पश्चिम भारताची काशी ‘नाशिक’
स्वाती मराडे-आटोळे
पश्चिम भारताची काशी ‘नाशिक’
पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणजे नाशिक. चला पाहुयात या शहरातील काही पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणे. पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक मंदीर म्हणजे काळाराम मंदीर. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासादरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते असे मानले जाते. नाशिक शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे. काळाराम मंदीराजवळ वटवृक्षांचा समूह असून हा समूह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास’ पंचवटी’ असे म्हटले जाते. या पवित्र परिसरात रामपर्णकुटी, लक्ष्मीनारायण मंदिर, जनार्दनस्वामी मंदीर, अशी मंदिरे आहेत. सिंहस्थ कुंभमेळया दरम्यान हया ठिकाणी साधुंचे वास्तव्य असते. अनेक मंदिरे पंचवटी व सभोवतालच्या परिसरामध्ये गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. या मंदिरांमुळेच नाशिकला “पश्चिम भारताची काशी “असे म्हटले जाते.
खंडोबा मंदिर देवळाली छावणी परिसरात लहान टेकडीवर वसलेले आहे. भगवान शंकराचे अवतार मानले जाणारे श्री खंडोबा महाराजांचे हे मंदिर ५०० वर्ष जुने आहे. पौराणिक कथेनुसार मल्ल व मणी दैत्य या दोन राक्षस बंधुचा भगवान शिवाने श्री खंडोबाचा अवतार घेऊन वध केला व भगवान शिव या टेकडीवर विश्रामासाठी आले, म्हणुन या मंदीरास ‘विश्रामगड’ अथवा ‘खंडोबाची टेकडी ‘असे देखील म्हणतात.
“चांभारलेणे” हा 11 व्या शतकातील जैन मंदीरांचा समूह नाशिक शहराच्या बाहय भागात रामशेज किल्ल्याजवळ एका टेकडीवर आहे. तपोवन म्हणजे “तपस्वी लोकांचे वन” हे ठिकाण नाशिक येथे पंचवटी पासून दीड कि.मी. अंतरावर खालच्या बाजुस गोदावरी नदीतिरी आहे. तपोवन हे एकेकाळी दंडकारण्याचा भाग होता. रामायण या महाकाव्याशी हया निसर्गरम्य ठिकाणाचा संबंध असून या ठिकाणीच रावणाची बहीण शुर्पणखेचे लक्ष्मणाने नाक कापले, यामुळे “नाशिक” हे नाव पडले असे देखील म्हटले जाते.
मुक्तीधाम हे नाशिक शहरात नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळ स्थित आहे. पांढऱ्या रंगाच्या मकराणा संगमरवरी दगडांतील मंदीराचा श्वेतरंग पवित्रता व शांतीचा संदेश देतो. येथे बारा ज्योर्तिलिंगाची प्रतिकृती स्थापित करण्यात आलेली आहे. मंदीराच्या भिंतीवर गितेचे अठरा अध्याय कोरलेले आहेत.
नाशिकच्या पांडव लेणीही प्रसिध्द आहेत. येथे पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरुन ही लेणी २००० वर्षापूर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. एकूण २४ लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. नाशिक शहरात मध्यवर्ती बस स्थानकापासून 3 कि.मी. अंतरावर पंचवटीत सितागुंफा स्थित आहे. वनवासादरम्यान माता सिता येथे रहात होत्या असे म्हटले जाते. या ठिकाणावरुन रावणाने सिताहरण केले. रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. या कुंडाजवळच ‘अस्थिविलय तीर्थ’ आहे.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.



