कुंभमेळ्याचा सोहळा’; हिंदू धर्मियांची महा पुण्य पर्वणी
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
‘कुंभमेळ्याचा सोहळा’; हिंदू धर्मियांची महा पुण्य पर्वणी
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे.दि.10 जाने: (प्रतिनिधी) यंदा महासंक्रातीच्या पवित्र मुहूर्तावर भरणारा कुंभमेळ्याचा सोहळा सनातन हिंदू धर्मियांची महापुण्य पर्वणी असल्याने त्यात देशाच्या कानाकोप-यातून साधुसंत आणि भक्तगण प्रयागराज येथे मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
या अमृतमयी सोहळ्याची जैय्यत तयारी झाल्याचे वृत्त एकीकडे प्रसिध्द होत असतानाच दुसरीकडे अतिरेक्यांकडून धमकी आणि वक्फ बोर्ड यांनी जागेचा उकरून काढलेला वाद याचेही वृत्त येऊन धडकत आहेत. पण सर्वसामान्य हिंदू माणसाला मात्र या वादांशी काही देणेघेणे नाही. सनातन परंपरेवर नितांत श्रध्दा असणारे लाखो भक्त प्रयागराजच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. अशाच भक्तांपैकी एक कुंभमेळ्याचा सोहळा अनुभवलेले श्री. सुनिल देशमुख यांच्याशी संवाद साधला आणि या सोहळ्यात सहभागी होण्याची एवढी ओढ भक्तांना का वाटते, हे जाणून घेतले!
देव दानवांच्या युध्दात समुद्र मंथन झाले. या मंथनातून अनेक मौल्यवान वस्तू बाहेर आल्या, हे आपल्याला प्राचीन ग्रंथांमधील पुराणकथांमधून माहित आहे. याच अमृत मंथनातून धन्वंतरींच्या हाती अमृतकुंभ लागला. देव आणि असुर यांच्या झटापटीतून कुंभातील अमृत काही ठिकाणी सांडले. प्रयागराज, उजैन, नाशिक, हरिद्वार ही ती चार स्थळे आहेत. दर १२ वर्षांनी यापैकी एका ठिकाणी कुंभमेळा भरतो आणि दर 144 वर्षांनी ‘महाकुंभ’ मेळ्याचे आयोजन करण्यात येते.
यंदा दि.13 जानेवारीला गंगा,यमुना, सरस्वती या त्रिवेणी संगमावर प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होत आहे. पुराणातील उल्लेखानुसार सर्वांची पापे धुता धूता मलीन झालेल्या गंगेने पवित्र होण्यासाठी भगवान शंकराला वर मागितला. शंकराने प्रसन्न होऊन वर देताना सांगितले, “हे गंगे, हजारो साधू संत महंत तुझ्या पात्रात एका विशिष्ट तिथीला स्नान करतील, त्यांच्या तपःसामर्थ्याने आणि पुण्य स्पर्शाने तुझे जल पवित्र होईल” त्यानुसार उत्तरायण सुरू झाल्यानंतर विशिष्ट तिथीच्या मुहूर्तावर कुंभमेळा भरवण्यात येतो. त्यावेळी गंगास्नानाचे पुण्य पदरी पडण्यासाठी भाविकांची गर्दी दाटते. मी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून कुंभ मेळा “याची देही याची डोळा” अनुभवला, हे मी माझे भागूय समजतो!
मित्रांसह मी नागा साधूंच्या आखाड्यासोबत सहभागी झालो होतो. या साधुंमध्ये प्रचंड आध्यात्मिक शक्ती असते. प्रत्येक कुंभ मेळ्यात विविध आखाडे असतात. जसे की, निरंजनी आखाडा,जुना आखाडा, पंच दशनाम आखाडा, निर्वाणी आखाडा, इ. आखाड्यांच्या माध्यमातून विविध साधू संत या आखाडा समुहातून प्रत्येकी दहा हजार , असे साधारण लाखो साधू सहभागी होतात. त्यांच्या तपोबलाचे सामर्थ्य दाखवून शस्त्र व शास्त्र विद्येचा अविष्कार मोठया दिमाखदार शैलीत सादर होतो. यात नागा साधूंना पहिल्या शाही स्नानाचा मान असतो.
या मेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकही मनुष्य उपाशी राहत नाही. जागोजागी इथे उत्तम भोजन व्यवस्था केलेली असते. मोठे शामियाने,राहुट्या,तंबू यामधून साधू संतांची निवासव्यवस्था असते. दिवसभर हवन, यज्ञ, याग,धार्मिक अनुष्ठान,जप, तप हरिकथा असे भरगच्च कार्यक्रम असतात. शिस्तबध्द कडक अनुशासन हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. गुरू, स्वामी, महामंडलेश्वर, महंत यांच्या आज्ञेप्रमाणे सर्व विधी पार पडताना डोळ्यांचे पारणे फिटते.
गंगा स्नानात शरीराबरोबरच चित्ताचीही शुध्दी होते. साधूसंतांच्या सानिध्यात अतिशय प्रसन्न चित्ताने मी हा कुंभमेळ्याचा दिव्य सोहळा भरभरून अनुभवला. सर्व हिंदू धर्मियांना या सोहळ्याचे इतके आकर्षण का वाटते, ते हा सोहळा अनुभवल्यावरच कळते.
सुनिल अशोकराव देशमुख
बँक मॅनेजर,छ.संभाजीनगर.



