लिहिताना इतका सराव होतो की, वेगळे काही वाचण्याची गरजच नाही’; विष्णू संकपाळ
आभारीय मनोगताची काव्यसफर
‘लिहिताना इतका सराव होतो की, वेगळे काही वाचण्याची गरजच नाही’; विष्णू संकपाळ
आभारीय मनोगताची काव्यसफर
शब्दांचे झाले साफल्य अन्
लाभला सर्वोत्कृष्टतेचा ताज
लेखणीला मिळाले नवचैतन्य
लपवताच येईना आनंद आज…
काल रविवारी काव्यरचनेचा विषय होता ‘लपवू नकोस’ आणि या रचनेला सर्वोत्कृष्ट काव्यरचना या उपक्रमांतर्गत सन्मानित केल्याबद्दल सर्वप्रथम आदरणीय राहूल दादा आणि समस्त परीक्षक, प्रशासकांचे मनःपूर्वक आभार..!
रविवार रात्री आकरा वाजता ‘तुमचा फोटो पाठवा’ हा मेसेज मी सोमवारी सकाळी साडेआठ वाजता पाहिला आणि तातडीने फोटो पाठवला तर पंधराच मिनिटात रचनेचे पोष्टर समूहात झळकले. (सद्या कंपनीत मोबाईल बंदी असल्याने वेळेत मोबाईल पाहू शकलो नव्हतो शिवाय याच कारणामुळे समूहात सुद्धा फार सक्रिय होता येत नाही याची खंत आहेच.) असो.
समूहात विषय पोस्ट आल्यानंतर नेमका काय आशय घ्यावा यावर थोडे आत्मचिंतन केले आणि.. ‘सत्य शिवाहून सुंदर’ ही थीम मेंदूत चमकून गेली. आणि लपवायचे नसेलच तर सत्य कदापी लपवू नये किंबहुना सत्य हे लपवून लपत नसतेच, अशा आशयाची रचना पेश केली. खरे तर मी गेले चार पाच वर्षे या समूहाचा हिस्सा आहे.
दररोज येणारे नवनवीन विषय अभ्यासताना आणि त्यावर लिहिताना इतका सराव होतो की वेगळे काही वाचण्याची गरजच पडत नाही. कारण एकाच विषयावर अनेक अंगांनी लिहिलेल्या विविध रचना येथे वाचायला मिळतात. हेच खरे बुद्धीला आणि कल्पनाशक्तीला चालना देणारे टाॅनिक आहे. येणारे विषय सुद्धा खूप विचारपूर्वक दिलेले असतात. ज्याचा संबंध प्राप्त परिस्थितीत घडणार्या घटना घडामोडीशी असतोच. त्यामुळे तशा अनुषंगाने लिहिताना शब्दसंग्रह सुद्धा समृद्ध होत जातो. नव्या कल्पना सुचतात आणि प्रतिभा उजळून निघते.
याशिवाय आदरणीय वैशालीताई साहेब आदरणीय सविताताईजी आ. स्वातीताईंजी यांची काव्यपरिक्षणे वाचली की पुन्हा नव्याने वैचारिक खतपाणी मिळते ते वेगळेच. म्हणूनच हा समूह म्हणजे एक चालती बोलती काव्यशाळाच आहे असे मला वाटते. आणि या शाळेतला मी विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो.
कविता लिहिताना केवळ ओढून ताणून केलेली असंबंध जुळवाजुळव नसावी, तर त्या विषयाला पुरेपूर न्याय देणारी कल्पक, प्रेरक, व वाचकमनाचा ठाव घेणारी विचारधारा असावी असे मला वाटते. केवळ शब्दांचा पसारा नसावा तर शब्दांच्याही पलिकडचे संदर्भ दर्शवणारा आटोपशीर तसाच चित्ताकर्षक मोरपिसारा असावा. कांहीतरी मार्मिक भाष्य असावे ज्यातून प्रबोधनात्मक संदेश मिळावा. तसेच कधी कधी सडेतोड प्रहार असावा. पाषाणावरही मुळे रोवून उभे राहणार्या रोपट्याप्रमाणे कमालीचा प्रेरणाभाव असावा मात्र कोणताही फुकाचा आव बडेजाव नसावा. आणि आर्त वेदनेचा हुंकार तर संवेदनांचा उद्गार असा असावा की वाचकाला वाटावे हे काव्य अश्रूंच्या शाईने लिहिलय की काय…!! बस्स गेली चार पाच वर्षे या समूहात मी हीच काव्यसाधना करण्याचा प्रयत्न करत आहे.. आणि यातूनच हातून मायमराठीची सेवा होत आहे यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो…!
आपल्या वैयक्तिक व्यापातून समूहासाठी प्रचंड मेहनत घेणारे, शिस्तप्रिय आ. राहूल दादा यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्याचबरोबर समूहाच्या सर्व उपक्रमाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणार्या मुख्य प्रशासक परिक्षक आदरणीय सविताताईजी, आदरणीय पल्लवीताईजी, आ. वैशालीताईसाहेब, आ. स्वातीताईंजी तसेच आ. अशोक दादा, आ. संग्राम दादा, आ. उरकुडे सर, आ. वृंदाताईजी, तारकाताईजी, सुधाताई या सर्व मान्यवर प्रशासकीय मंडळींचे मनःपूर्वक धन्यवाद.. तसेच मला अभिनंदनीय शुभेच्छा देऊन प्रोत्साहित करणारे सर्व समूह सहकारी बंधू भगिनींचा पण मी अंतःकरणपूर्वक आभारी आहे.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



