“मातीत मोती पिकवण्याचा जुगार फक्त बळीराजाच खेळू शकतो.”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
“मातीत मोती पिकवण्याचा जुगार फक्त बळीराजाच खेळू शकतो.”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
‘काटा पायाले लागता, लाल रगत सांडते,
लाल रगत सांडता, हिरवं सपान फुलते’
विदर्भातील कवी ‘विठ्ठल वाघ’ यांचे वरील शब्द आज आठवले.. भाजीपाल्याचे दर वाढताच रड काढणार्यांनी, जरा शेतशिवार, बांधावर जाऊन बघावं. महिना रोख बक्कळ पॅकेज घेणार्यांनो तेव्हाच कळेल तुम्हालाही.. काळजावर दगड ठेवणे म्हणजे काय असतं ते..! भरल्या पान्ह्याला बिलगलेल्या तान्ह्याला फाटक्या तुटक्या फडक्यात गुंडाळून मातीत ठेवावं लागतं आणि बळीच्या बायकोला कामाला जुंपून घ्यावं लागतं. बाबांनो क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा लावण्याइतकं सोपं नसतं शेतीचा जुगार खेळणं. ओल्या बाळंतिणीला थंडी वार्यात गोठवण्याइतकी जिगर फक्त शेतकर्याच्याच काळजात असते. अन्यथा तुम्ही साधी सर्दी झाली तरी बाळाला वातानुकूलित दवाखान्यात काचेच्या डब्यात ठेवता.
आठवड्याला हॉटेलची बिलं भरताना तुमच्या डोक्यात महागाईचा हिसाब किताब नसतो. मात्र जेव्हा कोथिंबीर, लिंबू, कांदा, भाजीपाला घेताना तो येतो. उंची पर्स गळ्यात लटकून पाचपंचवीस हजाराच्या मोबाईलवर ऑनलाइन पैसा देताना जेव्हा चार दोन रूपयाची घासाघीस तुमच्या सुशिक्षित बायका करतात, तेव्हा बळीच्या बायकांची स्वप्ने कधीच ऑफलाइन झालेली असतात. भूक भागवण्यासाठी चार पैसे येतील म्हणून बाजारात तास न् तास तिष्ठत बसावे लागते. विकलेल्या आणि उरलेल्या मालाची गोळाबेरीज करता करता चित्तात चिंता घेऊन अनवाणी घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांशी चार दोन रूपयांची घासाघीस करणारी म्याडम पिझ्झा घेताना सहज पैसे काढून देते. त्याचवेळी भुकेने व्याकूळ शेतकऱ्याचे लेकरू घरात आई यायची वाट बघत बघत ग्लानीत झोपी गेलेले असते.. हे आहे शेतकऱ्याचं जीणं.
आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात माणूस चंद्रावर, मंगळावर गेला. जागतिक महासत्ता बनू पाहणार्या कृषिप्रधान भारत देशात मात्र स्वतः कृषकच भाकरीच्या चंद्रासाठी व्याकूळ असावा यासारखी शोकांतिका नाही. जिथे नैसर्गिक जलस्त्रोताची वाणवा आहे अशा इस्त्रायलने कृषिक्षेत्रात केलेली उत्तुंग क्रांती पाहता अनेक गोष्टी अनुकुल असलेल्या भारतात मात्र शेतीची दैन्यावस्थाच आहे. अर्थात इथल्या राजकीय नेत्यांना भ्रष्टाचारातून शेतीसाठी वेळ तर मिळायला हवा! ही गोष्ट वेगळी.
काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेकरिता आदरणीय राहुल दादांनी दिलेले चित्र खरेच खूप बोलके तितकेच हायकू निर्मितीसाठी आव्हानात्मक आहे. चित्र बारकाईने पाहिल्यास यात दिसणारे मातीत झोपलेले बाळ, त्याचे वय, त्याच्या अंगावरचे वस्त्र, शेजारीच पाटातून वाहणारे पाणी, मातीत पडलेली काही रोपे आणि दूर अस्पष्ट दिसणारे राबणारे जोडपे. या सर्वांचे मिश्रण हेच सांगते की बळीराजाचे जीणे, जगणे, राबणे आणि मातीत मोती पिकवणे म्हणजे किती मोठे दिव्य आहे.. सुख समृद्धीच्या अलिकडे आणि पलिकडे जे दिसत नसते पण असते ते सर्व हायकू रचनेत येणे अपेक्षित आहे. सर्वांच्या लेखणीला भरभरून शुभेच्छा. आज मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनःपूर्वक आभार.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



