किल्ले गंभीरगड
सौ. स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे

किल्ले गंभीरगड
कोकणामधील सर्वात उत्तरेकडील जिल्हा ठाणे. निसर्गाची विविध रुपे अंगाखांद्यावर मिरविणारा ठाणे सागराचा दंतूर किनारा आणि घनदाट जंगलांनी वेढलेले डोंगर, दऱ्याखो-यांनी समृद्ध आहे. या दुर्गम डोंगररांगामध्ये अनेक गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत. याच गिरीदुर्गामध्ये गंभीरगड नावाचा वनदुर्ग मोठ्या दिमाखात उभा आहे.
गंभीरगड ठाणे जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यामध्ये आहे. मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग डहाणू तालुक्यामधून जातो. त्यामुळे डहाणू तालुक्याचे पूर्व आणि पश्चिम भाग झाले आहेत. डहाणूच्या पूर्व भागात समुद्र सपाटीपासून ६८६ मी. उंचीवर हा गिरीदुर्ग आहे.
पायथ्यापासूनच गडाचा कातळमाथा आपले लक्ष वेधून घेतो. याचे दोन भाग दिसतात. डावीकडील म्हणजे पश्चिमेकडील माथ्यावर सुळक्यासारखे स्तंभ उभे राहिलेले दिसतात. तर पश्चिमेकडे सलग कातळमाथा दृष्टीस पडतो. या माथ्याच्या मध्यावरील दांड वाटेने गड चढावा लागतो. येथून अर्धा पाऊण तासात आपण तटबंदीपाशी येऊन पोहोचतो. तटबंदी ओलांडल्यावर उजवीकडील कातळमाथ्याच्या पायथ्याला जाता येते. वाटेजवळ लहानसे मंदिर आहे. हे चांदमाता देवीचे मंदिर आहे. कड्याच्या पोटात पाण्याची टाकी कोरलेली आहेत. तीन पैकी दोन टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे. किल्ल्यावर गडाच्या गडपणाच्या खाणाखुणा तुरळक प्रमाणात आहेत. कातळकड्याच्या माथ्यावर चढल्यावर दूरपर्यंतचा प्रदेश पहायला मिळतो. माथ्यावर गडाची देवी जारवमाता आहे. तिचे दर्शन घेऊन सभोवार नजर फिरवली की निसर्गाची रौद्रता मनात धाक भरविते. गडाच्या पश्चिमेकडील असिताष्म प्रकारचे स्तंभ उत्तम दिसतात. गडावरून सिल्व्हासाचे दर्शन चांगले होते. पूर्वेकडे जव्हार, भास्कर, उतवड, हर्षगड ही दिसतात. पश्चिमेकडे तलासरी पासून समुद्रापर्यंतचा भाग दृष्टीपथात सामावतो. गडावर दोन तोफांही आहेत.
गंभीरगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील तलासरी या तालुक्याच्या गावाकडून उधवामार्गे गंभीरगडाचा पायथा गाठता येतो. तसेच महामार्गावरील चारोटीनाका -कासा- सायवानमार्गे येऊन गडूचा पाडा या छोट्याशा वस्तीजवळून आपण व्याहाळी या गंभीरगडाच्या पायथ्याला पोहोचू शकतो. हा धोपटमार्ग असून चढाईही सोपी आहे.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध





