प्रिय विद्यार्थ्यांनो,…………!
सौ.वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर
प्रिय विद्यार्थ्यांनो,…………!
काल ९ फेब्रुवारीला तुम्ही सर्व तब्बल २५ वर्षांनी शाळेत एकत्र आलात आणि शाळा आठवणींच्या रंगांत न्हाऊन निघाली. २००० ते २०२५ या पंचवीस वर्षांत कितीतरी घडामोडी घडल्या. तुमचे शिक्षण पूर्ण झाले. तुम्ही नोकरी, व्यवसाय करु लागले. पण कोव्हिड मधील टाळेबंदीच्या काळात ‘Friends Forever’, नावाचा समूह तयार करून दूर दिशांना गेलेली एक एक पाखरे जुळत गेलात. त्याचाच परिपाक म्हणजे कालचा स्नेह मिलन सोहळा.
खरेतर आजकाल डिजिटल मिडियाच्या माध्यमातून अनेक जणांची भेट होते. नवीन ओळखीपाळखी वाढतात. पण त्या मनापासून जपणे सर्वांना शक्य होत नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी-व्यवसायातील व्यस्तता, अशी एक ना अनेक कारणे असतात. या सर्व गोष्टींवर मात करून तुम्ही ९ फेब्रुवारीला शाळेत स्नेह मिलन सोहळा आयोजित केला.
याप्रसंगी सर्वांच्या चेहऱ्यावर असलेली उत्सुकता नजरेला सुखावून जात होती. बालपणी जसे वर्गात चेहरे फुललेले असायचे तोच निरागसपणा इतक्या व्यस्ततेही तुमच्या चेहऱ्यावर शोभून दिसत होता. वर्षे मोजताना खूप जास्त वाटतात पण आयुष्य फार लहान आहे. बालपण, तरूणपण, प्रौढत्व असे एक एक टप्पे पार करताना कधी वार्धक्य येतं कळतच नाही. मात्र हे टप्पे पार करताना बालवयाला जपून ठेवणे खूप आवश्यक आहे. कारण तेच आपलं एक वय असतं ज्यात निरागसता असते. जे आपल्या मनाला टवटवीत ठेवते.
काल आठवणींच्या लडी उलगडताना तुमच्यामधील दोन मोती गळाले हे ऐकून खूप वाईट वाटले. मोहीत पेठे आणि संदीप मरापे काळाच्या पडद्याआड गेलेत हे ऐकून मन गलबलून गेले. सम्राट जगताप दुर्धर आजारावर मात करून नव्याने आयुष्य सुरु करतोय हे बघून बरे वाटले. कालच्या दगदगीनंतर सोनाली पाथरकरला बरे नसल्याने दवाखान्यात दाखल करण्याची तुमची धावपळ तुमच्यातील जागरूकता, कर्तव्यनिष्ठा आणि एकमेकांप्रती असलेली ओढ मनास सुखावून गेली. कायम असेच राहा… एकमेकांना जपा… आयुष्यातील ही कमाई तुम्हाला भौतिक सुविधा नाही देणार पण मनाची श्रीमंती कायम वाढवणार….१९९९-२००० च्या सर्व उपस्थित, अनुपस्थित विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा…!
तुमचीच इयत्ता चौथीची टिचर
सौ.वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर



