कर्माचा सिद्धांत
स्नेहल संजय काळे
कर्माचा सिद्धांत
‘सुख’ आणि ‘दुःख’ या दोन बिंदूंना सोबत घेऊन केला जाणारा प्रवास म्हणजे ‘जगणं’. आयुष्यात काय मिळालं? काय नाही? याच्या व्यर्थ तक्रारी करण्यापेक्षा आयुष्य आहे याविषयी कृतज्ञ राहायला हवे. जीवन म्हणजे चढउतार,ऊन सावली संघर्ष हे तर पदोपदी अनुभवायला येणारच..म्हणून खचून जायचं नाही, उलट त्यावर मात करून आपल्या आयुष्याचा डाव यशस्वीपणे जिंकायचा असतो. आपली कोण चर्चा करतं? कोण आपल्या दुःखाचे भांडवल करतं याकडे दुर्लक्ष करायच असतं. कारण, एकच लक्षात ठेवायचं ,”जैसी करणी, वैसी भरणी” ,ज्यावेळेस मनाने हताश होतो सर्व मार्ग बंद झालेले असं वाटतं तेव्हा डोळे बंद करून, फक्त ईश्वराचे नामस्मरण करावे एकच लक्षात ठेवावं , कर्माचा सिद्धांत आहे.
कोण कोणाशी कसं वागतो याचा लेखाजोखा वर बसलेल्या सर्व शक्तिमान ईश्वरा पाशी आहे.उसके लाठी की आवाज नही होती,ज्याच्याकडे प्रतिकार करण्याची क्षमता आहे त्याच्याच वाट्याला अडथळ्यांची मालिका खरं तर असते,पण किती असावी याचा पण मोजमाप हवंपण म्हणतात ना सारा कर्माचा सिद्धांत.जसे पेराल तसे उगवेल जसेच्या तसे विचार असणार म्हणून आपण सुविचार असावे नेहमी चांगले कर्म करत राहावे.कुणाचं मन दुखवावं यासारख जगात दुसरे पाप नाही.’शास्त्राच्या वारापेक्षा शब्दाची धार बोथट असते’.जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर असे म्हणतात.सगळा कर्माचा हिशोब होत असतो आणि तो इथेच पुरा करावा लागतो.एखाद्या गरीब लाचार म्हणून त्याला हिणवाल, तर एक दिवस ती परिस्थिती तुमच्यावर कधी येईल तेही तुमच्या लक्षात येणार नाही.
राजाचा रंक आणि रंकाचा राव येथेच होतो. प्रतिकूल परिस्थिती ही स्वतःला ढळू द्यायचं नाही स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि निष्ठा ठेवायची आपल्या ईश्वरावर,खरंतर सगळ्यांनी दुसऱ्याच्या मनाला इजा होऊ न देता प्रेमाची फुंकर मारावी म्हणजे जगण्यात मजा आल्याशिवाय राहणार नाही आणि आसमंतात सौख्याचा भर आल्याशिवाय राहणार नाही. अंधारात चाचपडत बसायचं का काळोखात उडायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. सोबत कोण आहे कोण होतं आणि कोण राहणार याचा विचार करण्यापेक्षा मी एकटीच खंबीर आहे हेच मनाशी पक्क ठरवावं. कोणत्याही माणसाची सद्यस्थिती पाहून त्याच्या भविष्याची टिंगल करू नका. कारण काळ इतका सामर्थ्यवान आहे की तो एका सामान्य कोळशाला सुद्धा हळूहळू हिऱ्यात बदलू शकतो. कर्माचे गणित खूप सोपं आहे,’ कर भला तो हो भला.’चार्ली चापलीन सुद्धा म्हणतात, ‘या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही, अगदी तुमचा वाईट काळ सुद्धा, म्हणून असा दुसऱ्याला आधार द्यावा जाणीव ही होऊ नये आणि उणीव ही राहू नये’.
स्नेहल संजय काळे♦
फलटण, जि.सातारा
==========



