‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे….’
अनिल मेश्राम, सौंदड
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे….’
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, असे संत तुकारामांनी म्हटले आहे. समानता आणि त्याग तशा स्वतंत्र दोन बाबी आहेत. तरीही त्या एकाच ठिकाणी अनुभवायला येतात. ते म्हणजे झाड. माणूस प्राणीजगात निश्चितच हुशार व बुद्धिजीवी आहे. माणूस आणि झाड याचं जन्मोजन्मीच अतुट नातं आहे. तरीही माणूस सकल मानवजातीशी समानतेने वर्तन करताना दिसत नाही.
भारतीय संविधानात समानतेला महत्त्व दिले आहे. तरी शिकली सवरली माणसं माणसांशी समानतेने वागताना दिसत नाही. देशाला साधू, संत, महात्मे व थोर पुरुषांची परंपरा लाभली आहे. हजारो वर्षे निसर्गात मानवाने उपासना, तपश्चर्या केली, ज्ञान प्राप्त केले.त्यांच्याच सुसंस्कृतीच्या बळावर जगात आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ मानली जाते. असे असतांना कधी कधी मनात विचार येतो की, माणूस म्हणून आपण माणसासारखे वागतो की नाही? मानवजातीची नाती असंख्य आहेत. आईवडील, बहिण भाऊ, मित्र मैत्रिण, गुरु- शिष्य ही सगळी पवित्र नाती जोपासली जातात काय? कधी असेही अनुभव येतात. माणूस एखाद्याशी मैत्रीपूर्ण भाव ठेवून नाते जपतो, कधीकधी रक्ताची व प्रेमाची नातीही दुरावली जातात. हे असे का? तेव्हा आठवते झाड. माणूस माणसाशी समानतेने वागत नाही. त्याग तर मग कोसो दूर राहिला.
अजुनही सामान्य माणसाला त्याग समजला नाही.एखाद्याला मदत करणे, मुलाबाळांना शिकविणे, त्यांची लग्न करून देणे यालाही काही जण त्याग समजतात. हे सर्व अनुभवताना खूप दुःख होते. मन हेलावून जाते. आजही आपण कुठे आहोत? माणसाने झाडापासून समानता आणि त्याग शिकावा. झाड सदा सर्वकाळ ऊन, पाऊस, वादळ, वारा, थंडीत दिवसरात्र सर्वानाच समानतेची वागणूक देते. हा पक्षी माझा नाही, गायीने इथे विसावू नये, माणसाने माझी फुले, फळे घेऊ नये असा कसलाच भेदभाव वृक्ष कधीच करत नाही. म्हणजे या पृथ्वीतलावरील सर्व सजीव त्यांचे मित्र व सगेसोयरे आहेत. त्यांच्यासाठी उभे आयुष्य त्यागमय जगून आपण मानव जातीला प्राणवायू देतोय.त्या खऱ्या मित्राला माझा मानाचा मुजरा.
आतातरी मानवाने झाडापासून धडा घ्यावा एवढीच अपेक्षा. चला संकल्प करुया, झाडाप्रमाणे जगण्याचा… वैशाखातही पळसाप्रमाणे बहरण्याचा..!! प्रत्येक भारतीयाने किमान एक रोपटे लावून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. खरे तर आज देशाला अर्थातच, सकल मानव जातीला विचार करण्याची गरज आहे. पर्यावरणाचा -हास होतोय यासाठी आपणच जबाबदार आहोत. हे सत्य स्वीकारून पर्यावरणाचा समतोल राखण्यास आपणच आपल्यापासून सुरूवात करू या..!! ‘चला एक तरी झाड लावू या’.
अनिल मेश्राम, सौंदड
ता. सडक अर्जुनी, जि.गोंदिया
(लेखक निवृत्त मुख्याध्यापक आहेत)



