‘जागर माय मराठीचा’
सौ. स्वाती मराडे-आटोळे
‘जागर माय मराठीचा’
अभिजात दर्जा मिळाला आता अर्वाचीन जगात स्थान टिकवायचंय. एकीकडे तिच्या प्राचीनत्वाचा डंका वाजत असताना वर्तमानात जगताना मात्र तिची दमछाक होतेय. असे म्हणतात, “जी भाषा व्यवसाय देते ती भाषा वृद्धिंगत होत जाते”. इथे मात्र परभाषिक येतात आणि त्यांच्या भाषेचे घोडे दामटतात, तेव्हा मराठी भाषिक स्वभाषेचा अभिमान सोडून त्याच्या भाषेत बोलतो आणि नकळत त्याच्या व्यवसायास हातभार लावतो. का बरे कुणी त्याला मराठी बोलायची सक्ती करत नाही?. वेगवेगळ्या कंपन्यांचे फोन येतात ती व्यक्ती हिंदी अथवा इंग्रजीतून बोलायला सुरूवात करते तेव्हा कितीजण मराठी बोलायचा आग्रह करतात? कदाचित पाच टक्केही नाही.. मग मराठी भाषिकाला कशी व्यवसायवाढीची संधी मिळेल. मराठी नाटक, चित्रपट, गाणी याबाबत कितीजण आग्रही असतात हीसुद्धा विचार करण्याची गोष्ट.
भाषा टिकवायची असेल, तर तिच्या शब्दसंपत्तीतही वाढ होणे गरजेचे आहे. पण जसजसे आधुनिकीकरण होत आहे तसतसे काही शब्द कालबाह्य होत आहेत. पाटा वरवंटा, खुंटी, देवळी, मोटनाडा, मुसळ, घंगाळ यासारखे शब्द आता वापरात नाहीत. काही इंग्रजी शब्दांसाठी असणारे मराठी शब्द अवघड वाटतात. इंग्रजी भाषेने इतर भाषांमधील काही शब्द जसेच्या तसे उचलले तसे भाषा समृद्धीसाठी काही शब्द आपणही घेतले पाहिजेत किंवा पर्यायी सोपे शब्द निर्माण केले पाहिजेत.
पूर्वी वाचनालयातून पुस्तक वाचायला मिळावे म्हणून वाट पहावी लागायची. आता जमाना बदललाय. पुस्तक वाचनालयातून आणणे किंवा विकत घेऊन वाचणे ही खूप दूरची गोष्ट झालीय. त्यामुळे ‘टेक्नोसेव्ही’ जगात आपणही तसे होऊया. सोशल मिडियावरून का होईना मराठीचा जागर करूया. फेसबुक, यू-ट्यूब, व्हाटस ॲप.. वाचकांपर्यंत पोहोचायचंय.. नवीन मार्ग शोधूया. आपली मराठी भाषा.. जी नेहमी आपल्या कानावर पडते, वारंवार ऐकून ऐकूनच तर आपण बोलायला शिकतो. ऐकून व बोलून समजलेली, उमगलेली ही भाषा मग वाचायला आणि लिहायला देखील आपलीशी वाटते. “जेव्हा हे शिकणं समजून उमजून होतं तेव्हा ते ज्ञानमर्यादा विस्तारत जातं”. पण असं हे काही सांगायला गेलं की, अनेकजण इंग्रजी महात्म्य गायला सुरुवात करतात. इंग्रजी भाषेत कसे अफाट ज्ञान उपलब्ध आहे. जागतिक स्तरावर तिचाच सगळीकडे वापर होतो. दरवर्षी तिच्या शब्दसंख्येत वाढ होत आहे वगैरे..!
पण मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांना इंग्रजी शिकणं किंवा बोलणं खरंच इतकं अवघड आहे का हो. तर मुळीच नाही. पण त्यासाठी आधी मातृभाषा मग इंग्रजी. आर्थिक व बौद्धिक दोन्ही बाजू समजून घेतल्या तर मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व नक्कीच पटेल व परिणामी मायमराठीचे स्थान अखंड टिकेल. नक्कीच जागर व्हायला हवा.. माय मराठीसाठी घेऊया ध्यास नवा.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध



