आजपासून नवीन पुस्तक वाचनाला सुरुवात केली
नरेश शेळके (सचिव)
आजपासून नवीन पुस्तक वाचनाला सुरुवात केली
“उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे”. अस्पृश्यतेमुळे वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेणारा विद्यार्थी,पदोपदी तिरस्कार ,अपमान, कमालीची गरिबी, संघर्ष करीत करीत शिक्षण घेणारा हा विद्यार्थी, अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात जाऊन, विद्यापीठांमधील शतकातील सर्वोत्तम विद्यार्थ्याचा बहुमान मिळवणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित जगदीश ओहोळ यांच्या अप्रतिम लेखनीतून साकारलेले हे पुस्तक आहे.
पदोपदी मिळणारा तिरस्कार आणि अपमानाचा बदला घ्यावा तो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्यानेच. हजारो वर्षापासूनच्या उपेक्षित, शोषित, पीडितांचा आवाज म्हणून ते पुढे आले आणि फक्त स्वतःचाच नाही, तर कोटी कुळांचा उद्धार त्यांनी करून दाखविला. हजारो वर्ष खितपत पडलेल्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारा व जग बदलणारा हाच तो बाप माणूस! माझा भिमराय!
७ नोव्हेंबर १९०० रोजी भीमराव रामजी आंबेडकर यांचे शाळेत पहिले पाऊल पडले. हे पाऊल म्हणजे एका अस्पृश्यतेच्या, एका दैन्याच्या ,एका मागासलेपणाच्या, गरतेतून एका नव्या शैक्षणिक क्रांतीच्या, एका नव्या स्वाभिमानाची पेरणी करणाऱ्या विश्वाच्या दारात टाकलेलं परिवर्तनाचे पाऊल होतं! त्यामुळे शासनाने ७ नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करण्याचा आदेश काढला आहे. ‘एक वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी ते जगातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी’ हा भिमरायाचा जाज्वल प्रवास म्हणजे, पिढ्यान पिढ्यांच्या अन्यायाविरोधात पेटून उठण्यासाठी ‘मोटिवेशनल आयडॉल’ आहे.”भिवाची पावलं जर त्या शाळेकडे वळली नसती, तर आजही गावगाड्यातल्या या माणसाला माणूस म्हणूनही ओळख मिळाली नसती! “
सुमारे ३५० वर्षापूर्वी, म्हणजे ६ जून १६७४ रोजी या देशात जगातील अलौकिक घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन जगातील पहिले अलौकिक रयतेचे राज्य स्थापन केले. या राज्याला नैतिकतेचे अधिष्ठान होते, स्वातंत्र्य व समतेची किनार होती. स्वाभिमानाची हुंकार होती, स्त्री सन्मानाची जाण होती. या लोककल्याणकारी राजाने सार्वभौम स्वराज्याचा मंगल कलश रयतेला अर्पण करून, रयत सुखी व समृद्ध केले.
तसेच सुमारे ७५ वर्षा अगोदर म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भिमरायांनी लिहिलेली राज्यघटना संविधान सभेने देशाला समर्पित केली व २६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना भारताने अमलात आणली. आणि आपला देश हा नागरिकांसाठी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांची जपणूक करणारे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक गणराज्यावर आधारित राष्ट्र झाले. व तेव्हापासून भिमरायाची भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून जगासमोर नवीन ओळख निर्माण झाली.
शिवरायांचे रयतेचे राज्य आणि भीमरायाच्या घटनेतील साम्य म्हणजे दोघांनीही जुन्या कर्मठ परंपरांना ठोकर मारत नवीन मानवी मूल्यांची जपणूक करणारा समाज घडविला. त्यामुळे लेखक आपल्या एका गीतात म्हणतात की, शिवरायांनी जो रयतेचा न्याय निवाडा केला तोच निवाडा भिमरायाच्या घटनेमध्ये आला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात आपल्या देशाची सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती झाली आहे.शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, कृषी, विज्ञान, अवकाश ,सांस्कृतिक, औद्योगिक, निर्यात, शहरी व ग्रामीण विकास इत्यादी क्षेत्रातील झालेल्या प्रगतीमुळे आज देशाची वाटचाल ही महासत्ता होण्याच्या दिशेने चालू आहे.यामध्ये संविधानाचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. जग बदलविणारा बापमाणूस म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे पिढ्यानपिढ्यापर्यंत सर्वांना ऊर्जा आणि लढण्याचे बळ देत राहणार. रयतेचे राजे शिवराय व घटनेचे शिल्पकार भीमरायांना माझा मानाचा मुजरा.
जय भीम!जय शिवराय!
पुस्तकाचे नाव: जग बदलणारा बापमाणूस
लेखक – जगदीश ओहोळ
प्रस्तावना- डॉ.भालचंद्र गुनगेकर
( माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ)
पाठराखण! – डॉ. आ.हा.साळुंखे.
( ज्येष्ठ विचारवंत व लेखक)
हे पुस्तक, कोलंबिया विद्यापीठात प्रकाशित झालेले पहिले मराठी पुस्तक आहे.
नरेश शेळके (सचिव)
यशवंतराव चव्हाण सेंटर
जिल्हा केंद्र बुलढाणा



