अलिबागमध्ये आगरी समाज संस्थेची पहिली मासिक सभा उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबागमध्ये आगरी समाज संस्थेची पहिली मासिक सभा उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग (प्रतिनिधी) : आगरी समाज संस्था, अलिबाग तर्फे आयोजित अलिबागमधील आगरी बांधवांची पहिली मासिक सभा शनिवारी सायंकाळी श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेला अलिबाग शहरासह परिसरातील अनेक आगरी बांधवांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश पाटील यांनी सभेचे उद्दिष्ट स्पष्ट करताना अशा प्रकारच्या सभांचे कारण, गरज आणि महत्व अधोरेखित केले. त्यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेत संस्थेतील पारदर्शकतेचे महत्व अधोरेखित केले. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून संघटितपणे काम केल्यास आगरी समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असे ते म्हणाले.
यानंतर श्री उदय म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात अशा मासिक सभांची गरज आणि संघटित होण्याचे महत्व यावर प्रभावीपणे प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, नियमित भेटी, संवाद आणि समन्वय यांमुळे समाजात विचारांची देवाणघेवाण वाढते आणि नव्या पिढीला समाजकार्यात सक्रिय सहभागासाठी प्रेरणा मिळते.
सभेत उपस्थित बांधवांनी परस्पर ओळखी करून घेतल्या आणि समाजातील सध्याच्या प्रश्नांवर खुल्या चर्चेत सहभाग घेतला. सभेत बोलताना समाजातील कार्यकर्त्यांनी आगरी संस्कृतीचे संवर्धन, तरुण पिढीचा सहभाग, शिक्षण, रोजगार, विवाह आणि सामाजिक ऐक्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन केले. आगरी समाजाला संघटित करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात Vivahamilan.com या समाजहिताच्या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. या पोर्टलच्या माध्यमातून समाजातील वधू-वरांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले. समाजातील अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
बैठकीत समाजाच्या पुढील वाटचालीसाठी काही ठोस सूचना आणि संकल्प मांडण्यात आले. दर महिन्याला अशी सभा आयोजित करून विचारांची देवाणघेवाण ठेवणे, तरुण वर्गाला समाजकार्यात जोडून घेणे, समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी योजना तयार करणे, तसेच महिला सहभाग वाढविणे या महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आला. या सभेच्या यशस्वी आयोजनासाठी ॲड. सचिन पाटील, प्रभाकर ठाकूर, राजेंद्र पाटील, सौ. दर्शना पाटील, मनोहर पाटील आणि श्रेयस ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम उत्तम पद्धतीने पार पडला. बैठकीचा समारोप “एकता, सहभाग आणि विकास” या त्रिसूत्रीचा संकल्प घेऊन करण्यात आला. पुढील महिन्यात पुन्हा अशा सभेचे आयोजन करून समाजकार्यात सातत्य ठेवण्याचे ठरविण्यात आले.



