भारतीय संस्कृती आणि योग
‘उत्तर गोलार्धात 21 जून म्हणजे वर्षातील सर्वात मोठा दिवस तर 22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असतो’. या दिवशी सूर्य आणि पृथ्वी यांची स्थिती अशी असते की, सूर्याची किरणे जास्तीत जास्त एकाच बाजूला पडतात. 21 जून वर्षातील सर्वात मोठा दिवस, त्यासोबतच या दिवसाचं विशेष म्हणजे, ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’. योग या शब्दाचे उत्पत्ती युज या संस्कृत धातूपासून झाली आहे. युज म्हणजे जोडणे, एकत्र करणे. योग म्हणजे इंद्रियांचे व मनाचे नियंत्रण करणे तसेच आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन करणे होय. ‘योग कर्मसू कौशलम’ भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायात पन्नासव्या श्लोकात श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोगाचा उपदेश दिला आहे. योग हे सर्व कर्मातील कौशल्य आहे. असे म्हणतात की, ‘ज्याचे चित्त जितके शांत शुद्ध असेल तितकेच त्याची दृष्टी एकाग्र व स्पष्ट असते. त्यामुळे या चित्ताला मनाला एकाग्र करण्याच्या विधीला योग असे म्हणतात’. चित्त एकाग्र असेल तर मनुष्य मोकळ्या बुद्धीने कुठलेही मानसिक बंधनाविना सखोल विचार करू शकतो . योगाच्या संबंधी ऋग्वेदात सविस्तर वर्णन आलेले आहे.
योगाचे आठ अंग आहेत. यम – अहिंसा ,सत्य ,ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांचा समावेश यात असतो. नियम – स्वाध्याय, संतोष ,तप पवित्रता ईश्वर चिंतन. योगासन – सहज आणि स्थिर बसण्याचे प्रक्रिया पद्धत म्हणजे योगासन. प्राणायाम-प्राणवायु गतीचे नियमन म्हणजे प्राणायाम प्रत्याहार – इंद्रिय निवृत्ती म्हणजे प्रत्यहर. धारणा – हे मानसिक अंग मानले जाते . एकाच विषयावर मन स्थिर ठेवणे.ध्यान (मानसिक अंग)अखंडचिंतन समाधी- बाह्य जगाचे विस्मृती होणे. हे मानसिक अंग आहे. योगाचा मूळ सिद्धांत ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून देहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे होय.
योग या संकल्पनेचे मूळ आहे आपला भारत देश. म्हणूनच असे म्हटले जाते की, ‘योग ही भारताने जगाला दिलेली संजीवनी आहे’. योग एक पूर्ण विज्ञान आहे .योग एक पूर्ण जीवनशैली आहे .योग एक पूर्ण चिकित्स्य पद्धती आहे.योग एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे. योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य म्हणजे लिंग, जात ,वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषा भेदकांच्या संकीर्णमध्ये ती बद्ध नाही. योग म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांचे एकत्रीकरण होय. भारतात ऋषी कपिल हे सर्वात पहिले सर्वोत्तम योगी मानले जातात. इसवी सन पूर्व 5000 वर्षापूर्वी च्या ऋग्वेदनंतर इसवीसन पूर्व 600 ते 500 या कालखंडात भगवान गौतम बुद्ध आणि महावीर यांनी आपल्या आचरणातून योग विद्येची शिकवण दिली आहे. योग विद्येचा सखोल अभ्यास केल्यानंतर असे जाणवते की ध्यान आणि समाधी या भागांवर भगवान गौतम बुद्ध यांचे अधिक प्रभुत्व होते. तर यम आणि नियम या भागांवर भगवान महावीर यांचे प्रभुत्व अधिक जाणवते.
त्यानंतर इसवी सन पूर्व 184 ते इसवी सन पूर्व 148 या काळात ऋषी पतंजली यांनी लिखित स्वरूपात योगाचे अधिक विश्लेषण केले आहे. पतंजली नंतर मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, स्वात्वाराम ,श्री रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांनी योगाचा प्रसार केला.भारतीय जनमानसावर असा योगाचा प्रभाव होत गेला. युद्धामध्ये पराक्रम गाजवणाऱ्याला जगात वीर म्हणून गौरवले गेले, तर ज्याने स्वतःवर विजय मिळवणाऱ्या व्यक्तीला भारताने महावीर म्हणून गौरव केला आहे. त्यांनाच आपले आदर्श मानले आहे आणि भारतानंतर सर्वात प्रथम 19 व्य शतकात स्वामी विवेकानंद यांच्यामार्फत योग विद्येचा पूर्ण पश्चिमी राष्ट्रांत प्रसार झाला. तेथूनच पूर्ण जगाला योगाची ओळख झाली. तेव्हापासून सुरू झाले योगावर अनेक वैज्ञानिक प्रयोग आणि त्या अनेक प्रयोगातून असे सिद्ध झाले की योग ही माणसाला लाभलेले संजीवनी आहे.
‘भारत ही योगाची जननी आहे’. ज्या असाध्य रोगांचे निदान औषध गोळ्याने होत नाही असे रोग देखील योगाने बरे होतात. योग माणसाला आतून सुदृढ व सक्षम बनवत असतो. निरोगी सुदृढ व यशस्वी आयुष्याचा आनंद घेण्यासाठी योग करा असा संदेश योग दिनाच्या निमित्ताने दिला जातो. योगाचे अनेक फायदे आहेत तान तणावात ,आणि मुक्ती मिळते अतिरिक्त वजन घट होते ,रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीर लवचिक बनते मनाची एकाग्रता वाढते, शारीरिक आरोग्य सुधारते, मानसिक ताणतणाव कमी होतो, आत्मजागरुकता होते,आत्मविश्वास वाढतो आत्म नियंत्रण व एकाग्रता वाढते योगाचा नियमित सराव केल्याने आपण आपल्या जीवनात शांती आनंद आणि सुसंवाद निर्माण शकतो. दरवर्षी 21 जून हा दिवस जगात सर्वत्र योग दिवस म्हणून साजरा केला जातो. वाराणसी ते वॉशिंग्टन सर्वत्र आज योग साजरा केला जातो. अगदी प्राचीन काळापासून केली जाणारी ही क्रिया मानसिक शांततेची व संतुलनाचे आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून ओळखली जाते.
21 जून हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो .योग ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे .संपूर्ण जगभर योग दिवस साजरा व्हावा यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचे विद्यमान पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी प्रस्ताव मांडला. आज आपण जागतिक योग दिवस साजरा करत असलो तरी, त्यामागील इतिहास आपल्याला माहीत असावा त्याचबरोबर योग दिवस हा एका दिवसापुरता मर्यादित न राहता ती एक वेगाने पसरणारी चळवळ व्हायला हवी .तसेच योग म्हणजे काय योगाचे फायदे काय आहेत? योग दिवसाच्या दिवशी कोणते संकल्प करून ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न कसे व्हायला हवेत? योगाला आपला मित्र कसा बनवायला पाहिजे? यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू आणि आपल्या भारताची योगाच्या माध्यमातून अध्यात्मातील प्राचीन ओळख कायम ठेवू….!!
अनुराधा भुरे, नांदेड.



