नवरात्र उत्सवातील नवदुर्गेच्या ‘नऊ रूपाचे महात्म्य’
अनिता अनिल व्यवहारे ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
नवरात्र उत्सवातील नवदुर्गेच्या ‘नऊ रूपाचे महात्म्य’
“नवरंगांची करित उधळण, उत्सव नवरात्रींचा सजला,
आदिशक्तीच्या भक्तीत संपूर्ण आसमंत नटला,
तिच्या नऊ रुपांमध्ये अद्वितीय शक्ती असे
मातेची भक्ती मनमनात वसे…!!”
आदिशक्ती तुळजाभवानी मातेच्या कृपेने, विजयादशमीच्या उत्सवात तिची पूजा करून आपण ‘नवरात्रीचा उत्सव’ साजरा करतो. “स्त्रियांसाठी हा उत्सव केवळ पूजा, पाठ व व्रतपुरता नाही, तर स्वतःचा आनंद शोधण्याचा, तो मिळवण्याचा आणि सजण्याचा देखील असतो”. याची सुरुवात होते जिथे आमची सत्ता चालते, जिथे गृह मंत्रीपद आमच्या हाती असते.म्हणजे स्वयंपाकघरापासून. जिथे स्वच्छता असते, तिथे लक्ष्मी निवास करते. हा आमचा समज आहे. म्हणून नवरात्र उत्सवापूर्वी घर स्वच्छ करून मनही शुद्ध केले जाते. आणि मग सुरू होतो नवरात्र उत्सव!
व्रत, उपवास, पूजा, अर्चा करून देवीचे घट बसवले जातात. अन्नपूर्णेला खुश ठेवून स्वयंपाकात नवनवीन पदार्थ तयार केले जातात. हे करत असताना स्वतःच्या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक असते. त्याचबरोबर, गरबा, दांडिया, टिपऱ्या, हादगा भोंडला इत्यादी कार्यक्रम उत्साहात पार पाडले जातात. गेल्या काही वर्षांत नवरंगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. नऊ दिवस, नऊ रंगांच्या साड्या, वस्त्र परिधान करणे, देवीचे आवडते रंग याबाबत प्रथा पाळली जाते. या रंगांमुळे भक्ती, आनंद, प्रेम आणि जीवनातील विविध प्रसंगांमध्ये रंग भरला जातो. हे रंग परिधान करून जसा आनंद मिळतो, तसाच आमच्या मनातही वेगवेगळे रंग उमटतात. या नवशक्तींचे, दुर्गा मातेच्या नवरूपांचे अस्तित्व आमच्या मनात आहे. प्रसंगी आम्ही ती शक्ती देखील प्रकट करतो. आता पाहू या नऊ दिवसांच्या देवीच्या रूपांचे महात्म्य.
पहिला दिवस : शैलपुत्री
शैलावर कमलावर बसलेली तेजस्वी देवी, धैर्य आणि प्रामाणिकतेचे प्रतीक आहे. कठीण परिस्थितीत भक्तांचे मनोबल वाढवते.
दुसरा दिवस :ब्रह्मचारीणी
शुद्धता, संयम आणि आत्मसंयमाचे प्रतीक. भक्तांना संयम आणि ज्ञानाची शक्ती देते आणि जीवन विकास घडवते.
तिसरा दिवस : चंद्रघंटा
शौर्य आणि धैर्याचे रूप. वाघावर आरूढ, कपाळावर अर्धचंद्र असलेली देवी भय दूर करून हृदयात शौर्याचा दीप प्रज्वलित करते.
चौथा दिवस : कुष्मांडा
सर्जनशीलतेचे प्रतीक. हसतमुख, ब्रह्मांडाची सृष्टी करणारी देवी भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह पसरवते.
पाचवा दिवस : सकंदमाता
ममता आणि करुणेचे मूर्त रूप. बालकांसाठी समर्पण आणि आईच्या आशीर्वादाचे प्रतीक. भक्तांना ममता आणि मूल्यांची जाणीव करून देते.
सहावा दिवस – कात्यायनी
धैर्य, सामर्थ्य आणि संघर्षातून जिंकण्याचे प्रतीक. भक्तांना अडचणींवर मात करण्याचे धैर्य देते.
सातवा दिवस : कालरात्री
अज्ञानावर विजय मिळवून अंधारातून प्रकाश देण्याचे प्रतीक. भक्तांचे जीवन भक्तीतून समृद्ध करते.
आठवा दिवस : महागौरी
शुद्धता, सौंदर्य, शौर्य आणि बलाचे प्रतीक. तेजस्वी रूप, सुंदर विचार आणि कृतीचे ठेवा भक्तांमध्ये टिकवते.
नववा दिवस : सिद्धिदात्री समृद्धीचे रूप
भक्तांचे मन, घर आणि जीवन सुखी करण्याचा संदेश देते. त्यासाठी मेहनत, श्रद्धा आणि साधना आवश्यक आहे.
“हा उत्सव केवळ आनंद साजरा करण्याचा नाही, तर आत्मशक्ती जागृत करण्याचा मार्ग आहे”. स्त्रियांच्या मनातील नवरूपातूनही ही शक्ती प्रकट होते आणि जीवन मूल्यांची जाणीव होते.
ॐ देवी सर्वनवरूपायै नमः
नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या मंगलमय शुभेच्छा!
अनिता अनिल व्यवहारे
ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
======



