घराघरात मनोरंजनाचे साधन असलेला. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे सांभाळला जात असे. रेडिओशी निगडीत हृदयस्पर्शी आठवणी जागवत.. तर कुठे अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे करत, मानवी जीवनाशी सांगड घालत.. अनेक आशयघन रचना समूहात आल्या. आपल्या या वैचारिक लेखणीसाठी सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
स्वाती मराडे,इंदापूर जि पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/लखिका
©मराठीचे शिलेदार समूह



