‘धर्म, अधर्माचे युद्ध पाहणारी.. हीच ती रणभूमी’; स्वाती मराडे
'गुरुवारीय चित्रचारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘धर्म, अधर्माचे युद्ध पाहणारी.. हीच ती रणभूमी’; स्वाती मराडे
‘गुरुवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘नाही नाही. मी हे शस्त्र हाती धरू शकत नाही. पहा समोर सगळे माझेच सगे आहेत. यांना मी मारायचं? राजगादीसाठी स्वकीयांनाच गमवायचं. त्यापेक्षा वनवास बरा नव्हे काय? हे माधवा मी माझ्याच कुटुंबियांविरोधात उभे राहू शकत नाही..!’ काय करावं. शस्त्र हाती धरावं की भ्याडपणाचा कलंक घेऊन येथून पलायन करावं. काहीच सुचत नव्हतं अर्जुनाला. हतबल झालेला पार्थ पहात होती ती भूमी. तेव्हाच ‘कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन’ हा जीवनमंत्र तिला ऐकायला मिळाला. ‘हे पार्थ, क्षत्रिय धर्माचं पालन करून क्षत्रियांप्रमाणे हक्कासाठी लढा.’ या शब्दांनी द्विधा मनस्थितीत अडकलेल्या अर्जुनाला जिथे गितोपदेश मिळाला, धर्म विरुद्ध अधर्म यांची लढाई जिने पाहिली, ती भूमी,हीच ती रणभूमी. धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र.!
सुईच्या अग्रावर बसेल एवढी जमीनही मी पांडवांना देणार नाही असे म्हणणा-या दुर्योधनाचा विनाश, द्रौपदीच्या अपमानाचा बदला, चक्रव्यूहात फसलेला अभिमन्यू, कोवळ्या कलेवराला लाथाडणारा जयद्रथ, त्याच्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी भीष्म प्रतिज्ञा करणारा अर्जुन, सिंहासनाशी इमान राखण्यासाठी धारातिर्थी पडणारे भीष्म, सत्यधर्माचे पालन करणारा असूनही ‘नरो वा कुंजरो वा’ असे म्हणत संदिग्धता निर्माण करताना युधिष्ठिर, मित्रप्रेमासाठी अन्यायास साथ देणारा कर्ण, सत्तेच्या दबावाखाली येऊन अधर्माचा साथ देणारे कृपाचार्य. अन् लढाई धर्म अधर्माची असली तरीही त्यामुळे जीव गमावलेले लाखो सैनिक किती नि काय पहात होती ती भूमी..!
जेव्हा कधीही धर्म अधर्मात युद्ध सुरू होतं; तेव्हा तेव्हा आठवतं हे महाभारत. सद्यस्थितीत युद्धाचं स्वरूप बदललं पण अजूनही त्याकाळातील मानसिकतेचे दर्शन घडतेच. कदाचित याची झलक नुकत्याच झालेल्या सत्तेच्या राजकारणात पहायला मिळाली असेल. शेवटी हेही लक्षात येते सत्याचाच अंतिम विजय निश्चित असतो. त्यामुळे परिस्थिती कितीही विपरीत आली तरीही सत्य धर्मापासून तसूभरही विचलित होऊ नये. ‘पांडव विजयी झाले मात्र त्यापूर्वी त्यांना अपरिमित यातना भोगाव्या लागल्याच’. जेव्हा अधर्माच्या पापाचे घडे भरत असतात, तेव्हा धर्माचीही नियती परीक्षा घेत असते.
आजच्या ‘गुरुवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेसाठी महाभारत कालीन रणभूमीचे चित्र पाहून अनेक विचारतरंग उमटले व बहुविध रचनांमधून ते साकार झाले. वरवर सहजसोपा वाटणारा विषय किती गर्भित अर्थ घेऊन साकार करता येतो याचीच जाणीव आजच्या रचनांमधून झाली. असेच लिहित रहा या शुभेच्छांसह सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ.स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक, सहसंपादक,कवयित्री लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह





