हक्काचे व्यासपीठ
एक हक्काची व्यक्ती हवीच. सर्व मनातले सांगायला. न सांगता त्याला मनातले सारे कळायला हवे. चेहरा पाहिला की आपल्या आतली उलघाल काय आहे हे त्याला समजले पाहिजे. अशी आपल्या जीवनात आलेली पहिली व्यक्ती म्हणजे ‘आई’. आपण आपल्या बऱ्याचशा गोष्टी आईला शेअर करत असतो. आणि आपल्या मनातलं आई अचूक ओळखते. दुसरी व्यक्ती आलेली असते ती पती किंवा पत्नी. या दोघांचे नाते इतके छान होऊन जाते की आपोआप त्यांना मनातलं कळायला लागतं. नजरेची भाषा समजायला लागते. आपण टेलीपथी असं म्हणू शकतो या गोष्टीला. अनेक वेळा मनात काय चालले आहे, हे समोरच्या व्यक्तीला समजते. आणि मग आपण न बोलता ती व्यक्तीने ते सांगितले की मग त्यावर उपाय आपोआप निघत जातात.
तरीसुद्धा काही गोष्टी अशा असतात, की आई किंवा आपला सखा, सखी याला सांगू शकत नाही आपण. त्यावेळी मात्र एक हक्काची व्यक्ती निश्चित असावी. ती मैत्रीच्या स्वरूपातील असावी. आपल्या मैत्रिणीला, मित्राला आपण आपल्या मनातलं सगळं शेअर करता आला पाहिजे. आपल्या नात्यात खूप ट्रान्सपरन्सी हसायला हवी. मैत्री अगदी पाण्यासारखी पवित्र असायला हवी. मनातल्या कितीही खोल जखमा असतील तर त्यापुढे मांडता आल्या पाहिजेत. सुख मांडता आलं पाहिजे. या सुखदुःखाचा व्यवहार होता कामा नये. त्याचा गैरफायदा कोणी घेता कामा नये.
अगदी लहान सहान गोष्टी असतात. त्या आपल्या पतीसमोर किंवा आपल्या पत्नीसमोर आपण त्या मांडू शकत नाही. मनात एक दडपण असतं की काय म्हणतील हे? काय म्हणाली ही…? अशा वेळेला मैत्रीपूर्ण वातावरणात वाढलेलं आपलं एक रोपट असतं, त्या रोपट्याला पण खत पाणी घातलेलं असतं आणि ते हक्काचं असतं. यामध्ये त्याला रुजवलं की कोणतेही प्रॉब्लेम येत नाहीत. अशी निखळ मैत्री होऊ शकते. शंभर टक्के होऊ शकते. आपण फोन केला त्या व्यक्तीला कळतं की हिला काहीतरी बोलायचं आहे ते कळतं कशावरून आपल्या आवाजावरून कळतं.
आवाजाचा रोख जरा जरी बदलला तरी, त्या व्यक्तीला समजतं हिला / ह्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा अरे वा हे खूप आनंदात आहे अशा प्रकारे आनंद, दुःख आवाजावरून खरंच ज्याला कळतं तो आपला मित्र ती आपली मैत्रीण. मग हे आपला ‘हक्काचं व्यासपीठ’ झालं. सुखदुःखाचे मांडणी करण्यासाठी या हक्काच्या व्यासपीठाला मानाचा मुजरा…!!
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
==============



