मराठ्यांना ६० वर्ष चुना लावणारा माणूस यशस्वी झाला; खोतांची जहरी टीका
इंडिया आघाडी लुटारूंची टोळी
मराठ्यांना ६० वर्ष चुना लावणारा माणूस यशस्वी झाला; खोतांची जहरी टीका
इंडिया आघाडी लुटारूंची टोळी
मुंबई: शरद पवार यांनी 60 वर्षांमध्ये मराठ्यांना चुना लावायचे काम केल्याची जहरी टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली. पण चुना लावणारा माणूस यावेळी यशस्वी झाला ही गोष्ट नाकारुन चालणार नसल्याचे खोत म्हणाले. जनतेच्या मनामध्ये दूषित वातावरण निर्माण करण्याचं काम हे महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये केल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. आम्ही महायुतीसोबत कायम राहू असेही खोत म्हणाले.
सरकार आल्यावर मराठ्यांनी OBC मधून आरक्षण देऊ असं शरद पवारांनी लिहून द्यावं
शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटलांना लिहून द्यावं की, त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आम्ही 10 टक्के ओबीसीमध्ये आरक्षण देऊ असेही सदाभाऊ खोत म्हणाले. जरांगे फॅक्टरचा सुद्धा महायुतीला तोटा झाल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. महायुतीमधील आमच्या सगळ्या घटकपक्षांनी प्रमाणिकपणाने लोकसभेमध्ये काम केल्याचे खोत म्हणाले. आमच्या नेत्यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन सभा घेतल्या होत्या. विधानसभेला आम्ही निश्चितपणाने आमची भूमिका मोठ्या तिन्ही पक्षांच्या समोर मांडणार असल्याचे खोत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहावं
लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्रित बसून आज चर्चा केली. महायुतीला ज्या काही जागा कमी मिळाल्या त्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला सरकारमधून मुक्त करावं, पण निवडणुकीची सर्व जबाबदारी ही सर्वांची असल्याचे खोत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहावं असे सदाभाऊ खोत म्हणाले. या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने घेऊन जाणारे नेतृत्व देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या नेतृत्वाची गरज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आहे. महायुतीचे नेतृत्व सुद्धा येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांनी करावे असे सदाभाऊ खोत म्हणाले.
इंडिया आघाडी लुटारूंची टोळी
देशाला विकासाच्या वाटेवरून घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून आज संपूर्ण देश आणि जग नरेंद्र मोदी यांच्याकडे बघत आहे. इंडिया आघाडी ही खऱ्या अर्थाने लुटारूंची टोळी असल्याचे खोत म्हणाले.ही टोळीवाल्यांची आघाडी आहे आणि म्हणून आम्ही एक इस्लामपूरला मेळावा घेतला. आमची लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. भारतातली कष्ट करणारी जनता यांना घेऊन आम्ही लढत आहोत असं खोत म्हणाले. या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं अनेक बागुलबुवा निर्माण केले गेले. त्याचाही परिणाम या निवडणुकीवर परिणाम झाल्याते खोत म्हणाले





