आळंदीच्या ‘आपुलकी’ वृद्धाश्रमास वसुधा नाईक यांची सदिच्छा भेट
वसुधा वैभव नाईक, पुणे प्रतिनिधी
आळंदीच्या ‘आपुलकी’ वृद्धाश्रमास वसुधा नाईक यांची सदिच्छा भेट
आनंद देण्यातही आपुलकी असते
वसुधा वैभव नाईक, पुणे प्रतिनिधी
पुणे: दि. २१/०९/२०२४ रोजी आळंदी येथील आपुलकी वृद्धाश्रमास भेट देण्याचा योग आला. नाना पाटेकर सिंधुताई सपकाळ यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन हा आश्रम काढल्याचा समजले. भागवत मुरलीधर बोराडे हे तेथील स्वयंसेवक आहेत. तेथे त्यांनी सध्या वीस वृद्धांची सोय केलेली आहे.
आश्रम खूप टापटीप स्वच्छ आहे. प्रत्येकाला त्यांच्या नावाचे पलंग आहेत. करमणुकीसाठी विविध साधन आहेत. तेथील एक ९२ वर्षाच्या आजी आहेत त्या खूप हसत खेळात जीवन व्यतीत करताना दिसल्या. त्या म्हणाल्या ” माझ्या घरी ट्रक भरून माणसं आहेत. पण बघायला कोणी नाही हा दैवाचा खेळ आहे.”
“इथे मला सगळे वेळेवर मिळतं. इथले सर्व छान काळजी घेतात.” आणि त्या आमच्याशी एवढ छान बोलत होत्या की जसे काही आम्ही त्यांच्या कोणी लागत होतो. डोळ्यातून आपोआप पाणी ओघळत होते. त्यांनी अगदी तोंडभरून आशीर्वाद दिले.
एक आज्जी साधारण ८० वर्षाच्या असाव्यात. त्यांनी देखील त्यांची कहाणी सांगितली. एकुलती एक मुलगी होती ती गेली. आता नातवंडांवरती आपला भार नको. म्हणून त्या इथे आल्या. त्यांनी मला विचारलं “तुला मुलं किती आहेत ग.?” मी म्हटलं “तीन मुल आहेत.” त्यांनी माझ्या मुलांसाठी शुभ आशीर्वाद दिले. खूप समाधान वाटते हे सगळं करत असताना. त्या सर्वांना बिस्कीटचे पुडे खाऊ म्हणून नेले होते. हा खाऊ अगदी साधा होता, मला तिथे गेल्यावर समजले इथे असा वृद्धाश्रमा आहे.मी अजून काही वेगळे नेले असते.पण तेवढ्यावरही हे खुश झाले होते.
तेथील हे वृद्ध मंडळी करमणुकीसाठी हसतात, नृत्य करतात.आनंद घेतात. आपल्यासारखे कोणी भेटायला गेले की आनंदाने मोहरून जातात. मला अशा वृद्धांची सेवा करायला आवडते. त्यांना भेट वस्तू द्यायला आवडतात. माझ्याबरोबर काव्ययोग संस्थेचे कवी, कवयित्री व संस्थापक योगेश हरणे व गौरव पुंड हे दोघे होते. तसेच शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सानप सर यांच्यामुळे आश्रमास भेट देता आली.



